Sunday, 2 April 2023

 साहित्यसंपदा आयोजित उपक्रम

पत्र लेखन


चि. चारुता, उन्मेष, 

     तुमचे दोघांचे एकत्रित असलेले पत्र मिळाले. खूप बरं वाटलं तुम्ही पत्र लिहिलं म्हणून. नाहीतर आजकाल फोनवर बोलणं होतं फक्त. पत्र लेखन कला काळाच्या आड जाते आहे हे माझे बोलणे तुम्ही दोघांनी खूपच मनावर घेतलेले दिसते. असो लिहावेसे वाटले हेच खूप आनंददायी आहे.

     एक गोष्ट मात्र खूपच म्हणजे खूपच खटकली मला तुमची. तुम्ही कोणत्या भाषेत पत्र पाठवले हे तुम्हाला तरी कळले का रे? मराठी मातीत, मराठी घरात जन्माला येऊन तुमची भाषा इतकी खालच्या दर्जाची असावी याचे खूप वाईट वाटले बघा. मराठी भाषा नीट बोलता आणि लिहिता यायलाच हवी. इंग्रजी शब्दांचे मराठीकरण होते की मराठीचे इंग्रजीकरण होते कळले नाही. 

     मराठी भाषेत आपल्या पूर्वजांनी इतके साहित्य लिहिले आहे, त्याचा अभ्यास केल्याशिवाय कशी बरे येईल आपली भाषा. प्रत्येक भाषेचा अभिमान असावा पण आपल्या भाषेचा माय मराठीचा स्वाभिमान बाळगला तरच ती पुढे टिकून राहील हे आधी लक्षात घ्या बाळांनो. मी फक्त तुम्हालाच सांगते आहे असे नव्हे तर तुमच्या सारख्या इंग्रजाळलेल्या तमाम नवीन पिढीला सांगते आहे. कारण तुम्हीच उद्याचे भविष्य आहात. 

     आपले सगळे ग्रंथ हे संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. वेद उपनिषदापासून तर  रामायण महाभारत या सारखे महाकाव्य सुद्धा संस्कृत मध्ये लिहिलेले आहे. सर्वसामान्य व्यक्तीला  आपले सगळे ज्ञान जे संशोधन करून स्वबळावर अनुभवाच्या पट्टीवर घासून आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले आहे ते सहजपणे समजायला हवे, आत्मसात करता यायला हवे हा विचार आपल्या संतांनी केला. आणि हळूहळू सगळे ज्ञान मराठी जी महाराष्ट्राची बोली भाषा आहे त्यामध्ये लिहून सगळ्यांपर्यंत पोहचविले.

     संस्कृत भाषा जगासि कळेना

     म्हणोनी नारायणा दया आली हो

      देवाजीने परि घेतला अवतार

       म्हणति ज्ञानेश्वर तयालागि हो!

   अन् मराठी रुजली इथे, फळली,फुलली. आज ती मातृत्वाच्या पदावर विराजमान आहे. वास्तविक पाहता दर बारा कोसावर भाषा बदलते. महाराष्ट्रात मराठी या भाषेचेच विविध रूपं ऐकायला मिळतात. तिचीच ही सारी लेकरं.  

     मराठी  ही जशी बोली भाषा तशी स्वीकारल्या गेली कारण तिचे बोलणे, समजणे आकळणे सोपे वाटले असावे.

     तुम्हाला माहित आहे का मराठी भाषा जशी वाकवली तशी वाकते असे साधारण बोलल्या जाते. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असलेली ही एकमेव भाषा. त्यातून ऱ्हस्व दीर्घ यामुळे ही अर्थ बदलत जाणारी ही भाषा. तरीही या मराठमोळ्या भागात ती बहरली, तिचा सुगंध आसमंतात दरवळतो आहे.

     शिक्षणासारख्या क्षेत्रात सुद्धा मराठी भाषेतून शिक्षण द्यावे म्हणजे विद्यार्थी लवकर ज्ञान आत्मसात करतील असे आहे.

     आता आपली जबाबदारी आहे या मातेचे संरक्षण करण्याची. हिच्याच अंकावर बसून आकाशी भराऱ्या घेण्याचे स्वप्न पाहिले आपण. मराठीचा हात धरूनच गगनाला गवसणी कशी घालता येईल याचा विचार करायला हवा. आपल्या पूर्वजांनी मराठीचे बीज या महाराष्ट्राच्या मातीत रुजवले, प्राणपणाने जपले आणि आपल्याला आज ही मधुर फळे मिळतात आहे. मराठी भाषा कशी टिकून राहील, तिचा प्रचार, प्रसार कसा करता येईल हे आपले सगळ्यांचे स्वप्न असावे तरच कवी सुरेश भट म्हणतात तसे आपण अभिमानाने संपूर्ण जगाला सांगू शकू 

     लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

     जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

      धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

      एवढ्या जगात माय मानतो मराठी

हीच मराठीला मानवंदना ठरेल..

     कळलं का! मला तुम्हाला उपदेश करायचा नाही पण आपली भाषा आपणच नीट सांभाळली तरच तिचा अभिमान वाटेल आणि स्वाभिमान पण. 

     पुढचे पत्र शुद्ध मराठी भाषेत असेल या अपेक्षासह.

     

रसिका राजीव हिंगे

पुणे

 

    


No comments:

Post a Comment