Sunday, 2 April 2023

मला बाप्पा भेटला...

 

     

     शुभांगी खूप घाबरली होती. काय करावे तिला कळत नव्हते. ही काहीतरी जादू आहे की खरच हातचलाखी आहे. तिला लहानपणी पाहिलेले जादूचे प्रयोग आठवत होते. आईने लहानपणापासून मनावर बिंबवले आहे की सृष्टीच्या कणाकणात ईश्वर सामावला आहे. पण हे काही तसे दिसत नाही. गणपती बाप्पा दूध पितो आहे म्हणजे नेमके काय करतो. काहीतरी गोंधळ नक्कीच आहे. पण याचा छडा लावलाच पाहिजे. सहज तिची नजर हातातल्या घड्याळाकडे गेली. आई वाट पहात असेल गेले पाहिजे. शुभांगी गाडी काढून सरळ घरी निघाली. तिची मैत्रीण रेवती होती सोबत. ती अगदी श्रध्देने हे सगळं पहात होती. शुभांगी ला निघालेले पाहून धावतच तिच्याजवळ आली.

     "अगं चाललीस कुठे? थांब जरा. मी बाजूच्या दुकानातून दूध घेते,आपण पण देऊ गणपतीला दूध."

     "हे फुकटचे उद्योग मला नाही जमणार. तू कर तुला काय करायचे ते. माझा अजिबात विश्वास नाही यावर." 

     "अरे, असं बोलू नको, गणपती आहे तो! त्याच्याबाबतीत असे बोलशील तर पाप लागेल ग. का उगाच संकटांना आमंत्रण देते आहेस?"

     "मी घरी चालली आहे. तुला काय करायचे ते कर. माझ्या आई बाबांना नाही आवडत असे थोतांड."

     असे बोलून शुभांगी घरी तर निघाली. पण गाडीवर जाताना तिच्या मनात उलट सुलट विचारांनी अक्षरशः थैमान घातले. खरच काही होईल का?  माझं शेवटचे वर्ष आहे कॉलेजचे, काही गडबड तर होणार नाही ना.? खूपच घाबरली होती शुभांगी. घरात आल्याबरोबर तिचा चेहरा पाहून आईने विचारले, " शुभांगी काय झाले? तू अशी का दिसते आहेस घाबरलेली? कोणी काही बोलले का?" ही आई पण न. हिला कसं कळतं सगळं काय माहीत.

     "अग आई, काही नाही झाले. थकली आहे म्हणून वाटत असेल तुला." पण शांत बसेल ती आई कुठली!

     "शुभांगी, जेवून घे आधी."

     "मला भूक नाही. नंतर जेवेल." आता मात्र आई तिच्याजवळ बसली.  तरुण मुलगी बाहेरून अशी घाबरत आली की आईच्या मनात नको ते विचार यायला लागतात. तिचं चित्त थाऱ्यावर नाही रहात.

     "शुभांगी, काय झालंय? तू खूप अस्वस्थ वाटते आहेस."

     "तसं विशेष काही नाही ग. रेवती म्हणत होती की गणपती दूध पितो आहे तर आपण पण त्याला दूध देऊ. पण मी नाही म्हटले, आणि निघून आले घरी."

     ",ठीक आहे न मग यात घाबरण्यासारखं काय आहे? तुला नव्हतं असं काही करायचं तर तू नाही केलं. विषय संपला."

     "आई, विषय संपला नाही इथूनच सुरू झाला. रेवती म्हणाली की  संकट येईल अश्याने. म्हणून जीव घाबरतो आहे. काही संकट आले तर? असं करते थोडे दूध घेऊन देऊन येते तिथे म्हणजे मन शांत होईल आणि संकट ही येणार नाही."

     "शुभांगी, डोकं ठिकाणी आहे का तुझं? कसला विचार करते आहे तू? अग आज चार दिवस झाले ह्या बातमीला, सगळी कडे हेच चालू आहे. गणपती दूध पितो आहे. काहीतरी शुभ घडेल वगैरे."

     "म्हणजे आई, तुला हे माहीत आहे! तू नाही गेली दर्शनाला आणि दूध द्यायला."

     "अग बाळा, असा कधी बाप्पा येतो का? ही केवळ अंधश्रद्धा आहे ग."

     "पण तू तर म्हणते की, देव कणाकणात भरलेला आहे. मग आता का म्हणते की ही अंधश्रद्धा आहे."

     " बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, ईश्वर असा भेटत नसतो कुणाला, त्याच्यासाठी खूप मोठी साधना लागते जन्मजन्मातरीची. अग असे भोंदू असतातच ठायी ठायी पसरलेले. काहीतरी सांगून भोवती लोक गोळा करणे आणि पैसा कमवणे. यातून एवढेच साध्य होणार. समाज रसातळाला जाईल खरे तर यांच्यावर विश्वास ठेवला तर."

     "पण ते तर दाखवत होते न दूध पितो आहे गणपती म्हणून. चमच्यातले दूध कमी व्हायचे ग."

     "जुगाड करतात ग सगळा. ती मूर्ती मातीची आहे, त्या मातीतच दूध जिरत नसेल कशावरून. देवाच्या नावाखाली भोळ्या भाबड्या लोकांना असले भोंदू जाळ्यात ओढतात अन् नादी लावतात. हा सध्या बाजार च झालाय बघ सगळीकडे. आपल्या शास्त्राचा अभ्यास करत नाही, अर्धवट काहीतरी वाचतात,ऐकतात त्यावरून स्वर्ग गाठायला जातात बघ. मध्ये अशीच आवई उठली होती की रुद्राक्षाने सगळे रोग बरे होतात. होतात शंभर टक्के होतात बरे.पण तो रुद्राक्ष कसा असावा, कोणता रुद्राक्ष आहे ज्याने रोग बरे होतात याचे काही ज्ञानच नाही कोणाला. अन् मग हे सगळे थोतांड आहे असा प्रचार करायला मोकळे होतात अंधश्रद्धावाले."

     "थांब आई, मंत्र विज्ञान पण आहे न ग काहीतरी."

     "आहे न. आपले पूर्वज वेडे नक्कीच नव्हते. अनुभवाच्या कसोटीवर घासून त्यांनी शास्त्र सांगितले आहे. संस्कृत मंत्राचा उच्चार योग्य झाल्याशिवाय त्याचे परिणाम दिसत नाही. वेद, उपनिषद,ब्रह्म सूत्रे म्हणजे गंमत वाटते या लोकांना. अर्धवट ज्ञान घेऊन भोळ्या भक्तांना नादी लावयचे आणि मग भक्तांचा कसाही उपयोग करून घ्यायचा हा बाजार झाला आहे आजकाल. तेव्हा असे गणपतीला दूध नाही दिले तर  आपल्यावर संकट येईल असे अजिबात नाही."

     "तिकडे खूप गर्दी होती. खूप लोकं दुधाच्या पिशव्या आणून देत होते."

     "आत्ताच काय सांगितले मी तुला, भक्तांना नादी लावणे अन् पैसा कमविणे हेच काम असतं या भोंदू लोकांचं. यामुळेच आपल्या संस्कृतीला आपणच नावं ठेवतो आणि आपले शास्त्र आपण वेड्यात काढतो. हातचलाखी करून जुगाड करायचे अन् भोळ्या विशेष करून स्त्रियांना फसवायचे. असं कधीही होत नाही.  हवेतून अंगारा काढला,कुंकू काढलं, अंगात देवी आली वगैरे काही नसतं. यासाठी मी कोण आहे, ईश्वर म्हणजे कोण, सृष्टी कशी निर्माण झाली, याचे उत्तर शोधले की कळतं सगळं पण त्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालवे लागेल तरीही यश मिळेल की नाही हे सांगता येत नाही. तेव्हा आता तू या अशा गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही अन् घाबरायच नाही. खरा देव आपल्या भक्तांसाठी काहीही करायला तयार असतो, संकट कधीच येवू देत नाही."

     "आई, मला आत्ता छान वाटतं आहे. तुला कसं ग इतकं माहित आहे."

     "आमच्या लहानपणी आमचे आईवडील सांगायचे, या जगात चमत्कार वगैरे काही होत नाही. खूप श्रम करा, मेहनत करा, प्राणीमात्रांवर दया करा अन् त्यांच्यातच देव पहा. गीता आमच्या कडून अर्थासह पाठ करुन घेतली होती शाळेत. त्यामुळे मला एकच माहित आहे अनन्य भावाने ईश्वरास शरण गेले तर आपले सारे तोच पाहतो.

     अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ 

     बाकी सगळे खोटे आहे. कशा वरच विश्वास ठेवायचा नाही.आपल्यावर आपला विश्वास हवा."

     "आई तू खूप छान आहेस ग. मी आता यावर काहीतरी कार्य नक्की करेल बघच तू "

     "शाब्बास, याच साठी होता माझा अट्टाहास तुला शिकविण्याचा आणि सुसंस्कृत करण्याचा."

     आईच्या कुशीत शुभांगी काय करता येईल यावर याचा विचार करतच शांत पडून होती. ...


रसिका राजीव हिंगे 

  

No comments:

Post a Comment