अमृतवेल*
वि. स.खांडेकर यांची अमृतवेल ही कादंबरी आठवीत असतांनाच वाचली होती. आता पुन्हा वाचली.
जीवनाविषयी जास्त लिहितात वि. स.खांडेकर असे वाचले होते. अमृतवेल या कादंबरीत विविध पात्रांच्या माध्यमातून जीवनाच्या कितीतरी व्याख्या त्यांनी इथे सांगितल्या आहेत. ज्याला जसे अनुभव येतात तशीच जीवनाची व्याख्या होते का असा प्रश्न पडतो.
सहज बोलता बोलता जीवन विषयक तत्त्वज्ञान सांगणारी ही गोष्ट आहे नंदा, वसू आणि देवदत्ताची.
एका सामान्य सुसंस्कृत घरात जन्मलेली ही नायिका, भरभरुन प्रेम करणारे आई वडील. एम.ए. झालेली हुशार,वाचनाची आवड असलेली. नंदाचे लग्न ठरते व विमान अपघातात तिचा होणारा पती शेखर याचे निधन होतं. सुखी संसाराची स्वप्न रंगवीत असतानाच नियतीचा असा विचित्र खेळ तिच्या वाट्याला येतो.
आता आयुष्यात काहीच उरलं नाही, जगून तरी काय करायचं असा विचार तिच्या मनात सारखा येत राहतो,मनाची घुसमट वाढत जाते आणि यातच एक दिवस ती आत्महत्या करण्याचा विचार करते. सागरतीरावर उलटसुलट विचारांत ती खूप आत चालत जाते पण क्षणात आईचा विचार मनात येतो अन ती भानावर येते.
आत्महत्या करायला जाण्यापूर्वी मनातले सगळे विचार पत्र रूपाने दादां साठी लिहून जाते.
घरी यायला उशीर होतोय म्हणून दादा तिच्या खोलीत जातात आणि सहजच तिचे पुस्तक पहात असतांना त्यांना पत्र गवसतं जे त्यांच्यासाठीचं लिहिलेलं असतं.
दादा ते पत्र वाचतात. नंदाने तिच्या मनातील कोलाहल, विचारांची उलथापालथ या पत्रामध्ये लिहिलेली वाचून दादा अस्वस्थ होतात आणि तिला समजावणीच त्याच उत्तर लिहून तिच्या पुस्तकाजवळ ठेऊन देतात. उशिरा आलेली नंदा हे पत्र वाचते आणि शांत होते.
पीएचडी करावी या उद्देशाने ती आणि दादा दासबाबूंच्या घरी जातात.इथे दादा आणि दासबाबू तसेच नंदा आणि दासबाबू यांच्यातील संवाद लालित्यपूर्ण जीवनावर भाष्य करीत इतका सुंदर रंगवला आहे की पारिजात झाडावरून टपटप पडतो आहे का असे सुगंधित शब्द कितीही वेळा वाचलं तरी मन पुन्हा वाचावयास हो च म्हणतं.
नंदाच्या मनाची मनस्थिती बघता तिला 5-6 महिने बाहेरचे जग पाहू द्यावे असे दादांना वाटतं असतं. विलासपूरच्या जहागिरदारीण वसुंधरा यांना एक कंपॅनियन ची गरज आहे असे दासबाबू सांगतात. विलासपूरची जहागिरदारीन दुसरी कुणी नसून आपली कॉलेज मधील मैत्रीण आहे हे कळल्यावर नंदा तिच्या सोबत विलासपूरला येते.
विलासपूरला आल्यावर वसुंधरा आणि तिचे पती देवदत्त वेगळे राहतात असे कळते. वसुंधरा याबाबत नंदाशी काहीच बोलत नाही. वसुंधराची मुलगी मधुराला फ़िट्स येत असतात त्यामुळे ती फार त्रस्त आहे.
उत्सुकता म्हणून नंदा एक दिवस देवदत्ताच्या घरी येण्याचा प्रयत्न करते. हरिणाच्या पाडसासोबत देवदत्ताचे बोलणे ऐकते. हरिणाचे पाडस आणि मृत्यू च फक्त माझे मित्र आहेत देवदत्त असे बोलत असतानाच तिथेच नंदाची देवदत्ताशी ओळख होते. त्यांची लायब्ररी, पुस्तक वाचनाचे वेड,त्यावरील नोट्स वाचून नंदा आणि देवदत्ताची पुढे मैत्री वाढत जाते.
छोट्या मधुराच्या मनात देवदत्त म्हणजे एक राक्षस आहे अशी भावना का निर्माण झाली, आधीची हसतखेळत वागणारी , सुरेल गळ्याची वसुंधरा का चिडचिड करते, असे कोणते दुःख तिच्या मनात कोंडले आहे देवदत्त आणि वसुंधरा यांचे वादाचे कारण काय असु शकेल याचा शोध घ्यायचा असे नंदा ठरवते.
देवदत्ताच्या आई वडिलांचे रहस्य उलगडल्यावर तिच्या हाती जे लागतं ते खूपच वेगळं आहे, यात दोष कुणाचाच नाही.
काय गवसतं तिला?यासाठी नक्की वाचा वि. स.खांडेकर यांची अमृतवेल.
शब्द सामर्थ्य, वाचत रहावे असे लालित्यपूर्ण लेखन वाचतांना मन लेखकाला नकळत त्रिवार वंदन करतं......
©️रसिका राजीव हिंगे