Monday, 26 December 2022

गीताख्य

 गीताख्य


     कैलासावर शंकर पार्वती बसले आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या विषयावर गप्पा चालल्या आहेत. मध्येच शंकराचे लक्ष आपल्याकडे नाही,कुठेतरी तंद्री लागली आहे हे पार्वतीच्या लक्षात येतं. "कशाचा विचार चालला आहे एवढा? माझ्या बोलण्याकडे तुमचे लक्ष नाही नाथ!" यावर महादेव उत्तरले," गीतेचा विचार करतो आहे." पार्वती क्षणभर हिरमुसते. माझ्यापेक्षा सुंदर कोण असावी बरे ही गीता. "मला कळेल का या गीते विषयी! कोण आहे ही गीता?" अवघ्या विश्वाचे संतुलन राखणारे भोळे शंभूनाथ किंचित हसले अन् म्हणाले," सुंदरी, गीता म्हणजे वासुदेव कृष्णाने कुरुक्षेत्रावर कुंतीपुत्र अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत. ऐन युद्धाच्या वेळी अर्जुनाने गांडीव खाली ठेवले त्यावेळी समर भूमीवर सांगितलेली आहे ही गीता. समस्त विश्वाला तारून नेणारी. प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारी गीता. याविषयी मी विचार करतो आहे." हे ऐकून गौरी म्हणाली," नाथ मला पण सांगा आपले मनातील गीतेविषयी चे विचार."

     गीता! गीता एक धर्मग्रंथ आहे, वैश्विक ग्रंथ आहे. आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सत्याचे परिमाण आहे.  कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यासयोग, सांख्ययोग, भक्तीयोग, मोक्षसंन्यास योग काय नाही या गीतेत. कर्मयोग्याला मार्ग सापडतो, भक्तांना भक्ती दिसते तर योगीजनांना मोक्ष मिळतो. यातील लालित्य पाहून साहित्यिक डोलू लागतात.  सत्व,रज, तम या गुणांचे विवेचन आहे तर श्रध्दा म्हणजे काय ती कशी असावी याचेही ज्ञान होते. सामान्य माणसाला जगण्याची दिशा देणारी, आत्मिक बळ वाढविणारी गीता. सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी जीवनाच्या मार्गावर आणून सोडणारी गीता आहे. सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती, अध्यात्म, वैराग्य,भक्ती,ज्ञान याचे शिक्षण देता देता श्रीकृष्णाने फक्त योग्य मार्गाकडे निर्देश केला आहे. बोट धरून चालत नाही आपल्याबरोबर. आपला मार्ग आपणच चालावा, चालता चालता सत्कर्म करत जा फक्त, फळाची आशा न करता. 

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्‌ ।                 यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्‌ 

     तू जे करशील ते मला अर्पण कर.  कशाला काळजी करतोस. मी आहे हा विश्वास जागवला आहे. विश्वरूप दाखवण्यासाठी आधी अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली. केवढे हे भक्ताचे लाड. भक्त ही तसाच होता जो गीतेच्या माध्यमातून घडत गेला. 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌

     जे भक्त मला अनन्य भावाने भजतात, नित्य निरंतर माझे ध्यान करतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः वाहतो असा निर्वाळा दिला आहे भगवंताने गितेच्या माध्यमातून. यापरिस काय हवे हो. 

     जशी जशी गीता कळत जाईल तसे तसे जीवन सुकर होईल आणि हा भवसागर पार करून निश्चितच मोक्ष प्राप्त होईल हे निर्विवाद सत्य आहे. 

  "खरे आहे नाथ. गीता वाचावी, आचरणात आणावी म्हणजे जगणे किती सहज होईल. पण सातत्य असावे लागेल, प्रत्येक वेळी."

  " गौरी तू जशी नित्य नूतन भासते मला तशीच गीता आहे. जितके वेळा समजून घेशील तितके वेळा ती नवीन काहीतरी प्रदान करेलच. कळलं का गीता कोण ते!"

  शिवशक्तीच्या चेहऱ्यावर फक्त सलज्ज स्मित उमटले.


रसिका राजीव हिंगे 

मंतरलेल्या वाटा

 मंतरलेल्या वाटा


क्षण हळवे क्षण बावरे

साद घालिती मनामनाला

क्षणभंगुर हे जीवन आहे

जगून घ्यावे या जन्माला


गुंफण ऐसी ऋणानुबंधी

कधी नात्यांचा पाश भोवती

नियतीचे ह्या फासे कळेना

कधी नात्यांचा फास सभोवती


विसरुन सारे हेवेदावे

सद्गुरू चरणी लीन व्हावे

भवसागर हा तरून जाण्या

मनात जपले तुलाच द्यावे


आयुष्याच्या वाटेवरती

सडा फुलांचा किंवा काटा

परी होतील समर्पणाने 

या मंतरलेल्या वाटा


रसिका राजीव हिंगे 



हुरहूर मावळत्या संध्येची...

 

हुरहूर मावळत्या संध्येची...

     सांज उतरली निळ्या सागरी
     केशर ल्याली सृष्टी सारी
     रविराजासी निरोप द्याया
     अधीर झाली निशा बावरी
     सांज! म्हणजेच कातरवेळ. दिवस आणि रात्र यांना जोडणारी वेळ. रविराज आपल्या तेजाचा पसारा आवरत निघाला आहे घराकडे.  संध्येला निरोप देण्याची वेळ. तिच्या कपोलांवर रविराजाच्या प्रीतीची लाली पसरली, त्याची आभा पश्चिमेवर उमटली. पश्चिमा केशरिया लेऊन निश्चलपणे संध्येच्या  मनाची  वाढती हुरहूर अनुभवते. चराचरात संधिप्रकाश दाटून आला आहे. अशा कातरवेळी काळ पण थबकतो क्षणभर. भराभर पुढे सरकत नाही. उदासलेपण भरून आहे सारा आसमंत. त्याचे प्रतिबिंब धरेवर पडले. कणाकणास हुरहूर लागून राहिली आहे.
     विहंग पिलाच्या काळजीने घरट्याकडे निघाली तेव्हा त्यांचा चिवचिवाट गूढ भासत होता. धुराळ्याच्या धुक्याचे ढग गोळा झालेले पाहून गोठ्यातला वासरांचा हंबर व्याकुळतेने साद घालत आहे असे जाणवत होते. गवाक्षात उभ्या असलेल्या ललना साजणाची वाटुली पहात अधिकच अधीर झाल्या होत्या. त्या अधीरतेला बांध घालता यावा म्हणून की काय सांजवेळ ही दिवेलागण वेळ असावी. देव्हाऱ्यात देवाजवळ दिवा लावून घरातला अंधाराला बाहेर पिटाळून लावायचे. दिवा लावला की ज्योतीच्या प्रकाशात मनाची हुरहूर कमी होते. बाहेर जरी अंधार असला तरी मनात, हृदयात, घरात लख्ख उजेड असल्यामुळे भीती थोडीफार तरी कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आपसूकच परमेश्वराची प्रार्थना करावीशी वाटते. दिव्याची तेजारती शुभं करोति कल्याणं ओठावर येऊ लागतं, घराघरांतून स्वर येऊ लागतात, नाद  उमटतो, ताल धरल्या जातो. हात आपोआप जोडले जाऊन नतमस्तक होतो आपण त्या जगन्नाथा समोर. हिच शक्ती मनाची घालमेल घालवते, हुरहूर शांतवते, अन् संध्या पण खुदकन हसते. निशा चंद्र चांदणे घेऊन  वेशीवर थांबलेली आहे, संध्या मावळते पण निशा सोबतीस देते, नवे स्वप्न, बघण्यासाठी....

रसिका राजीव हिंगे
19.12.2022
    

ऐक माझ्या मनातले

 ऐक माझ्या मनातले


सांग ना माझिया मना

किती आवरु सावरू

चंचलता सांभाळी तू

व्हावी स्थिरता आधारु 


उधळती पुन्हा पुन्हा

वारू माझ्या विचारांचे

कैसे खेचावे लगाम

तुझ्या वाऱ्याच्या गतीचे


कुठे कुठे नेशी मला

कल्पनेच्या पल्याड तू

उंच आकाशी फिरता

वास्तवाच्या अल्याड तू


ऐक माझ्या मनातले

मन जे तुझ्या अंतरी

गूज ऐक एकदाच

शांत हो हृदयांतरी



रसिका राजीव हिंगे 






चंद्र पौर्णिमेचा हसला गाली

 चंद्र पौर्णिमेचा हसला गाली


गंधाळली रात्र काळी चंद्रकळा ल्याली

अन् हा चंद्र पौर्णिमेचा हसला गाली


चांदण्यांचे सडे शिंपिले तारकांनी

रेखिली रंगावली सुरेख नक्षत्रांनी 

अवकाशीची फुले पाहुनी धवलाली

अन् हा चंद्र पौर्णिमेचा हसला गाली


निळ्या सागरी अवखळ लाटा उचंबळती

पूर्णत्वाचे रुप पाहुनी ये त्यास भरती

लाज बावरी लाट सागरी गे मोहरली

अन् हा चंद्र पौर्णिमेचा हसला गाली


चंद्रा समती प्रीत बावरी सखी साजणी 

रूप लाजरे अधर बोलके लावण्यखणी

अबोल त्याच्या स्पर्शातून चढली लाली

अन् हा चंद्र पौर्णिमेचा हसला गाली


रसिका राजीव हिंगे 


Monday, 19 December 2022

सारूनी पदर धुक्याचा....

 


      आली पहाट सजून

      वाट काढीत भुवर

     पांढुरक्या धुक्यातली

     काळी सावळी सुंदर


     रविराजास घेण्यासाठी अरुणाचा  रथ निघाला. त्याच्या शुभ्र अश्र्वांच्या पायाचा टप टप आवाज लांबून ऐकू येऊ लागला अन् रोहिणीने पदर सावरत चंद्राच्या गळ्यातील आपले चांदण्यांचे हात काढले. दाट काळ्याभोर कुंतली माळलेला नक्षत्रांचा कोमेजलेला गजरा तिच्या धुंदीचा कैफ सांगत होता. रजनीने  तिच्या नयनात घातलेली काजळरेखा पुसट होऊन तिच्या प्रीतीचे गोड संकेत देत होती. तिच्या पायातील मेघ रुपी पैंजण तिची लटकी लगबग पाहून उगाचच छमछमत होते. एकेक चांदणी दवबिंदूचे रुप घेऊन सृष्टीवर पांढुरक्या धुक्यातून वाट काढत विसावत होती. आळसावलेल्या निशा सवे पहाटेच्या प्रहरी पहारा करणारा शुक्रतारा पण निघाला. हळूहळू सप्तर्षी पण पहाटेच्या नित्यकर्म स्नानादी उरकण्यास आकाश गंगेकडे निघालेत. लगेच उषाराणीची लगबग सुरू झाली रविराजाच्या स्वागताची. केशराचे सडे शिंपीत सारा आसमंत सुगंधित केला. पारिजातकाच्या मनगंध पायघड्या अंथरल्या, जाईजुई, चमेलीच्या सुगंधित अत्तराचे  कारंजे थुई थुई करत सृष्टीला मोहवित होते. 

     रविराज आपल्या सहस्र सोनसळी बाहुंनी सृष्टीला कवेत घेण्यासाठी पूर्व क्षितिजी डेरेदाखल झाला. दाट पांढुरक्या धुक्याच्या पदरा आडून येणाऱ्या उबदार किरणांचा स्पर्श होताच सावळी धरा मोहरली, शहारली, अन् तिच्या आरक्त झालेल्या कपोलांची लज्जेची लाली पूर्व क्षितिजावर केशरिया उधळत होती. दवबिंदूचा चंदेरी साज लेवून कुंद कळ्यांचे गजरे माळलेल्या सृष्टीच्या या आनंदात सारे विहंग कलरव करीत सामील झाले.  सृष्टीनेही शुभ्र बगळ्यांची माळ रविराजास अर्पण केली.  

     पहाटेच्या धुक्यातील मंद गारव्यात  गोठ्यातील गोधनाचा हंबर,  राऊळात भूपाळीचे सुस्वर गायन, गृहिणींचे जात्यावर धान्य दळतांना गायलेल्या सुरेल ओव्या सारेच चराचरात चैतन्य फुलवीत होते. 

     अन् रविराज धुक्याचा पदर सारून सृष्टीला चैतन्याचे आंदण प्रदान करत तिच्या प्रीतीच्या हिंदोळ्यावर झुलत पूर्वेकडून पश्चिमेकडे  ओंकाराच्या सुरेल नादात धुंद चालत होता संध्येला केशरियाचे दान देण्यासाठी....


रसिका राजीव हिंगे 

#rasraj#पहाट #धुके#सारूनी पदर#

कल्पनेतील सुखांचा डोलारा...




     किती सांभाळू सांग

     मोह  मायेचा मनोरा

     षडरिपूचा हा पसारा

     वाटे सुखांचा डोलारा

     रातराणीचा मंद धुंद सुगंध, वाऱ्याची हलकीशी निळसर झुळूक, नभी पौर्णिमेचा चंद्र, आणि सागराला आलेली भरती. त्याच्या फेसाळत किनाऱ्याकडे धाव घेणाऱ्या लाटा अन् पुन्हा त्याच्यातच विलीन होणाऱ्या. सतत निसर्गाचे हे चक्र असेच फिरत राहील. ऋतुमागुन ऋतू येतील, स्वतः जवळचे देणे देऊन पुन्हा नव्याने बहरतील. समर्पण! जे आहे ते देत राहणे एवढंच त्याला ठाऊक. हाच त्याचा वास्तवातला आणि कल्पनेतल्या सुखाचा डोलारा. 

     पण मायेच्या आवरणाखाली किती अज्ञानी होऊन जगत असतो प्रत्येक जीव. जन्मापासून कोहं विचारणारा जीव या आभासी जगात आल्याबरोबर सुखाच्या मागे धावत असतो. 

     वास्तविक पाहता खरं सुख म्हणजे काय हे देखील कळत नसतं, तरीही सुखाचे इमले बांधण्यात  मश्गूल असतो. स्वतःला जे रुचेल,भावेल तेच सुख आहे असे मानणारा मनुष्य प्राणी. मग त्यासाठी काही चुकीचे घडते आहे का, कुणाला त्रास होतो आहे का याचा विचार देखील मनात येत नाही.अन् याच आभासी सुखाचे डोलारे मानव उभे करत असतो. 

     कल्पनेच्या दुनियेत, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलत प्रत्येक जण जगत असतो हे निर्विवाद सत्य असले तरी स्वतःच्या सुखासाठी फुलण्या आधीच एखादी कळी तर कुस्करली जातं नाही न! सुखाच्या मागे इतके धावत रहातात की मायेची ऊब मिळावी म्हणून तिष्ठत असलेला लहानगा, अर्धवट वयाचा, स्वप्नांच्या दुनियेत ज्याने जगावे असा कंटाळून आयुष्य तर संपवत नाही न!  विचार करण्याची शक्ती नष्ट होतं असेल तर अशा सुखाच्या कल्पना का कराव्यात. कधी कधी त्या परमात्म्याला विचारावेसे वाटते, तूच देतोस ना सगळं, मग अशा कल्पनेचे मनोरे कसे नीट उभे असतात. विचार तूच देतो, शक्ती तूच देतो, जन्म तूच देतो, तुझाच हा सगळा पसारा. पारिजातकाच्या मनगंध पायघड्या तूच घालतोस, रानी वनी फुलांचा पसारा आणि मनात विचारांचा पसारा तूच करतोस, तरी पण असे का. हेच जर सुख असेल तर दुःख कोणते. 

     जशा किनाऱ्याला मोहवणाऱ्या लाटा आहेत तशाच भवसागर पार करण्यासाठी सद्विचारांच्या लाटा निर्माण व्हाव्यात,  सुगंधित फुलांनी चराचर दरवळत आहे तसेच माझे आयुष्य दरवळून टाकणारा कल्पवृक्ष हवा आहे.हा खरा माझ्या कल्पनेतल्या सुखांचा डोलारा जो मला चिरंतन उभा ठेवायचा आहे. हे ईश्वरा तुला अशक्य नाही रे असे करणे कारण तूच तर निर्माता आहेस. तुझीच माया आहे ही सारी. खरे आहे न!


©️रसिका राजीव हिंगे

rasraj#सुख#डोलारा#कल्पना#

Thursday, 15 December 2022

चित्रकाव्य. सावळ बाधा

 


दशदिशातुनी दाटत आली

सांज बिलोरी अवनीवरती

अवगुंठीत ग रूप लाजरे

कालिंदीच्या काठावरती


कैसी झाली सावळबाधा

दर्पणी पाहता  उगाच भासे

अवतीभवती चोहीकडे ग

प्रतिबिंबित होई आभासे


पैंजण पायी छमछम करती

का मुरलीचे सूर हे साजे

मेघ गरजले काळे सावळे

धा धा धिन ना मृदुंग बाजे 


मंद झुळुकशी अंगावरती

मोरपीस जणू गाली फिरते

रानीवनी ग हंबर ऐकता

सावळ चरणी मन विसावते


©️®️ रसिका राजीव हिंगे 


Monday, 5 December 2022

प्रश्न



 सहज सुचलं म्हणून ..

     संदीप खरे  यांचे कवितेचा कोपरा यु ट्यूब वर ऐकत होते. त्यांनी त्यांची पौंगडावस्थेतील मुलांवर लिहिलेली कविता वाचली. त्यात त्या मुलाला आभाळभर प्रश्न पडतात पण ढगभर पण उत्तर मिळत नाही असे होते. कविता अप्रतिमच आहे. त्यांची सादर करण्याची पद्धत, कविता कशी सुचली वगैरे सांगत ते कविता सादर करत होते. पण माझं मन आभाळभर प्रश्नांच्या भोवती घुटमळत होते. किती सुंदर शब्द, आभाळभर प्रश्न! 

     जन्मानंतर कोहं पासून सुरू झालेली प्रश्न मालिका सतत भोवती पिंगा घालत असते. प्रत्येक क्षणी प्रश्न आणि प्रश्न. उत्तर शोधायला गेले तर मिळेलच याची शाश्वती नाही.  असे म्हणतात  आधी उत्तर तयार होतं आणि नंतर प्रश्न. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेच. मग का मिळत नाही आपल्याला. मुळात प्रश्न म्हणजे काय? तर ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, त्याबद्दल ज्ञान नाही म्हणजे त्या गोष्टीचे आकलन होत नाही त्यामुळे निर्माण होतात ते प्रश्न. म्हणजे त्याविषयी जिज्ञासा. पण काहीवेळेस बऱ्याच गोष्टी माहित असूनही प्रश्न निर्माण होतातच. एखाद दुसरा प्रश्न नाही तर असंख्य प्रश्न, म्हणजेच आभाळभर प्रश्न. उत्तर मात्र ढगभर पण सापडत नाही. असे कितीतरी अनुत्तरीत प्रश्न आहेत. किंबहुना त्याचं उत्तर असलं तरी ते मान्य नसतं किंवा शंकेखोर मन मान्य करत नाही. एखाद्याने खूप प्रश्न विचारले तर लगेच सगळे म्हणतात," किती चौकस बुध्दी आहे न! हो आहे पण सगळ्या प्रश्नांची नाही तरी किमान एखाद्या प्रश्नाचे तरी उत्तर मिळते का? समजा मिळाले तरी बरोबर उत्तर आहे की नाही आणि समाधान होते का?

     तरणीताठी मुलं आत्महत्या करतात. कारण कधीच कळत नाही, कळलं तरी अगदी शुल्लक असतं. पण का असं वागावेसे वाटले, असं कोणतं आभाळ कोसळले होते, की आयुष्य संपवावे वाटलं. अशावेळी खरच आभाळभर प्रश्न पडतात ज्याचे उत्तर ढगभर ही कधीच मिळत नाही. अशा आणि याचसारख्या कितीतरी घटना घडतात. शाळेत पाचवी सहावी मध्ये शिकणारे मुलं मुली म्हणतात ती/तो माझा बी.एफ. आहे. आता मला वाटलं की बी.एफ.म्हणजे बेस्ट फ्रेंड. पण माझं ज्ञान किती अर्वाचीन(?) आहे हे तेव्हा कळलं जेव्हा हीच लहान लहान मुलं ओठांवर हात ठेऊन हसू दाबायचा प्रयत्न करून सांगत होती, बी. एफ. म्हणजे बॉय फ्रेंड. तेव्हा डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय नव्हता.  यांच्या घरी माहित आहे का, मुलं बाहेर काय करतात?, कुणाशी बोलतात? कुठे जातात? अभ्यासाकडे लक्ष आहे की नाही? कुठे चालली आहे ही भारताची उदयास येणारी पिढी? अरे किती ही प्रश्न! पण उत्तर मिळत नाही. 

     शेवटी काय तर आयुष्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असलं तरीही ते मिळतच नाही. जे प्रश्न अनुत्तरीत राहतात त्यांना पूर्णविराम देऊन संपविले जातात स्वतः पुरेसे हेच खरं!


रसिका राजीव हिंगे

पुणे