Friday, 31 May 2024

अनावश्यक खर्च टाळता येतात...

  


 


अनावश्यक खर्च टाळता येतात...

#rasraj#खर्च#संसार#

 

    मोह आणि आसक्ती माणसाला सरळ सात्विक जीवन जगण्यापासून परावृत्त करतात हेच खरे. आजकाल सोशल मीडियावर होणाऱ्या जाहिरात बाजीमुळे नको तिथे लक्ष जाते आणि अमाप खर्च होत जातो. हे खरे असले तरी स्वतः चा स्वतःवर संयम असला की बऱ्याच गोष्टी टाळता येतात.

     पूर्वीच्या काळी कोंड्याचा मांडा करून काटकसर केली जात असे. म्हणजे घरात जे आहे तेच करून खाणे असा अलिखित नियम होता. आवड निवड असा काही प्रकार नसायचा. तरीसुद्धा समाधान असायचे. एकटाच कमवणारा असल्याने  कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी घरातल्या गृहिणीला काटकसर करून संसार करावा लागत असे. काडी काडी जमवून मुलांना सुशिक्षित करण्या सोबतच सुसंस्कृत करण्याची हातोटी पूर्वीच्या स्त्रियांमध्ये होती. 

     काळाची गरज म्हणून स्त्री उंबरठया बाहेर पडली. हातात पैसा खेळू लागला आणि भरीसभर पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीचा पगडा, विविध प्रलोभने, माणसाला खर्च करायला भाग पाडू लागलीत. पैसा आहे म्हणून खर्च करावाच का? हा प्रश्न कधीच पडत नाही कारण तो खर्च करण्यासाठीच असतो असे गृहितक झाले आहे जणू.  पूर्वीच्या काळी ज्या आवश्यक गरजा आहेत त्याच पूर्ण करण्या कडे कल होता. पण आज आवश्यकता नसेल तरी खरेदी (शॉपिंग) केले जाते. कधी हौस म्हणून तर कधी प्रलोभनांना बळी पडून. 

     कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलंमुली फॅशन म्हणून वाट्टेल तसे कपडे खरेदी करतात. ज्याची इतकी आवश्यकता पण नसते. तिच्याजवळ इतके आहेत तर माझ्याजवळ पण हवेत असा अट्टाहास असतो आणि पालक तो पुरवतात. का? कशासाठी? पालकांनी जर सांगितले नाही गरज इतक्या कपड्यांची तर काहीतरी परिणाम होऊ शकेल एखाद वेळेस. लहानपणा पासूनच या सवयी लावल्या तर फायदा होईलच. कपड्यांसारखेच चपलांचे जोड असतात. प्रत्येक ड्रेस वर मॅचींग हवे. या सगळ्या अनावश्यक गोष्टी टाळता येऊ शकतात. ज्याने खर्च कमी व्हायला मदत होईल.

     मॉल संस्कृती ने तर अक्षरशः धिंगाणा घातला आहे. एकदा मॉल मध्ये गेले की नको असलेल्या बऱ्याच गोष्टी घेतल्या जातात. घ्यायला गेलो असतो एक अन् घेऊन येतो दहा वस्तू ज्याची खरच गरज आहे का याचा विचार करावा असे का वाटत नाही. असूया. सगळ्यांकडे आहे मला पण हवे. या विचारातून अनाठायी खर्च होतो आहे याकडे हेतू पुरस्पर कानाडोळा केला जातो.

     असेच सौंदर्य प्रसाधने. मॉल मध्ये किंवा इतर कुठेही इतकी महाग असतात की सर्वसामान्य लोकांना परवडणारी नसतात. तरीही ती घेतली जातात. विशेष म्हणजे या सौंदर्य प्रसाधनांमुळे मूळचे सात्विक सौंदर्य नष्ट होते आहे हे कळत नाही. एखादे दुसरे घ्यावे स्टेटस मेन्टेन करण्यासाठी. भरमसाठ घेतली जातात. वाट्टेल तसा खर्च यावर होतो. हा खर्च अनावश्यक आहे. समजा यातून पैसे वाचले तर छान पुस्तके खरेदी करून वाचावीत. त्यामुळे ज्ञानात भर पडेल. पण आज कोणाला ते नको आहे. याला अपवाद असू शकतील. 

     किराणा दुकान आज असे राहिलेच नाही की काय असे वाटते. सुपर शॉपी मुळे यादीतील वस्तू सोबत यादी बाहेरच्या ही वस्तू घेतल्या जातात. रेडी टू कुक या बद्दल तर काही बोलणेच खुंटावे. आयते मिळते आहे न घेऊन घेऊ. वेळ कुठे आहे करायला. पण पासष्ट रुपयाचे बटाटा पराठा चे पाकीट आणले तर त्यामध्ये फक्त आठ पराठे झाले. तेच जर घरी केले असते तर पासष्ट रुपयात तीन चार वेळा आठ पराठे झाले असते. किती खर्च वाचला असता. आवड असली की सवड मिळते हे खरे जरी असले तरी काटकसर करून संसार करण्याची कला अवगत असली की चार पैसे गाठी बांधले जातात असा सरळ सोपा विचार का येत नाही. 

     किती अन् काय केले म्हणजे संसार काटकसरीचा होऊन अडीअडचणीच्या वेळी पैसा उपयोगी पडेल याचा सारासार विवेक जागृत ठेवून जर खर्च केला तर संसारात आनंदी आनंद निर्माण होईल यात तिळमात्र शंका नाही. फक्त थोडा विवेक आणि विचार करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी लागेल. अगदी सोपी आहे ही सवय लावणे फक्त स्वतःची तयारी हवी......


रसिका राजीव हिंगे

Wednesday, 22 May 2024

जागतिक वाढते तापमान एक समस्या

 



जागतिक वाढते तापमान एक समस्या

#rasraj#तापमान#हवामान#पृथ्वी#

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।

     जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी हा अभंग लिहिला कारण त्यांना वृक्षांचे महत्व पटले होते. ज्या गोष्टीचे महत्त्व कळते ती गोष्ट आपल्या जीवाभावाची असते यात शंका नाही. अलीकडच्या काळात रानावनांचे महत्व किंवा उपयोग म्हणू, फक्त जंगल सफारी एन्जॉय करण्यासाठी होतो आहे. त्यातील वनस्पती, पशू, प्राणी, पक्षी यांचे दृष्टीसुख घेण्या पुरसे होतो की काय असे वाटायला लागले आहे. बेसुमार जंगल तोड, वृक्ष तोड यामुळे वातावरणातील गारवा, थंडावा हरवत चालला आहे. परिणाम पृथ्वीचे तापमान वाढते आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. पण ते ओरबाडून घेतले तर तोही कोपेलच. त्याला पण राग येतोच की. 

     स्वतः च्या सुखासाठी विज्ञानाच्या टिमक्या मिरवत जी निसर्गाची अवहेलना केली जात आहे त्याचे परिणाम आपण सगळेच भोगत आहोत.  ऋतुचक्र बदलले का? नेमेची येतो पावसाळा ही म्हण आज खोटी का ठरते आहे? याचा विचार करून पाहिला तरी इतकी भयानक परिस्थिती समोर उभी राहते की क्षणात मनातला विचार झटकून टाकल्या जातो. 

     पाणी जपून वापरा असे नुसते म्हटल्याने खरेच पाणी जपून वापरल्या जाईल का? मी एकट्याने जास्त पाणी वापरल्याने काय फरक पडणार आहे असा प्रत्येक जण विचार करतो अन् हवे तसे वागत राहतो. फक्त स्वतः पुरसे जगणे मानव शिकला आहे. थोडाच विचार करा, आज मला पाणी मिळाले, उद्या माझ्या बाळाला पाणी नाही मिळाले तर काय होईल?  पाण्याचे साठे भराभर संपत आहेत, वेळेवर पाऊस पडत नाही, कुठे ओला दुष्काळ तर कुठे कोरडा दुष्काळ, कशामुळे? पृथ्वीचे वाढलेले तापमान.  बाष्प तयार झाले तरच त्याचे ढग तयार होतील अन् वारा लागून पाऊस पडेल. पण बाष्प तयार होण्यासाठी आधी पाणी तर हवे न पृथ्वीवर. हे दुष्ट चक्र कुठेतरी तर थांबायलाच हवे. मानव निर्मित आहेत ही संकटे. 

     प्रगतीच्या नावाखाली विविध प्रकल्प राबवले जातात. रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी विषारी वायूची निर्मिती करावी लागते. हे करत असताना हा विषारी वायू वातावरणात पसरत जातो. त्याचे दूरगामी परिणाम होऊन धरणी माय गुदमरते आहे. समुद्र मंथन करताना मंथनातून विष निघाले त्यावेळी भगवान शिवाने ते ग्रहण केले अन् सगळा अनर्थ टळला.  जर भगवान शिव यावे असे वाटत असेल तर प्रगती व्हावी पण निसर्गाचे रक्षण हे ऐरणी वर हवे म्हणजे प्राधान्याने करायला हवे. तरच मानव टिकू शकेल.       

औद्योगिक क्रांती करण्याच्या नादात मोठमोठ्या कारखान्यांची निर्मिती झाली. त्यातून निर्माण होणाऱ्या घातक वायू आणि कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण वाढले की हरित गृह परिणाम होतो. हरित वायू परिणामा मुळे तापमानात वाढ झाली. अनेक शास्त्रज्ञांनी हरित वायूंचे परिणाम तापमान वाढते आहे असे सांगितले आहे. मानव निर्मित कार्बन डायऑक्साइड चे प्रक्रियेमुळे पृथ्वी तापते आहे. कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण नियंत्रित केले नाही तर फार मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

     या विघातक वायूमुळे पृथ्वीच्या ओझोन वायूच्या थराला धक्का बसतो आहे. ओझोन वायूचा थर सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून रक्षण करतो. हा थरच जर कमी झाला किंवा त्याला भगदाड पडले तर हे सूर्याचे किरण पृथ्वीला किती तापवतील विचार करा. हे तापमान सहन न झाल्यामुळे कितीतरी प्रजाती नष्ट होतील. त्यामुळे रोगराई पसरेल, आताच आपण कोरोना सारख्या राक्षसासी झुंजलो आहे. तापमान वाढले तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे, खाऱ्या पाण्याच्या प्रवाहात शेती करणे कठीण होईल. विचार करू या, कारण विचारांनीच ज्ञान मिळतं. 

     निसर्गाचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य समजून त्याची निगा राखली तर तो ही त्याच्या स्वभावा नुसार भरभरून देणार आहे हे लक्षात ठेवावे. आपली वनराई, पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, थोडक्यात आपल्या निसर्ग संपत्तीचे रक्षण करणे हेच सत्य आहे त्रिवार सत्य आहे. तरच आणि तरच आपला तरणोपाय आहे......


©️®️रसिका राजीव हिंगे 

      


     

Sunday, 12 May 2024

अट्टाहास दरवळण्याचा...





फुलला होता अंगणात

शुभ्र धवल मनमोहक..

अन् गंधभारला पण.

वायू सुद्धा सुखावला...

त्याचा गंध...मिरविण्यात

आसमंत सुगंधित झाला

कणकण दरवळला...

सृष्टी हर्षली.....अन्

मोहित झाली त्या गंधावर...

ऋतुराज वसंत आल्याची..

नांदी होती ही....

काळ्याभोर कुंतली ऐटीत 

विराजमान झालेला शुभ्रसा गजरा...

मन वेधून घेणारा.

रम्य कैलासशिखरी 

पिनाकपाणी तिष्ठला...

आदिशक्ती केव्हा या फुलांचा

भार मला अर्पण करेल...

अपर्णेची वाटुली पहात होता...

ती आली....क्षणात तिने...

ओंजळ रीती केली तिच्या

प्राणसख्याच्या चरणांवर...

अन् मोगरा ही थरारला....

कृतार्थ झाला... महेशाच्या

चरणी स्थिरावून... सार्थक

झाले उमलण्याचे, फुलण्याचे....

आता निर्माल्य झाले तरी....

तरी दुःख नव्हते....

शिवशक्तीचा सहवास म्हणजे

मोक्ष निश्चित आहे...

याच साठी होता अट्टाहास...

दरवळण्याचा... गंधाळण्याचा...


रसिका राजीव हिंगे 







Friday, 3 May 2024

रूढी आणि परंपरा

रूढी आणि परंपरा


     पहाटेचे अभ्यंगस्नान, तेलाचा दरवळ उटण्याचा सुगंध पदार्थांची रेलचेल, फटाक्यांची आतषबाजी अशी झाली दिवाळी साजरी चार दिवस परंपरेनुसार पारंपरिकपणे. सगळे कुळकुलाचार सांभाळत. लेकीचे माहेरपण करतांना स्वतःचे माहेर लक्षातच रहात नाही. जसे आईने केले तसेच पुढे ही परंपरा सुरू असते. रूढी मनात घर करून बसतात आणि त्यानुसार परंपरा पाळल्या जातात, मनात भीती घेऊन किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा दबाव! म्हणण्यापेक्षा धाक यामुळे असेल कदाचित. 

     काळानुरूप बदल होतात आणि ते अपेक्षित ही आहेत. आजच्या सारखाच उद्या कुठे असतो. नव्हे या क्षणासारखा पुढचा क्षण देखील नसतो. त्यामुळे ज्या रीतीभाती आहेत, रूढी आहेत त्या जपाव्यात पण शास्त्रात सांगितल्या नुसार जे योग्य आहे ते करावे. आपले शास्त्र इतके पुरातन आहे की त्यामध्ये जीवन जगताना जे आवश्यक आहे तेच सांगितले आहे. जशा चालू आहेत तशाच चालू ठेवाव्यात. कुणीतरी एखादा तर यातून कशी न काही उचलत असेलच. उगाच आपल्या संस्कृतीची टिंगल न करता ज्याला जे रुचेल,पचेल ते त्याने घ्यावे. म्हणून तरी या रूढी आणि परंपरा, रीतिभाती पुढे अशाच चालू राहाव्यात.

     अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या परंपरा म्हणून पुढे चालविल्या जातात. एखादी त्यावेळेसच्या काळानुसार केल्या गेलीली गोष्ट तीच पुढे तशीच चालू राहते, त्यात बदल होत नाहीत. आता महालक्ष्मी हा सण. प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. भाव तोच असला तरी साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. सुरुवात जिथून झाली त्यावेळी जी परिस्थिती असेल, जे उपलब्ध असेल त्याचा उपयोग करून आपली भक्ती, श्रद्धा आपण जोपासत असतो. त्यावेळी महालक्ष्मी चे आवाहन करताना त्यादिवशी भाकरी आणि मेथीची भाजी असेल तोच नैवेद्य दाखवला. कारण अंबाबाई म्हणजे माहेरवाशीण  घरी आली तर तिचे आगत स्वागत करायला हवे हा साधा भोळा भाव मनात. झाले तिथून सुरू झाले आमच्याकडे भाकरी आणि मेथीची भाजीच नैवेद्याला असते. मला थोडक्यात हेच सांगायचे आहे की जसे आणि जे उपलब्ध असेल त्याने सण साजरा करावा. त्यात काळानुसार घरातल्या कर्त्या स्त्री च्या म्हणण्यानुसार बदल घडत जातात आणि ह्याच परंपरा आहे असे मानल्या जातात. आज जर तुम्ही तुमच्या वेळेनुसार पंच पक्वान्न जर वाढले तर देवी खाणार नाही का? अहो ती तर जगन् माय आहे. स्वतःच्या लेकरावर ती रागे भरेल का कोपेल का? आधी कुलाचार म्हणजे काय? ते का करतात, ह्या कुलाचाराच्या, सणांच्या परंपरा का सुरू झाल्या याचे ज्ञान आपल्या पुढील पिढीला जर दिले गेले न तर आपल्यापेक्षाही ही पिढी चांगल्या रूढी आणि परंपरा जोपासतील यात तिळमात्र शंका नाही. कुलदेवतेचे स्मरण व्हावे, तिची आपल्यावर कृपा राहावी हीच एक माफक अपेक्षा आहेत आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या परंपरेच्या मागे.  मग आपण ती कशी करतो यापेक्षा ती परंपरा पाळतो हे महत्वाचे आहे. 

     श्राद्ध पक्ष या बाबतीत पण तेच. आपल्या पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांचं स्मरण करणे. शास्त्रात सांगितले म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी अनुभवाच्या कसोटीवर शास्त्र नियम लिहिले आहेत. पिंडदान करायचे म्हणजे ज्यावेळेस ते गेले ते स्वतः इथे येत नाहीत तर पिंडदान करण्याच्या वेळी ते ज्या जन्मात असतात तिथून ते येतात अन् आपली सेवा पिंडदान स्वीकारतात. असे अगदी अधिकारी असलेल्या गुरुजींनी आम्हाला गोकर्ण  महाबळेश्वर येथे सांगितले. शास्त्राला आव्हान देऊ नये असे असले तरी पिंडदान याला पर्याय अन्नदान नाही असेही ते गुरुजी म्हणाले. अन्नदान हे पुण्यकर्म निश्चित आहे. सत्कर्म आहे अन्नदान करणे. वेळ मिळत नाही ही सबब असली तरी एक पंधरावीस मिनिटांचे तर्पण केले तरी आपले पूर्वज संतुष्ट होतात. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतात. फक्त डोळसपणे ते पाहता आले तर परंपरा आणि रुढीचे ओझे वाटणार नाही. महत्वाचे म्हणजे का करायचे याचे ज्ञान व्हायला हवे. वयोमानानुसार किंवा त्यावेळच्या परिस्थितीनुसार एखादी क्रिया घडली तर तीच पुढे चालत येते. त्यामागचं शास्त्रीय कारण समजून घेतले तर नव्या रुपात जुन्याच रूढी आणि परंपरा आपल्या समोर येतील येतील येतीलच....


रसिका राजीव हिंगे