Saturday, 29 April 2023

समझोता गमोंसे करलो....



 मानवी जीवन असे अनुभवाची खाण

 सुख दुःखाचा फेरा, वर्म आयुष्याचे जाण

      जीवन म्हणजे काय तर दोन घडीचा डाव. तो कसा खेळायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे. माणूस जन्माला येतो तेव्हाच सोबत त्याचं संचित, प्रारब्ध आणि मृत्यू पण घेऊन येतो. जन्म आणि मृत्यू हे जरी आपल्या हातात नसले तरी जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास करताना क्रियमाण कर्म करण्याचा अधिकार आपल्याला असतो. सत्कर्म करत जायचे म्हटले तरी परिस्थिती कशी आहे  आणि आपली शक्ती किती आहे यावर अवलंबून आहे.

      आयुष्य आहे म्हणजे सुख आणि दुःख यांचा पाठशिवणीचा खेळ सतत चालत असतो. दुःखात माणूस होरपळून निघतो तर सुखात आनंदाच्या झुल्यावर झोके घेतो. असे असले तरी सर्वसाधारण दुःखाला कुरवाळत बसण्याची सवय असते माणसाला. कितीही मोठे संकट आले तरी त्याच्या सन्मुख होऊन त्याच्याशी लढता आले पाहिजे. हे केव्हा शक्य होईल, जेव्हा मनात सकारात्मक विचार येतील तरच. तशी सवय मनाला लावून घ्यावी लागेल. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते सर्वधर्म परिषदेत बोलायला. वास्तविक पाहता त्यांना आमंत्रण नव्हते. पण या परिषदेत जायला कसे मिळेल यावरच ते सतत विचार करत होते. अपमान झाला त्यांचा, त्यांना तिथे जेवायला मिळाले नाही,पण स्वामीजी डगमगले नाहीत. संकटांशी दोन हात करण्याची त्यांची धाडसी वृत्तीच त्यांना सर्वधर्म परिषदेत घेऊन गेली. हातपाय हलवले की मार्ग दिसतात. जेवण मिळत नाही, तिथे कोणी ओळखत नाही, उपहासाने सगळे पाहतात आहे, हे कमी दुःख होतं का? पण सकारात्मक विचार आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची शक्तीच त्यांची ऊर्जा बनली होती. सांगायचा उद्देश हाच की दुःख तर येतातच पण त्याच्यावर मात करत आयुष्याची वाटचाल करत गेले तर आयुष्य खूप सुंदर आहे. 

      सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे ॥

      तुकाराम महाराजांचे हे बोल हे अनुभवाच्या कसोटीवर घासून तपासून आलेले आहेत. आयुष्यात सुख कमीच आहे, त्यामानाने दुःख जास्त प्रमाणात आहे. असे असले तरी संतांचे वचन ध्यानात ठेवावे, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत गेले तर दुःखाची झळ कमी जाणवेल. जे जे दृश्य आहे ते सगळे नाशिवंत आहे. त्यामुळे जन्म आहे म्हणजे मुत्यू अटळ आहे. कर्तृत्व असे असावे की मरणोत्तर कीर्ती रूपाने आपण जीवंत रहावे.

      मोठ्या ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या आधी सामान्यच होत्या. त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. दुःखांचे डोंगर त्यांच्यावर कोसळले. शिवाजी महाराज आग्र्याहून परत आले ते त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या बळावर. शंभू राजे मागे ठेऊन आलेले महाराज स्थितप्रज्ञ होते. कशाच्या बळावर? माझं बाळ माझं बाळ म्हणत ते रडत बसले नाहीत. त्यांचा त्यांच्या मनगटावर आणि स्वतः वर पूर्ण विश्वास होता. हाच विश्वास त्यांना बळ प्रदान करत होता. आईचा बोट धरून आलेला पाच सहा वर्षाचा बाळ स्वराज्याची स्थापना करतो म्हणजे हे सहजासहजी घडले नाही. पन्नास वर्षांची हयात पणाला लावली. 

      दुःख येतच राहतील. संकट येतीलच कारण ती येण्यासाठी च असतात. दुःखाला कुरवाळत न बसता त्यावर सकारात्मक विचारांनी आणि स्वतः वरच्या विश्वासाने मात करता आली पाहिजे. तेच जगणं होय. संघर्षाचे बाळकडू लहानपणीच पाजले तर पुढे दुःखाचा बाऊ केल्या जात नाही. माहित असतं काहीही झालं तरी आणि कोणतीही परिस्थिती उद्भवली तर त्याच्याशी लढण्याची ताकद आहे. दुःखाशी समझोता करण्यापेक्षा त्याला ओलांडून पल्याड गेलं म्हणजे कळतं आयुष्य किती सुंदर आहे. यालाच जीवन ऐसे नाव......


©️®️रसिका राजीव हिंगे


No comments:

Post a Comment