Saturday, 22 June 2024

सप्तपदी

 


rasraj#सप्तपदी#विवाह संस्कार#


     विवाह संस्कार! गृहस्थाश्रम स्वीकारण्याची पहिली पायरी. अत्यंत पवित्र असलेला हा संस्कार दोन मनांना जोडणारा, दोन घराणी एकत्र बांधणारा, सोयरा निर्माण करणारा. सोयरा याचा अर्थ एकमेकांची सोय जाणतो तो. अनेक शास्त्रशुद्ध विधी असलेल्या ह्या संस्कारातील सप्तपदी हा एक विधी. 

सप्तपदी हे रोज चालते

तुझ्यासवे ते, शत जन्मीचे हो, माझे नाते

     सप्तपदी चालणे म्हणजे एक यज्ञ आहे. आपल्या जोडीदाराबरोबर सात पावलं म्हणजे आयुष्यभर चालायचे म्हणजे एकमेकांचे गुणदोष स्विकारून निर्दोष वृत्तीने, कोणताही विकल्प मनात न ठेवता केलेली वाटचाल म्हणजे सप्तपदी. फक्त अग्नीभोवती सात फेरे घेणे म्हणजे सप्तपदी नव्हे. अग्नीला साक्षी ठेवून, जी सात पावलं चालली जातात त्याला अर्थपूर्ण असा शास्त्रीय आधार आहे, त्या मंत्रांमध्ये शक्ती,सामर्थ्य आहे. विवाहानंतर येणाऱ्या जबाबदारीची, कर्तव्याची जाणीव आहे. गृहस्थाश्रम स्वीकारण्याची एक प्रकारे ही संमती आहे. शास्त्रानुसार सप्तपदी चालताना जी वचनं एकमेकांनी द्यायची घ्यायची आहे ती खरेच आचरणात आणली तर आयुष्य सुखाचं होईलच शिवाय मनुष्य जन्माचे सार्थक होईल. समाधान लाभेल.

     प्रत्येक पाऊल समजून उमजून उचलायचे आहे हा विचार सप्तपदी देते. जोडीदाराच्या हातात हात देऊन केलेली ही वाटचाल म्हणजे प्रत्येक क्षणी, सुख दुःखात मी तुझ्याबरोबर आहे याची ग्वाही आहे. एकमेकांना आधार,सहाय्य करावे या जाणिवेतून जीवनाची यशस्वी वाटचाल करायची आहे.

     पहिले पाऊल शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. तुझे माझे नाते हे काम टिकणारे राहो. सुख दुःखाचे डोंगर उभे राहिले तरी सारासार विचार करून सहनशीलतेने कायम तू माझ्यासोबत रहा. क्षुल्लक कारणावरून वाद नको व्हायला. असे हे निरंतर कायम टिकणारे नाते निर्माण व्हावे.

     दुसरे पाऊल हे विश्वासाचे आहे. नाते तेव्हाच टिकेल जेव्हा एकमेकावर दृढ विश्वास असेल. विश्वासाने हात हातात दिलेला आहेस तर त्याचे सार्थक करण्याची जबाबदारी दोघांची आहे. एकमेकांचे बळ, शक्ती वाढवीत आयुष्य जगायचे आहे. 

     तिसरे पाऊल दृढ परिचय. एकदा विश्वास टाकला की मनातले सगळे संकल्प विकल्प यांचा निरास होऊन ओळख वाढत जाते. Made for each other असेच वाटायला लागते. प्रेम आणि विश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचे आहे.

     चौथे पाऊल प्रतिसाद. साद घातली की प्रतिसाद मिळावा. सुख देणारी, कुटुंब व्यवस्था सांभाळणारी तू हो. जीवनात अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरे शोधायची म्हणजे सोबत तू असशील तर सहज शक्य होईल. 

     पाचवे पाऊल सन्मान. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ, याचे उत्तर शोधूच नये. आपापल्या कर्तृत्वाने अहंकार न करता याचे उत्तर देता आले तरच एकमेकांचे होता येते, एकमेकांचा सन्मान केल्या जातो. सन्मान म्हणजे रोज पायघड्या घालाव्या असे नाही. पण अपमान होईल असेही वागू नये.

     सहावे पाऊल महत्वाकांक्षा. सन्मान करतांना मोठेपणाची हाव मनात नसावी. मी मी माझे माझे अशी वृत्ती असेल तर संसार सुखाचा कसा होईल?.  कुणी कोणाची सेवा करावी हा प्रश्नच नको निर्माण व्हायला. एकमेकांप्रती आदर ठेवला की मोठेपणाचा हव्यास आपोआप गळून पडतो.

     सातवे पाऊल आत्मसमर्पण. इथे आत्मसमर्पण म्हणजे शरणागती नव्हे. हा एक पैलू असला तरी दोघांनी मिळून सामर्थ्य, धैर्य, संपत्ती यासाठी ईश्वराला प्रार्थना करायची आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्नशील असावे. तसेच सकारात्मक विचारांची कास धरली तर उत्तम संतती प्राप्त होईल. निष्ठा, एकत्रता, सख्य असेल तर संसार सुखाचा होईल.

     अर्थात संसार म्हटला की भांड्याला भांडे लागणारच पण त्याचा आवाज दिवाणखान्यात येता कामा नये. सप्तपदी कडे फक्त एक इव्हेंट म्हणून न पाहता त्यातील मंत्राचा प्रभाव किती खोलवर आहे, सुखावह आहे आयुष्य जगण्यासाठी हे पाहिले तर खरेच संसार छान होईल. उठसुठ घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे ते कमी होईल हे निश्चित.  मित्रत्वाची भावना असेल तर नात्यामध्ये परिपक्वता येते. या संसाराच्या सहप्रवासात कधी कोणी सारथ्य करावे तर कधी कोणी रथी व्हावे. कधी नमते घ्यावे तर कधी पडते घ्यावे. तरच संसाराच्या सारीपटावर मनासारखे दान पडेल अन् सौख्याचे क्षण अनुभवता येतील...हे निर्विवाद सत्य आहे..


©️®️रसिका राजीव हिंगे 



    








Thursday, 13 June 2024

बाप

 बाप


बाप म्हणजे..कवच कुंडले..

जन्मजात मिळालेले...

भीती युक्त आदर असलेला

बाप...म्हणजे वेगळंच रसायन..

आई देव रूप असेल तर बाप

प्रत्यक्ष देव आहे...

येत नाही ओळखता..असतो

तोपर्यंत...झेलून घेतो सगळी

संकटे...आस पण लागू देत

नाही..एवढं बळ कुठून आणतो..

चंदनासारखा झिजत राहतो...अन्

सुगंधित करतो बाळाचं आयुष्य...

नाही शब्द त्यांच्या शब्दकोशातच

नसतो... जीवाचं रान करतो..

पण सुखं आणून देतो... स्वतःचं 

मन मारून हौस पूर्ण करतो.. तो

असतो बाप...भिऊ नकोस..

मी आहे म्हणणारा असतो बाप...

आयुष्यावरची...घनदाट सावली...

पण कधीही न दिसणारी..फक्त 

जाणवणारी गडद सावली...म्हणजे

बाप..परमात्म्या सारखा.....


रसिका राजीव हिंगे 

Saturday, 8 June 2024

अपेक्षा का करावी?


 


अपेक्षा का करावी?

#rasraj#अपेक्षा#संचित#प्रारब्ध#कर्म#

     


     भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेली अशी ही आपली कुटुंब संस्था आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असायचे. साठ लोकांचे असलेले कुटुंब मी स्वतः पाहिले आहे. आजचा एक मिनी इव्हेंट होईल इतके सगळे एका छताखाली गुण्यागोविंदाने राहत असत. पुढे काळ बदलला, काळाची गरज म्हणून विभक्त कुटुंब अस्तित्वात आली. पर्याय नाही म्हणून दूर राहूनही नात्यांमध्ये जवळीक होती. हळूहळू व्याप वाढत गेले, दूर राहिल्याने आपसूकच संवाद कमी होऊ लागले. आज इतका अतिरेक झाला आहे की नात्यांमधला संवाद हरवत चाललाय. मी आणि माझं असे करता करता आपलं याला जागाच राहिली नाही. जो तो फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतो आहे असे चित्र समोर दिसते आहे. पालकांच्या आणि मुलांच्या संवादात दरी निर्माण झाली आहे. आईवडिलांचे फक्त शारीरिक आरोग्य जपणे म्हणजे त्यांची काळजी घेणे असा सर्वसाधारण समज म्हणा किंवा अलिखित नियम झालेला आहे. पण त्यांच्या मनाच्या आरोग्याचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत राहतोच. जसे प्रत्येक नियमाला अपवाद आहेत तसे याला पण अपवाद आहेतच. मी माझ्या मुलाला मोठे करताना किती कष्ट घेतले, म्हणजे अगदी हाडाचे काडं केलीत, रक्ताचे पाणी केले, रात्रीचा दिवस केला असा भावनिक पातळीवर आईवडील विचार करतात. मी केलं म्हणजे त्याने किंवा तिने आमचं करायलाच पाहिजे, निदान दोन शब्द प्रेमाने बोललेच पाहिजे असा अट्टाहास असतो. अपेक्षा असते. व्यावहारिक पातळीवर हे ठीक आहे. पण आईवडील आणि मुलांच्या नात्यामध्ये असा विचार का येतो? इथे भावना महत्वाच्या आहेत असे नाही तरीही हे साटेलोटे आहेच. कशासाठी? हा तर व्यवहार झाला. वास्तविक पाहता जिथे व्यवहार येतो तिथे प्रेम संपतं. आणि जिथे अपेक्षा आहे तिथे अपेक्षाभंग आहेच. 

     आपल्या मुलांनी उत्तुंग भरारी घ्यावी, विदेशात शिक्षण आणि नोकरी करावी हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते, नव्हे असा आग्रहच असतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण तो आकाशाला गवसणी घालत असेल तर त्याच्याकडून पुन्हा स्वतः बद्दलच्या अपेक्षा ठेवू नये.  जेव्हा मला गरज असेल तेव्हा त्याने यावे. नाही आला तर त्याला काही प्रेमच राहिले नाही, आईवडिलांची काळजी नाही, साधा फोन सुद्धा करत नाही या गोष्टींना काही अर्थ उरत नाही. मी त्याचा बोट धरून त्याला चालायला शिकवले म्हणजे त्याने माझी म्हातारपणाची काठी व्हावी हे गृहीत धरल्यामुळे अपेक्षाभंग होतो. 

     आईवडील आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार करतात. घरातले वातावरण, रूढी, परंपरा अनुभवत, अजमावत मुले मोठी होत जातात. काही प्रमाणात का होईना सुसंस्कृत मुले घडविण्याचे दायित्व पालक पार पाडत असतातच. तरीही माझा मुलगा आमच्याकडे लक्ष देत नाही याला जबाबदार कोण? प्रत्येक प्राणीमात्र जन्माला येतांना त्याचे कर्म आणि संचितानुसार आपले प्रारब्ध घेऊन येतो. जसे प्रारब्ध असेल तसे भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही हे अगदी सामान्य माणूस सुद्धा जाणून आहे. मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचे काही कर्तव्य असतात. मुलांना मोठे करून या जगात जगण्याचा मार्ग दाखविण्याचे कर्तव्य प्रत्येक आईबापाला करावे लागते म्हणण्यापेक्षा प्रारब्धाने ही जबाबदारी टाकली आहे. जन्मजन्मांतरीचे आपले जसे कर्म असेल तसेच सुख आणि दुःख आपल्या वाट्याला येतात. यात बदल होत नाही. ते स्वीकारावेच लागतात. असे असेल तर विदेशात गेलेला मुलगा आला नाही, तो आला असता तर त्याची आई गेली नसती, तिने देह ठेवला नसता याला काहीच अर्थ नाही. कारण जे निर्माण झाले आहे त्याचा नाश अटळ आहे. तिचा जीव मुलांमध्ये अडकला होता. त्यांची भेट झाली असती तर कदाचित ती गेली नसती. हे सगळे पाण्यावरचे बुडबुडे आहेत. केव्हा यायचे आणि जायचे हे ठरलेले आहे. सांगून सवरून येणे जाणे नाही. तरीही मुलांना दोषी ठरवून आईबाप मोकळे होतात. असे अजिबात नाही की मुले सर्वस्वी बरोबर आहेत. आईबापाचे जसे कर्तव्य आहे तसेच मुलांचे पण आहे. प्रत्येक जण आपापल्या कर्माचे फळ भोगत असतोच, त्याशिवाय सुटका नाही. कोणीही यातून पळवाट काढू शकत नाही अन् अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाही. 

     कर्म, संचित, प्रारब्ध याचा विचार नाही केला तरी एक जबाबदार माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला, समाजभान ठेवले तरीही जीवनात अपेक्षित यश मिळेलच आणि आनंदही. कोणाकडून कशाचीच अपेक्षा न ठेवता  प्रारब्धानुसार आपले कर्तव्य पार पाडले तर संवादाची ही जी दरी  निर्माण झाली आहे ती कमी होईल. आरोप प्रत्यारोप केल्यामुळे संचित कमी होणार नाही तर मनुष्य जन्माला आला आहेस न मग तुला क्रियामाण कर्म करण्याचा अधिकार आहे. सत्कर्म आणि सदाचार करत रहा आणि आनंदरूप होऊन जगण्याचा प्रयत्न करावा. यापरीस दुसरे सुख ते कोणते!...


रसिका राजीव हिंगे