Tuesday, 28 September 2021

चित्रकाव्य




निळ्या सागरी फुलून आली

हिरवी हिरवी सृष्टी न्यारी

निळे आकाश झुकले थोडे

नवयौवन हे तोलून धरी


प्रीतसागरी जणू पहुडली

निळी सावळी प्रीत बावरी

मंत्रमुग्धही झाले क्षण क्षण

जलाशयाच्या खोल अंतरी


तरंग उठती लाटेवरती

जलबिंदूचे भासे नर्तन

धुंद मन जरा हिंदोळले

कोण नाविका तू मनभावन


वात्सल्याच्या छायेतूनी

जीवन नौका पार करी रे 

सावळमाया धरी सुकाणू

चरणी आता आश्रय दे रे


रसिका राजीव हिंगे


Monday, 27 September 2021

चित्र ललित

 

गंध फुलांचा गेला सांगून

तुझे नि माझे व्हावे मिलन


      अल्लड नवयौवना धुंद गंधाळल्या क्षणांना सोबत घेऊन तिच्या प्रियाच्या कानी अलगद गुज सांगण्यासाठी निघाली. मंद गार वाऱ्यामुळे तिचे कुंतल ही तिच्या गर्भ रेशमी गालांशी लगट करताहेत. काय बरे सांगायचे आहे तिला!

      तुझी नि माझी  उत्कट प्रीत आता मिलनाकडे वाटचाल करते आहे. ऐक ना सखया, सारे चराचर दरवळले आहे आपल्या प्रीतीच्या सुगंधाने. 

      होय! गंधित च आहे आपले नाते. अगदी पुराण काळापासून चालत आलेला वारसा आहे हा. प्रेम ही एक तरल भावना. प्रत्यक्ष परमात्मा सुद्धा या भावनेत अडकला म्हणण्यापेक्षा त्यानेच तर ही प्रीत, प्रेम या भावना निर्माण केल्या नाही का?

      कृष्णसखा आणि राधा यांची  अशीच मंत्रमुग्ध करणारी प्रीत, जिथे वासनेला थारा नाही तशीच आपली पण प्रीत आहे ही.

      प्रीत असावी नजरेची भाषा बोलणारी, स्पर्शातून जन्मजन्मांतरीचे नाते घट्ट करणारी,या हृदयी चे भाव त्या हृदयी सहज समजणारी, मनातल्या भावनांचा अनाहत नाद ऐकणारी. विश्वासाच्या पायावर प्रीतीचा राजमहाल तोलून धरणारी.

      तुला सांगते प्रेम करणे म्हणजे काही गुन्हा नाही रे. प्रेम आंधळं असलं तरी ते डोळसपणे करावे, केवळ आकर्षण म्हणजे प्रेम नाही. प्रेम सौंदर्यावर करावं असे जरी असले तरी बाह्य सौंदर्य च नव्हे,  प्रेम अंतर्गत सौंदर्यावर करावे, गुण दोषांवर करावे,स्वभावावर करावे. 

      प्रेम अगदी अंतरंगातून करावे, एकदा स्वीकार केला की त्याच्या गुण दोषांसह स्वीकारावे. 

      हेच असेच विचार मनात घेऊन ही अभिसारीका निघाली आहे सजणा ला भेटायला. सुगंधाने भारलेल्या पुष्पांचा सांगावा द्यायला.

      सख्या ऐक ही गंधित पुष्पे काय बरे सांगतायत! तिच्या तरल प्रीतीची कहाणी..... आणि तिच्या प्रेमाचे ऋणाईत व्हायला....

      प्रेमा काय देऊ तुला

      भाग्य दिले तू मला


रसिका राजीव हिंगे

Thursday, 23 September 2021

चित्रकाव्य

 





निरागस सुकोमल

भाव दाटले नयनी

मौन होऊनीया भाषा

सामावली या लोचनी


मनी विचारांची जणू

खळबळ माजलेली

डोकावता अंतरात

रान भेटे दावानली


बाल्य कुठेसे लपले

भिरभिर ते शोधतो

अराजक या जगती

पाहुनिया खंतावतो


अंधारल्या उजेडात

कधी भेटतील वाटा

माय तात दीपस्तंभ

नच रुते पायी काटा


कुठे कसा गवसेल

जगण्याचा हा किनारा

सान असुनी कळले

आहे जाणे भवपारा


रसिका राजीव हिंगे




पंख पसरूनी वाटे

 पंख पसरूनी वाटे


पंख पसरूनी वाटे मुक्त विहरत जावे

सृष्टीचे हे रम्य सोहळे मनी अनुभवावे


बळ भरुनी पंखात वाटे नभांगणी जावे

घ्यावे चांदणे मोजून नक्षत्रांना ही वेचावे


पंखाखाली अलगद  पांघरावे सागराला

नभी चांदवा पाहता  इथे का हा उधाणला


जावे मनाच्या पल्याड मन पाखरू होऊनि

नियतीचे खेळ सारे यावे जरासे पाहुनी


पंख पसरूनी वाटे घ्यावी कवेत निळाई

कृष्णसखा भेटे तिथे जर असेल पुण्याई


रसिका राजीव हिंगे


अतिथी

 अतिथी!


          येता अवचित दारी

         तोच असेल श्रीहरी

         स्वागतास अतिथीच्या

         यजमाना ये सत्वरी


     अतिथी देवो भव!  घरी आलेला अतिथी किंवा पाहुणा हा देवा सम आहे असे संस्कार जपणारी आपली संस्कृती.

     अतिथी म्हणजे आगंतुक. कोणतीही सूचना न देता अचानक पणे घरी आलेला पाहुणा. आलेला पाहुणा कोणत्या उद्देशाने आला आहे, केवळ भेटीचे प्रयोजन आहे की अजून विशेष काही हे महत्वाचे न मानता त्याचे स्वागत हे हसून केलेच पाहिजे असा पायंडा आपल्या परंपरेचा.

     आपल्या घरी आलेला पाहुणा किंवा अतिथीचे स्वागत चांगल्या बुद्धीने, विचाराने, मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता करावे असे पूर्वजांनी सांगितले आहे. थोडक्यात काय तर सकारात्मक भावनेने करावे. ही सकारात्मकता म्हणजे प्रचंड ऊर्जा आहे जगण्याची. या सकारात्मक विचारांच्या लहरी म्हणजे weves घरातील अदृश्य वाईट शक्तींचा सामना करायला कायम सज्ज असतात. म्हणून म्हणतात न की चांगले बोलावे. मनापासून स्वागत करतांना त्यातून जे सकारात्मक स्पंदने निर्माण होतात ती अतिथी आणि यजमान यांच्यामध्ये भावनिक नाते निर्माण करणारा दुवा आहे.

     जसे अन्न ग्रहण करतो तसेच विचार होतात, मन तसंच होतं. सात्विक भावनेने बनविलेले भोजन अतिथीस अर्पण करावे म्हणजे ते ही आनंदी होतील आणि त्याचा परिणाम सारे घरही आनंदी होईल. आलेल्या अतिथीस समाधान  लाभेल आणि आदरातिथ्य करण्याऱ्यास ही शुभाशीर्वाद लाभतील. माणुसकी आपोआपच जपली जाईल.

     हे सगळे विज्ञान आहे जे ऋषी मुनींनी शोधले आहे,  अनुभवले आहे. हा वारसा असाच पुढे जायला हवा हीच इच्छा?


हास्याचे उडावे तुषार

भावनेचा हो आदर

मान सन्मान सत्कार

व्हावे आनंदे सादर



रसिका राजीव हिंगे

     

     

     

Tuesday, 21 September 2021

 


एक शलाका प्रकाशवेडी

कृष्ण मेघ ते भेदुन आली

अवनीवरती जलाशयाला

कवेत घेई ही धवलाली


सहस्ररश्मी येती अवचित

समीर डोलतो गार मंदसा 

गिरिशिखरावर हिरवाईचा

उत्सव सजला रूप गंधसा


दशदिशातून येई नाद

प्रणवाचे हो हे उच्चारण 

चैतन्य उजळे बहरे सृष्टी

नैराश्याचे हे उच्चाटन


ऐसी पसरे धरणीवरती

सारी माया परमेशाची

कणाकणातुन अस्तित्वाची

जाणीव देत निजरूपाची


रसिका राजीव हिंगे




Monday, 20 September 2021

पायरी




     राऊळी मंदिरी दर्शनास जातांना  आधी पहिल्या पायरीवर सगळेच नतमस्तक होतात. का होत असतील बरे सगळे नतमस्तक? तुझ्यावर पाय ठेवून मला गाभाऱ्यातल्या परमेशाचे दर्शन घ्यायचे आहे. तुझ्याशिवाय मी तिथे पोहचू शकत नाही. म्हणून हे माये मला क्षमा कर आणि तिथपर्यंत घेऊन चल म्हणून तिला हे वंदन असावे असे वाटतं. दर्शन घेतल्यावर कृतार्थ मन क्षणभर पायरीवर विसावतं पायरीला धन्यवाद देण्यासाठी. 

     आयुष्याच्या प्रवासात कधी दुःखाच्या पायरीवर मन हेलकावे घेतं तर कधी सुखाच्या पायरीवर समाधान अनुभवतं.  यशोशिखराकडे वाटचाल करतांना कितीतरी पायऱ्यावर सुख-दुःख, यश-अपयश, मान-सन्मान यांचे चढ उतार अनुभवास येतात. पण भक्कम पाय रोवून पायऱ्या चढत गेलं तर शिखर गवसतंच. कारण पायरीचे हेच कर्तव्य असावे जो तिच्या संगतीत आला त्याला त्याच्या इप्सित स्थळी पोहचविणे. फक्त चढणारे कसे आहेत हे महत्त्वाचे, ती तर साथ देतेच न. उत्कर्ष साधायचा असेल तर स्वतःची पायरी ओळखता यायला हवी.


      सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ही असेच. एकमेकांचे हात धरून, आधार देत, हसत खेळत नात्यातल्या प्रत्येक पायरीवर चढत गेलो तर नाते फुलत जाईल. "तू तुझी पायरी ओळखून रहा, उगाच गगनाला गवसणी घालायला जाऊ नकोस" असे बोलतांना सुद्धा स्वतः कोणत्या पायरीवर उतरलो आहे याचेही भान असायला हवे. उगाच तुझं माझं करत, मत्सर,द्वेष, असूया या पायऱ्यांवर पाऊल पडले तर जगणेच अशक्य होईल. शिवाय पदरी निराशाच येईल. प्रत्येकाची पायरी परमेश्वराने प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार ठरवून दिली आहे. सत्कर्माच्या पायऱ्यांवर पावलं टाकत नामस्मरणाची काठी हातात घेऊन, सद्गुरूच्या साहाय्याने चढत गेलो की परमात्मा भेटेलही. 

     मात्र पायरी चढतांना आत्मविश्वास, श्रध्दा असणे गरजेचे आहे. 

     

रसिका राजीव हिंगे