Friday, 20 February 2026

अंदमान

 



अंदमान ......


     काही गोष्टी ठरवाव्या लागतात तर काही न ठरवता घडून जातात. पण ज्या वारंवार ठरवून सुद्धा लवकर घडत नाही किंवा पूर्ण होत नाहीत त्यासाठी पुण्याचा ठेवा किंवा पुण्याचे संचित, गाठोडे असावे लागते हे अगदी १००%खरे आहे याचा प्रत्यय मला घेता आला. सुमारे दहा वर्षापूवी ठरलेली अंदमान यात्रा आता २०डिसेंबर २०२५ मध्ये करता यावी म्हणजे जेव्हा त्यासाठी माझा पुण्य संचय झाला असावा तेव्हाच हे घडून आले. नाहीतर वंदनीय सावरकर  यांची पावन चरणकमले ज्या भूमीला लागलीत तेथली विभूती झालेली माती भाळी लावण्याचे भाग्य लाभले नसते.

     सावरकर शब्द उच्चारला तरी सारा देह अभिमानाने फुलून येतो. देहाकडून देवाकडे जातांना, मध्ये देश लागतो..! याचे भान असलेले मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावरकर. असे फक्त सांगितले नाही तर तसे ते जगले, अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा एक आयाम, आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला.  

     पोर्टब्लेयर नव्हे श्री विजया पुरम मधील सेल्युलर जेल मध्ये जेव्हा पाय ठेवला तेव्हा असंख्य भावनांचा कल्लोळ मनात माजला होता. काय आणि किती पाहू, किती साठवू अन् आठवू असे झाले होते. तेथील प्रदर्शन पाहताना, वाचताना केव्हा डोळ्यातून पाणी वाहायला लागले कळले नाही. कसे राहिले असतील सावरकर इथे. बॅरिस्टर झालेले तात्या जेव्हा कैद्याचे कपडे अंगावर चढवत असतील तेव्हा त्याच्या मनात किती कालवाकालव झाली असेल, कोणते विचार आले असतील. याच बंदिवानाच्या कपड्यात आपले प्रेत काढले जाईल कदाचित बाहेर. देशप्रेम इतके पराकोटीचे होते की त्यासाठी काहीही सहन करायला तयार होते. पन्नास वर्षीची काळया पाण्याची शिक्षा झाली तेव्हा ते मुंबईतील डोंगरीच्या कारागृहात होते. सक्त मजुरी ची शिक्षा. आयुष्यच एक काथ्याकुट आहे असे समजून दिलेली शिक्षा आनंदाने स्वीकारली. कोणत्याही दुःखाचा एकदा स्वीकार केला की त्याचा त्रास होत नाही. आता दुःख तरी कसे म्हणावे! देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीही म्हणजे अगदी काहीही करायला तयार असणारे हे वेडे देशभक्त यांना दुःख म्हणजे देश पारतंत्र भोगतो आहे. सेल्युलर जेलचा जेलर बारी याचे कारण नसताना केवळ राग चीड यातून उद्भवलेल्या संतापाने मारलेले चाबकाचे फटके कसे सहन केले असतील याला एकच कारण देहासक्ती नव्हतीच. देह क्षणभंगुर आहे आणि माझा देश कल्पन्तापर्यंत आहे हीच भावना फक्त. देशाच्या प्रेमापुढे स्वतःच्या देहाचा, यातनांचा कधीच विचार केला नाही. बारी यातना देण्यात माहीर होता तर सावरकर म्हणजे सहनशीलतेची पराकाष्ठा. पराकाष्ठाच म्हणावी लागेल नाहीतर इतक्या कष्टमय यातना होत असताना कमला सारखे महाकाव्य कसे स्फुरले असते. पंचमहाभूतांचा देह शेवटी पंचमहाभूता मध्येच मिसळून जाणार आहे आणि आत्मा अमर राहील या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी सेल्युलर जेलमधील अकरा वर्षे काढली होती. दांडगी हिंमत आणि कुणाचेच भय नसलेले सावरकर हे वेगळेच रसायन होते हे अजूनही समजत नाही म्हणजे ज्यांना समजत नाही त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. 

     सावरकरांच्या कोठडीत गेल्यावर आधी चप्पल काढू पायातील की त्यांना दंडवत घालू असे झाले होते. डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहत होत्या, भिंतीकडे लक्ष गेले इथेच कमला लिहिली. वेडे मन त्या भीतीवर अक्षरे शोधू लागले. नाहीच शब्दबद्ध करता येत त्यावेळच्या मनातल्या भावना. एकच विचार होता मनात तात्यांची कोठडी पहायला मिळाली, तिथे नतमस्तक होता आले. हीच ती पुण्याई जी मला त्यांच्या चरणांची धूळ विभूती म्हणून भाळी मिरवता आली. स्वातंत्रवीर सावरकरांना त्रिवार मुजरा करूनच पाय अक्षरशः बाहेर ओढले. 


रसिका राजीव हिंगे 

     

Wednesday, 18 February 2026

  आनंदाचे डोही 


अर्थ स्वरूपाचा 


स्वप्न नगरीत सापडेल का डोह वाहता आनंदाचा

फिरुनी येऊ गंधर्व नगर दिसेल का मज गाव सुखाचा


जिकडे तिकडे आरसपाणी सौंदर्यांची मुक्त उधळण 

परी कळेना भय कोणाचे श्रद्धेचेही दिसे विस्मरण


होते नांदत काम क्रोध मोह तिथे सर्वत्र  मिळून सारे 

माझे माझे मी पणाचेच उभारलेले उंच मनोरे


विसरुन सारे धावत सुटले ओळखीचे न दिसले मजला

हताश होउनि पाहू लागले चहुकडे ग ज्याला त्याला


अकस्मात मग धावत आले श्रीगुरु मज भेटायासी

बाळे कुठे भरकटली तू आलीस काय बघावयासी 


जग हे सारे मिथ्या आहे ध्यास घेइ तू नित्यत्वाचा

तुझ्या अंतरी भरला बाळा डोह खळाळत आनंदाचा


काय कळेना श्रीगुरुराया तूच आधार या जगताचा

सान लेकरू तुमचे नाथा अर्थ कळू दे या स्वरुपाचा 


रसिका राजीव हिंगे 




खेळ प्रारब्धाचा




 खेळ प्रारब्धाचा


बंधन कैसे तुजला आले लावू नकोस बोल कोणता

अश्रू येती पापणकाठी किती रोखुनी धरशील अता llधृll


इथे न चाले सत्ता अपुली प्रारब्धाचा भोग असे हा 

ईश्वराधीन आहे सगळे फळ कर्माचे नियम नित्य हा

आनंदाने स्विकार सगळे आवर सावर माये ममता

अश्रू येती पापणकाठी किती रोखुनी धरशील अता ll1ll 


कोण आहेस कुठून आली कवण गावा सांगशील का?

संचिताचेच देणे सगळे मनाचे खेळ खेळतेस का?

नर जन्माचे सार्थक व्हाया जाण अविद्या नि अज्ञानता 

अश्रू येती पापणकाठी किती रोखुनी धरशील अता ll2ll


अवडंबर हे संसाराचे किती माजले जागोजागी

ओळखले तू ब्रह्म सावळे मग सांग कसे आम्ही अभागी

जाणूनी घे ईश्वर माया श्रीगुरु चरणी हो शरणागता 

अश्रू येती पापणकाठी किती रोखुनी धरशील अता ll3ll


बंधन कैसे तुजला आले लावू नकोस बोल कोणता

अश्रू येती पापणकाठी किती रोखुनी धरशील अता 


रसिका राजीव हिंगे 

Friday, 7 November 2025

शुभ सकाळ

 



ये रविराजा झडकरी अता

बघ रे सृष्टी अधीर झाली

नवपरिणीता जणू भासते

तुज भेटाया सजली नटली


हिरवाईची पैठणी ल्याली

दवबिंदूंचे साज चमचमती 

लज्जेची लाली गाली येता

प्रतिबिंब पडे क्षितिजावरती


गोड पसारा सृष्टीचा या

कैसी होई भूल जीवास 

वर्म कळेना सत्यत्त्वाचे

श्रीगुरु चरणी ये आश्रयास


जाणून घेता एकच तत्वा 

कळे आकळे सारे सारे

मिथ्यत्त्वाचा होई निरास 

श्रीगुरु दावी आत्मसुखा रे 


रसिका राजीव हिंगे 





Tuesday, 9 September 2025

सद्गुरू कृपेने जे ऐकले, वाचले, कळले तेच लिहिले.


 


 सद्गुरू कृपेने जे ऐकले, वाचले, कळले तेच लिहिले.



सर्व येथे राहणार l काही न येई बरोबर l 

सत्कर्म आणि सदाचार l हेचि जीवाचे सांगाती ll 


     श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्रीगुरुचरित्रातील ही ओवी, ह्या ओवीची ओळख आधी श्रीगुरूंनी करून दिलेली, नंतर कळले संक्षिप्त श्रीगुरुचरित्रातील ही ओवी आहे. श्रीगुरु कायम सांगत असतात. नित्य नियमाने जणू या ओळींची आठवण करून देत असतात. हे सद्गुरुंचे सांगणे, नुसतेच सांगणे नाही तर वारंवार सांगणे..मनावर ठसविणे... सांगणे म्हणजे शिकवणे...सद्गुरू शिष्याला शिकवतात. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शिकवतात. आयुष्याला दिशा देणारे वचन. वास्तवाची जाणीव करून देणारे शब्द. श्रीगुरूंच्या  मुखातून आलेला प्रत्येक शब्द म्हणजे वेदवाक्य. श्रीगुरु सांगतील तेच प्रमाण. हा भवसागर तरुन जायचा असेल तर श्रीगुरु सांगतील तेच, तेवढेच आणि तस्सेच वागले तरच शक्य आहे. केवळ भक्ताच्या कल्याणासाठीच वारंवार एकच गोष्ट प्राधान्याने श्रीगुरु सांगतात. असे असले तरी श्रीगुरु असे कर तसे कर असं काही सांगत नाही पण अप्रत्यक्ष पणे इशारा करतात. म्हणजे  hint पास करतात. ते ज्याला कळले तो हा भवसागर सहज तरुन जाईल. सत्कर्म करायचे, सदाचरण म्हणजे काय याची जाणीव सद्गुरू करून देतातच. त्यांच्या शब्दातला गर्भितार्थ कळायला हवा. 

     मान, सन्मान, यश, किर्ती, धन दौलत, नात्यांचे बंध  सगळे इथेच सोडून जायचे आहे. कारण ते नाशिवंत आहे. यातील काहीही सोबत नेता येत नाही. सोबत येणार आहे ते फक्त सत्कर्म आणि सदाचार. 

     कर्म याचा साधा सरळ अर्थ म्हणजे काम करणे. जे जे काम किंवा क्रिया करतो ते सगळे कर्म होय. कर्माशिवाय कोणताही मनुष्य राहू शकत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाला कर्म करावेच लागते. कारण प्रत्येक जन्माला आलेला जीव त्रिगुणांच्या स्वाधीन आहे, त्यामुळे त्रिगुण कर्म करायला भाग पाडतातच. शास्त्रानुसार प्रत्येक क्षण हा सत्कर्मातच घालवायला हवा. प्रत्येक कर्म  निष्काम भावनेने केलेले असावे. कर्म करून त्याच्या फळाची आसक्ती न ठेवता केलेले कर्म नैष्कर्म होय. असे शास्त्रविहित कर्म म्हणजे सत्कर्म, सदाचरण. जे कर्म आपल्या मनाला आनंद, समाधान देतात, ज्याच्यामुळे इतरांचे कल्याण होते ते सत्कर्म. स्वतः करता केलेले नसून केवळ दुसऱ्या करता केलेले असते ते सत्कर्म. केलेल्या कर्माचे कर्तेपण स्वतःकडे न घेता म्हणजे निष्काम भावनेने केलेले ते सत्कर्म. म्हणजेच चांगल्या कर्माला शास्त्रीय भाषेत सत्कर्म म्हणतात. समजा बाहेर निघायच्या वेळी एखादा अतिथी आला तर त्याचे स्वागत आनंदानेच करता आले पाहिजे. अतिथी म्हणजे तिथी, वार, वेळ न सांगता आलेला. आता कशाला आले हे अवेळी, छान बाहेर जायचं प्लॅन होता सगळा फिस्कटला यांच्यामुळे असा विचार मनात सुद्धा येता कामा नये. मनात जरी विचार आला तरी त्याचा ओरखडा उठतोच, ईश्वर दरबारी त्यांची नोंद होतेच. त्यांची खाण्या राहण्याची व्यवस्था नीट केली तर ते ही प्रसन्न होतात आणि आपल्याला ही समाधान मिळते. मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता केलेले कर्म हेच शास्त्र विहित सत्कर्म, सदाचरण. आता नोकरी व्यवसायातील कर्मे निष्काम करणे शक्य नाही कारण फळ मिळाले नाही तर प्रपंच कसा चालेल? इथे फळाची अपेक्षा आहेच पण फसवणूक, लुबाडणूक करून व्यवसायात्मक कर्म नको. अट्टाहासाने कुणाला लुबाडले असे नको. "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" हे लक्षात ठेवता आले पाहिजे तरच ते सत्कर्म होईल. मोठमोठे हॉस्पिटल बांधणे, शाळा बांधणे, अन्नछत्र, पाणपोई चालवणे, शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थ्याला मदत करणे हे सत्कर्मच आहेत. पण मी केले, मी बांधले, माझ्यामुळे झाले असे मी मी माझे माझे मिरवून कर्मयोगी वगैरे बिरुदे स्वतःला लावून घेतात. त्यामुळे निष्कामता जपल्या जात नाही. अशी सकाम कर्म केली की त्याचे फळ ही तसेच तात्पुरते आहे. फळाची आशा, अपेक्षा  केली की त्याचा काहीही उपयोग होत नाही. मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण, त्यांच्यावर आपल्या आचरणातून होणारे संस्कार हे उत्तमरित्या व्हावे हे पालकांचे कर्तव्य आहे. यामध्ये कुठेही आशा, अपेक्षा न ठेवता करता यावे. म्हातारपणाची काठी म्हणून जर मुलाकडे पाहिले अन् तसे झाले नाहीतर जे दुःख होते ते शब्दातीत आहे. अपेक्षा केली की अपेक्षा भंग ठरलेलाच आहे. आईवडिलांनी व्यवस्थित संगोपन केल्यावरही जर मुलाने सांभाळले नाही तर हे प्रारब्ध आहे. अपेक्षा ठेवलीच नाही तर दुःख होतच नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कर्म ठरवून दिलेले आहेत ती करावीच लागतात किंवा आपण स्वतः स्वीकारलेली, पत्करलेली कर्मे निभावून नेण्यातच इति कर्तव्यता आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी सांगितलेच आहे, " " ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालंक्षीणे पुण्य मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥"  सकाम भावनेने वेदविहित आणि  यज्ञादि कर्मे करणारे, भगवंताची उपासना करून पापमुक्त लोक स्वर्गप्राप्तीच्या कामनेने कर्म करतात. इंद्रलोकात दिव्य भोग भोगतात. पण पुण्याचा संचय संपला की पुन्हा तीन वेदात सांगितलेले कर्माचे पालन  करून हे सकाम कर्मी यांना मृत्युलोकात यावेच लागते. म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका नाहीच. म्हणून निष्काम भावनेने कर्म केले की बंधनात अडकत नाही. हेच सद्गुरूंना सांगायचे आहे. कर्म कर पण कर्मफळाची अपेक्षा करू नकोस ह्यालाच सत्कर्म म्हणतात. असा अप्रत्यक्ष इशारा सद्गुरूंनी दिला आहे. 

     ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, " विधीते पाळीत l निषेधाते गाळीत l मज देऊनि जाळीत l कर्मफळे ll  विधीचे पालन म्हणजे त्याग. कर्मफळ मला(भगवंताला) अर्पण कर म्हणजे ती निःशेष होतील. वेदविहित, शास्त्रानुसार कर्म करायचे, कर्मफळाची आशा बाळगायची नाही आणि कर्तृत्वाची अपेक्षा करायची नाही हे कर्मसिद्धांत आहे. या सिद्धांतावर आधारित कर्म केले तर ते निष्कामच होईल. हेच सांगायचे आहे श्रीगुरूंना. निष्काम भावनेने कर्म केले की चित्त शुद्ध होईल. "सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।" सुख दुःख, यश अपयश, लाभ हानी, कीर्ती अकिर्ती याचा सम पातळीवर विचार केला म्हणजे सुखाने न हुरळून जाता आणि दुःखाने होरपळून न जाता चित्ताची समाधानता  ठेवता आली तर निष्कामता जोपासल्या जाईल. प्रत्येक निष्काम कर्म ही भगवंताची पूजा आहे या भावनेने केले तर भगवंत प्रसन्न होतो. त्यामुळे  मन प्रसन्न होऊन बुद्धी स्थिर होते. तसेच अखंड नामस्मरण. माझ्या श्रीगुरूंनी सांगितले आहे, नामस्मरणाचे मोठे मोठे गाठोडे बांधा, तेच सोबत येणार आहे. अखंड अनुसंधान ठेवायचे आहे भगवंताशी. नामस्मरण हाच सदाचार आहे. जीवनात उपासनेचे अनन्य साधारण महत्व श्रीगुरु अधोरेखीत करून देतात. निष्काम उपासनेचे बीज सद्गुरू पेरून देतात. त्याला खत पाणी घालण्याची जबाबदारी शिष्याची आहे. कारण क्रियामण कर्म करण्याचे अधिकार मानवाला प्रदान केले आहेत ईश्वराने. श्रद्धेने आणि समर्पण भावनेनी केलेली निष्काम उपासना ही चित्त शांत करते. शुद्ध आणि शांत चित्त झाले म्हणजे सदाचरण आपोआप घडेल. सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. श्रीगुरूंना ज्ञात आहे हा अहंकार जाता जाणार नाही. म्हणूनच सत्कर्म आणि सदाचरण सांगितले. सत्कर्म आणि सदाचरण केव्हा घडेल चित्त शुद्ध आणि शांत झाल्यावर. यासाठी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना सांगितली. शुद्ध, शांत चित्ताने आणि अभ्यासाने, सततच्या सरावाने हळूहळू  षडरिपूंना आवर घालता येईल. अहंकाराचे श्रीगुरूंच्या चरणी अनन्य शरणागतीने समर्पण केले की अंतःकरण स्थिर होईल. 

     आतापर्यंत शिष्याने श्रीगुरूंचे बोट धरलेले असते, पण जेव्हा निष्काम कर्म आणि निष्काम उपासना यामुळे चित्त शुद्ध आणि शांत झालेले आहे, अंतःकरण स्थिर झाले म्हणजे श्रीगुरु शिष्याचे बोट धरतात, अन् अज्ञानाचे आलेले आवरण सारून मोक्षाची वाट दाखवतात. नुसती दाखवत नाही तर सोबत येतात.  श्रीगुरूंच्या अनुग्रहाशिवाय, त्यांच्या कृपेशिवाय मोक्ष गवसत नाही. फक्त निष्कामता आणि श्रीगुरु चरणी अनन्य शरणागती हवी म्हणजे सपशेल शरणागती...बस. कर्म आणि उपासनेने मोक्ष मिळत नाही हे खरे असले तरी कर्माशिवाय आणि उपासनेशिवाय मोक्षाची वाट गवसत नाही असा श्रीगुरूंनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे किंवा hint पास केली आहे. 


रसिका राजीव हिंगे 


    

     

     

     

Saturday, 8 February 2025

कनक केशरी सांज लाजरी




गंध बावरा उनाड वारा मुजोर झाला जरा थांब ना

बहरुन आली सांज केशरी अबोल झाली प्रीत साजणा llधृll 


सहवास तुझा हवाहवासा स्पर्श मोहवी तनामनाला

बघ तो रविकर मीलना आतुर सांज मोहरे क्षणाक्षणाला

केशरिया हा गालावरचा कसा सावरू अता सांग ना 

बहरुन आली सांज केशरी अबोल झाली प्रीत साजणा ll1ll 


या नयनांची भाषा बोले  परी आकळे गुज ह्रदयीचे

शब्दांचा तो नाद अनाहत गूढ उकलतो तुझ्या मनीचे

सूरांचाही भाव वेगळा उमलूनी ये नवा तराणा 

बहरुन आली सांज केशरी अबोल झाली प्रीत साजणा ll2ll


कनक केशरी सांज लाजरी उतरुन आली अवनी वरती

दिसे वाटुली घन सावळ्याची लगबग चाले क्षितिजावरती

ऐसी झाली सावळ बाधा मृदुंग वाजे धा धा धिं ना

बहरुन आली सांज केशरी अबोल झाली प्रीत साजणा ll3ll


गंध बावरा उनाड वारा मुजोर झाला जरा थांब ना

बहरुन आली सांज केशरी अबोल झाली प्रीत साजणा 


रसिका राजीव हिंगे 




Wednesday, 30 October 2024

एकच तत्व..

    एकच तत्व..


     रोज सकाळी फिरायला (म्हणजे morning walk) सोबत माझी मैत्रीण असते. आजकाल सगळे जसे भेटले की हाय, हॅलो करतात तसे सकाळी तिची भेट झाली की मी गुरुदेव दत्त असे म्हणते आणि ती जय श्रीराम. तिने जय श्रीराम म्हटले की मी अगदी जणू आठवणीने गुरुदेव दत्त म्हणते. हळूहळू काही दिवसातच मी गुरुदेव दत्त म्हटले की ती पण गुरुदेव दत्त म्हणायला लागली. याची दखल घेतल्या गेली पण लक्षात यायला वेळ लागला. तिला हे लगेच कळले की जय श्रीराम म्हणा की गुरुदेव दत्त म्हणा शेवटी रूपं अनेक असली तरी तो परमात्मा एकच आहे. वेगवेगळ्या रूपात भक्तांच्या हाकेला साद घालण्यास तो पृथ्वीवर अवतार घेतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेच आहे न  "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे"  वास्तविक पाहता अवतरण म्हणजे खाली येणे, खालच्या पातळीवर उतरणे. 

 पण परमात्मा इतका दयाळू आहे हो त्याच्या भक्तांसाठी तो काहीही करायला तयार असतो. फक्त त्याच्या अनुसंधानात राहता आले पाहिजे. रागाने, लोभाने, तिरस्काराने, गमतीने किंवा विनोदाने कोणत्याही परिस्थितीत जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याचेच स्मरण केले तर तो दखल घेतोच घेतो नव्हे घ्यावीच लागते. 

     भक्त प्रल्हादाला किती यातना सहन कराव्या लागल्या पण त्याने नारायण नाम सोडले नाही. पर्वतावरून ढकलून दिले तरी पर्वत नारायण, खोल दरी नारायण, उकळत्या तेलात तळून काढले तरी तेल नारायण, विस्तव नारायण. एका नारायणा वाचून दुसरे काहीच माहिती नाही. त्याच्या साठी प्रगटले न विष्णू खांबातून. असा हा परमात्मा भक्तासाठी काहीही करू शकतो. तुम्ही गुरुदेव दत्त म्हणा की जय श्रीराम म्हणा किंवा अंबाबाईचा गजर करा, एकच तत्व सगळीकडे भरून उरलेले आहे. फक्त ओळखता आले पाहिजे. त्यासाठी एकच सतत अखंड भगवंताचे अनुसंधान ठेवावे लागेल. माझे सद्गुरू म्हणतात, नामाचे इतके गाठोडे करा की ते वजनदार झाले पाहिजे. आजकाल कोणत्याही कामासाठी मोल देऊन काम करून घेण्याची सवय आहे.पण हे नामाचे गाठोडे वजनदार झाले तरी हे इतके अनमोल आहे की त्याची कशाशीच तुलना करता येणार नाही शिवाय प्रत्यक्ष भगवंत  सोबत असेल, सद्गुरू सोबत असतील यात शंका नाही. सद्गुरू सोबत आहेत म्हणजे सगळेच मार्ग, वाटा सुकर, सुलभ होतात.

     एकच तत्व सगळीकडे आहे याची जाणीव झाली की सगळेच सोपे होऊन जाते. जाणीव होणे गरजेचे आहे. जाणीव होण्यासाठी श्रीगुरु चरणी लीन व्हावे, त्यांना सेवावे, भजावे, त्यांचे सारे ऐकावे. अखंड नाम आपोआप घेतल्या जाईल....


रसिका राजीव हिंगे