Wednesday, 30 October 2024

एकच तत्व..

    एकच तत्व..


     रोज सकाळी फिरायला (म्हणजे morning walk) सोबत माझी मैत्रीण असते. आजकाल सगळे जसे भेटले की हाय, हॅलो करतात तसे सकाळी तिची भेट झाली की मी गुरुदेव दत्त असे म्हणते आणि ती जय श्रीराम. तिने जय श्रीराम म्हटले की मी अगदी जणू आठवणीने गुरुदेव दत्त म्हणते. हळूहळू काही दिवसातच मी गुरुदेव दत्त म्हटले की ती पण गुरुदेव दत्त म्हणायला लागली. याची दखल घेतल्या गेली पण लक्षात यायला वेळ लागला. तिला हे लगेच कळले की जय श्रीराम म्हणा की गुरुदेव दत्त म्हणा शेवटी रूपं अनेक असली तरी तो परमात्मा एकच आहे. वेगवेगळ्या रूपात भक्तांच्या हाकेला साद घालण्यास तो पृथ्वीवर अवतार घेतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेच आहे न  "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे"  वास्तविक पाहता अवतरण म्हणजे खाली येणे, खालच्या पातळीवर उतरणे. 

 पण परमात्मा इतका दयाळू आहे हो त्याच्या भक्तांसाठी तो काहीही करायला तयार असतो. फक्त त्याच्या अनुसंधानात राहता आले पाहिजे. रागाने, लोभाने, तिरस्काराने, गमतीने किंवा विनोदाने कोणत्याही परिस्थितीत जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याचेच स्मरण केले तर तो दखल घेतोच घेतो नव्हे घ्यावीच लागते. 

     भक्त प्रल्हादाला किती यातना सहन कराव्या लागल्या पण त्याने नारायण नाम सोडले नाही. पर्वतावरून ढकलून दिले तरी पर्वत नारायण, खोल दरी नारायण, उकळत्या तेलात तळून काढले तरी तेल नारायण, विस्तव नारायण. एका नारायणा वाचून दुसरे काहीच माहिती नाही. त्याच्या साठी प्रगटले न विष्णू खांबातून. असा हा परमात्मा भक्तासाठी काहीही करू शकतो. तुम्ही गुरुदेव दत्त म्हणा की जय श्रीराम म्हणा किंवा अंबाबाईचा गजर करा, एकच तत्व सगळीकडे भरून उरलेले आहे. फक्त ओळखता आले पाहिजे. त्यासाठी एकच सतत अखंड भगवंताचे अनुसंधान ठेवावे लागेल. माझे सद्गुरू म्हणतात, नामाचे इतके गाठोडे करा की ते वजनदार झाले पाहिजे. आजकाल कोणत्याही कामासाठी मोल देऊन काम करून घेण्याची सवय आहे.पण हे नामाचे गाठोडे वजनदार झाले तरी हे इतके अनमोल आहे की त्याची कशाशीच तुलना करता येणार नाही शिवाय प्रत्यक्ष भगवंत  सोबत असेल, सद्गुरू सोबत असतील यात शंका नाही. सद्गुरू सोबत आहेत म्हणजे सगळेच मार्ग, वाटा सुकर, सुलभ होतात.

     एकच तत्व सगळीकडे आहे याची जाणीव झाली की सगळेच सोपे होऊन जाते. जाणीव होणे गरजेचे आहे. जाणीव होण्यासाठी श्रीगुरु चरणी लीन व्हावे, त्यांना सेवावे, भजावे, त्यांचे सारे ऐकावे. अखंड नाम आपोआप घेतल्या जाईल....


रसिका राजीव हिंगे

सुख दुःख......

    सुख दुःख......


     काळ वेगात धावत असतो. सगळ्यात जास्त घाई वेळेला असते. वेळेला वेळच नसतो विचार करायला. क्षणभर काळ थांबला असे कधी होतं का? हो. एक निमिष काळ थांबतो, जेव्हा एखादा दुःखद अनुभव येणार असेल तेव्हा. कितीही म्हटले की सुख दुःख नाहीच कुठे, हे आभास आहे. काल्पनिक आहे तरी संसारात, या भवसागरात जगत असताना यांच्याशी सामना करावाच लागतो. सुख प्राप्त झाले की आनंदाच्या लाटा उसळतात. पण दुःख आले की मात्र या आनंद सागराचे पर्यवसन शोक सागरात होते. असे का? यावरून एकच सिद्ध होते की मानव किती गुरफटला आहे या मायेच्या बंधनात. सुख दुःख हे मानले तर आहे हे सगळं कळत असतं, पण वळत नाही. सामान्य जीव दुःखात होरपळून निघतोच आणि सुखात हुरळून जातो. एक लाट विरत नाही तर दुसरी लाट तिच्या पाठी असतेच तसेच दुःखाचे क्षण येत जातात. एका जखमेवर खपली धरत नाही तर दुसरी जखम तयार आहे. भळाभळा रक्त वाहतेच आहे. किती मलम पट्टी करावी, तरी जखम ठसठसते. डोळ्यातले अश्रू सुद्धा थिजून जातात. यालाच संसार सागर म्हणायचे का? केव्हापासून चे असेल प्रारब्ध, संचित कधी सांगता येत नाही. सत्कर्म करा हे बाळकडू घेतच लहानाचे मोठे झालो आम्ही. या सत्कर्माचे फळ मिळावे न कुठेतरी. मिळाले असेल तर दिसावे. पण ईश्वराचा नियमच वेगळा आहे. तो देतो पण दिसत नाही आणि कळत ही नाही. सूक्ष्म कर्म  मग ते चांगले असो की वाईट त्याचे ते फळ देऊन तो मोकळा होतो. हेच ते संचित. ज्याचे प्रारब्ध भोगून झाले तो इथे राहूच शकत नाही. थांब पाहू पुढे नाहीच. उधारी नाहीच. जाणारा निघून जातो, पण त्याच्या पाठी असलेले त्यांचं आयुष्य एक निमिष थांबतच. काळ थांबला म्हणजे काय ते हेच. तो एकच क्षण असतो सगळं संपलं असे सांगणारा. पण पुढचा क्षण उभा आहे न समोर सांगायला, "सावर बयो, काळ पुन्हा पुढे सरकतो आहे." तो पुढे चालतच असतो, माझ्या साठी थांबला होता एक निमिष फक्त.....हा पण भास असेल कदाचित....

हीह

रसिका राजीव हिंगे

Wednesday, 16 October 2024

सहज सुचलं म्हणून.....कोजागिरी




आज कोजागिरी पुनव. आकाशात शांत शीतल शरदाचं चांदणं बहरलं आहे. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दुधाळ प्रकाशाचं शिंपण करत सृष्टीवर शीतलतेच दान करतो आहे. चंद्र हा स्वयं प्रकाशित नाही. सूर्याकडून प्राप्त झालेल्या  प्रकाशाने चंद्र शीतलता दान करतो. केवढे हे औदार्य.  या ईश्वरी शक्ती फक्त आणि फक्त देत राहतात. देणे ह्या संस्कृतीचा पाया आहे असे आपण म्हणतो ते याच कारणास्तव. 

आज या विज्ञान युग म्हणणाऱ्या जगात वावरतांना प्रकर्षाने जाणवतं की आपले पूर्वज वेडे नव्हते,अंधश्रद्धाळू तर नाहीच नाही. श्रद्धा ही अंध कधीच नसते. अश्रद्ध म्हणता येईल एखादेवेळी. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून साजरा केला जातो. शरदाआच्या चांदण्यात कोजागिरीला रात्रीच्या चंद्र प्रकाशात  आटवलेल्या दुधाचं जे महत्व, चव  आहे , त्याच्या साक्षीने एकत्र येऊन नात्याचा होत असलेला उत्सव तसेच या चंद्र प्रकाशामुळे आरोग्याचे जे आंदण मिळतं ते अलौकिक आहे यात शंका नाही. तेव्हा हा पुनवेचा चंद्र पहावा,अनुभवावा आणि जगावा....

याच कोजागिरीच्या दिवशी गोपींनी आपल्या पायाची धूळ त्यांच्या कान्हा साठी पाठवली होती. आजारी असल्याची लीला करणाऱ्या श्रीकृष्णा साठी. रात्रभर रास खेळल्या कृष्णाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन. शबरी माहित नाही असा एकही भारतीय नसेल. निस्सीम भक्त श्रीरामाची. गुरूच्या शब्दावर विश्वास ठेऊन अविरत श्रीरामाची वाट पाहणाऱ्या शबरीचा जन्म याच दिवशी. गोपी किंवा शबरी नामाचे महत्त्व सांगतात आहे जणू. अखंड अनुसंधान परमात्म्याशी. श्रीकृष्णाशी आणि श्रीरामाशी एकरूप होऊन गेलेल्या. कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी रात्री फिरते कोजाग्रती विचारत. जागे आहात का याचा अर्थ नरदेह कशासाठी मिळाला आहे याचे भान आहे न! जागा हो. चौऱ्यांशी लक्ष योनी फिरल्यानंतर तुझे पाप पुण्य समसमान झाले अन् तुला हा नर देह मिळाला आहे त्याचे सार्थक करून घे. यासाठीच ती फिरत असावी, सगळ्यांना जागे करण्यासाठी....

 

रसिका राजीव हिंगे