Tuesday, 19 May 2020

अमेरिकन हिरकणी


स्त्री एक शक्ती आहे हेच निर्विवाद सत्य आहे. कुठल्याही अडचणीतून मार्ग कसा काढायचा ह्याचे तिला वरदान प्राप्त झालेले आहे असे वाटते. एका स्त्री ने आपल्या छोट्या  चार  वर्षाच्या मुलीसह इराण ते अमेरिका हा केलेला खडतर प्रवास म्हणजे नॉट विदाऊट माय डॉटर ही सत्यकथा. बेट्टी महमुदी यांनी स्वतःचे अनुभव विल्यम हॉपर या सह लेखकाच्या सहाय्याने लिहिलेले हे पुस्तक, ज्याचा अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.
स्त्री ही मुळातच कोमल आहे पण प्रसंगी ती कठोर,  कणखर तसेच आत्मनिर्भर असते याचा बेट्टी यांचे सत्यकथन वाचतांना पुनः प्रत्यय येतो.
अठ्ठावीस वर्षाच्या बेट्टी महमुदी  आपल्या पहिल्या लग्नाचा कटू अनुभव पाठीशी घेऊन  दोन मुलासह अमेरिकेत मिशीगन येथे  रहात असतात. नोकरी करत स्वतःचे कर्तृत्व आजमावत मॅनेजर होण्याचे स्वप्न असतं. पण दैवाला वेगळंच मान्य असतं. डोकेदुखी आणि त्या अनुषंगाने होणारी अंगदुखी या आजारामुळे त्या हैराण होतात. त्यांच्यावर उपचार करण्याचे निमित्ताने सय्यद बोझोर्ग महमुदी या तरुण डॉक्टर शी ओळख होते आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले. अमेरिकन नागरिक असलेल्या बेट्टी आणि इराणमधून डॉक्टर होण्यासाठी अमेरिकेत आलेले सय्यद बोझोर्ग महमुदी ज्यांना सगळे मित्र मुडी म्हणत असतात यांचा संसार अमेरिकेत मिशिगन येथे सुरू होतो. मुलगा हवा अशी मुडी ची इच्छा असते पण त्यांना कन्यारत्न प्राप्त होत. याबाबत नाराजी न दाखवता तिचे नाव माहतोब ठेवण्यात येतं. माहतोब म्हणजे फारसी भाषेत चांदनी.
     1984 साली बेट्टी आणि मुडी आपल्या तीन वर्षाच्या  माहतोबला घेऊन इराण मध्ये जातात. नातेवाईकांना भेटण्यासाठी आपण तिकडे जात आहोत असे मुडी या दोघींना सांगतो. इराणला विमानतळावर उतरण्या आधीच उगाच चौकशी होईल असा धाक दाखवून  मुडी बेट्टी कडून त्या दोघींचे पासपोर्ट हस्तगत करतो.
     मुडीच्या घराण्याचा इराणमध्ये चांगलाच दबदबा असतो.
सय्यद हे उच्चकुलीन समजले जात. नाव, घराणं,खानदान याबरोबरच उच्च विद्याविभूषित असल्याचा अहंकार मुडीला असतोच. लहानपणीच आईवडील गेल्यामुळे मोठ्या बहिणीने मुडीचा सांभाळ केलेला असतो. एक प्रेमळ पती आणि पिता असलेला मुडी म्हणजे भावभावनांचा कल्लोळ,पाश्चिमात्य आणि पौर्वात्य विचारांचा आणि संस्कृतीचा पगडा असल्यासमुळे कायम तो द्विधा मनस्थितीत असतो. सर्वात प्रथम त्याच्या आयुष्यात त्याच्या घराण्याला,कुटुंबाला महत्त्व देत असे. प्रत्येकालाच असतो आपल्या घराण्याचा, कुटुंबाचा अभिमान.
बेट्टी या इराण विमानतळावर उतरल्या पासूनच त्यांना तिथे असुरक्षित वाटत होतं. विमानतळावर त्यांना घ्यायला आणि पहायला आलेली गर्दी पाहून बेट्टीला अगदी नकोसे होते तिथे येणे. तिथल्या स्त्रियांचे घातलेले ते लांबच लांब झगे म्हणजे नखशिखांत चादोर. चादोर म्हणजे अर्धचंद्राकृती कापडाचा तुकडा असून त्याने खांदे,नाक कपाळ व हनुवटीवरून पांघरलेला असतो. बेट्टी यांच्या म्हणजे नववधूच्या स्वागताचा इतका भयंकर प्रकार की वाचतांना अंगावर शहारे येतात. किळस,घृणा,राग चीड सगळ्यांच भावना एकत्रित होतात हे सगळं पाहून.
मुडीची मोठी बहीण सारा महमुदी घोसी म्हणजे एक बडं प्रस्थ असतं. सगळे तिला आमे बोझोर्ग म्हणत असे. तिनेही चादोर घातलेले असते. त्यालाच नाक पुसणे,तोंड पुसणे,खरकटे हात पुसणे असे गलिच्छ होत सगळं. महिनोंमहिने अंघोळ करीत नसे आमे बोझोर्ग. तांदळात किडे तसेच असत व भात शिजवला असे. घरात सगळीकडे अन्न सांडलेले, झुरळं, माशा यांचा सुळसुळाट असतो. सगळे एकाच ताटात जेवण करणे, हात न धुताच तसेच अंगावरील कपड्यांना पुसणे हे सगळं मुडी डॉक्टर असून कसा सहन करतो हे पाहून बेट्टीला खूपच वाईट वाटतं आणि आपण कसे फसलो याचेही आश्चर्य वाटतं. प्रारब्धापुढे कोणाचे चालत नाही हेच खरे असे विचार येत असावेत बेट्टीच्या मनात असे मला वाटले हा प्रकार वाचतांना.
इराणमध्ये आल्याबरोबर आमे बोझोर्ग ने बेट्टी ला कोट आणि मफलर भेट दिले. कोट म्हणजे मोंटो आणि मफलर म्हणजे रुझारी हे बाहेर जातांना घातलेच पाहिजे असा तिथे नियम आहे. चादोर घालण्याची बेट्टी ला आणि माहतोब सक्ती करण्यात येते.
अशा गलिच्छ देशात बेट्टी आणि माहतोब यांना राहाणे म्हणजे एकप्रकारे शिक्षा च वाटते. अमेरिकेतील तिच्या आईवडिलांची,मुलांची आठवण तिला स्वस्थ बसू देत नाही. सुरवातीला बेट्टी मुडीच्या विनवण्या करते अमेरिकेला परत जाण्याविषयी. परंतु काही कारणे काढून मुडी टाळत असतो. इराणमध्ये आल्यावर अमेरिकेतील नोकरी गेल्याचे मुडी बेट्टी ला सांगतो.  हळूहळू बेट्टी च्या लक्षात यायला लागतं की इथे आपल्याला व माहतोबला फसवून कायमचं इराण मध्ये आणलं आहे.
हळूहळू मुडीचा जाच वाढत जातो. तिचे फोनवर चे बोलणे बंद करण्यात येत. आमे बोझोर्ग आणि तिचा मुलगा  यांच्या सहाय्याने मुडी बेट्टी ला घराण्याचे नियम आत्मसात करायला भाग पाडतो. इंग्लिश मधील कुराण वाचणे हा बेट्टी  ला आवडता छंद झाला असतो.  कुराणाचा दाखला देऊन ती घरातील सगळ्यांशी वाद घालण्याचा निष्फळ प्रयत्न करते. वेळ नेहमीच माणसाची परीक्षा घेत असते हेच सत्य आहे.
पुढे मुडी  माहतोब ला तिथेच शाळेत दाखल करून तिचे शिक्षण चालू करतो. माहतोब ला शाळेत सोडणे, आणणे
यानिमित्ताने बेट्टी ला बाहेर पडायला मिळत होते आणि दर गुरुवारी कुराणाचा क्लास त्याचा फायदा असा झाला की बाहेर मैत्री वाढत गेली.  यावरही काही दिवसातच मुडी अंकुश लावतो. काही दिवसातच मुडीला पण तिथे नोकरी मिळते.
अमेरिकेत जाण्यासाठी बेट्टी वारंवार सांगते तरीही तिकडे लक्ष न देता बेट्टीला मारहाण करणे, नजरकैदेत ठेवणे, माहतोब ला आणि बेट्टी ला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे असे अमानवी क्रूर कृत्य करत राहतो. जेणेकरुन बेट्टी पुन्हा अमेरिकेचा हट्ट करणार नाही. अशाही परिस्थितीत बेट्टी अमेरिकेला जाण्याचे प्रयन्त चालूच ठेवते. तिला काही लोक खूप चांगले भेटले, काहींनी फसविले. हेलन बालासेनियन ही इराण मध्ये एंबसीत काम करणारी स्री , एक दुकानदार हमीद, बेट्टीच्या काही मैत्रिणी झरी,फरिश्ते,अँलिस चँमसे यांची बेट्टीला खूप मदत मिळाली. मदत करणारा कोणत्या धर्माचा,पंथाचा किंवा जातीचा आहे हे महत्वाचे नाही तो माणुसकी जपणारा आहे हे महत्वाचे आणि अशाच माणुसकीने जगणाऱ्या लोकांच्या चांगुलपणावर  जगरहाटी सुरू आहे असे वाटते.
इच्छा तिथे मार्ग यावर बेट्टी चा विश्वास असतो. एक दिवस असाच एक अनामिक एका चिठोऱ्यावर एक पत्ता खरडून बेट्टी ला देतो.  त्या पत्त्यावर बेट्टी जाते. इथे अमाल नावाच्या व्यक्तीस भेटते आणि सुरू होतो तिचा अमेरिकेच्या दिशेने प्रवास.
रक्त गोठवणाऱ्या थंडीत अतिशय खडतर प्रवास, प्रत्येक क्षणी टांगती तलवार, कल्पना केली तरी मनात प्रचंड वादळ उठतं, असे असूनही बेट्टी फक्त माहतोबसाठी ही रिस्क घेते.  वाचतांना अंगावर अक्षरशः शहारा येतो. तिला मदत करणाऱ्यांच्या डोळ्यात देखील अश्रू येतात. साथ देणाऱ्या चिमुकल्या माहतोब चे खूप कौतुक वाटत.स्त्री ही अनंत काळासाठी माताच आहे हे जाणवतं. मुडी आणि त्याच्या नातेवाईक यांच्याबद्दल मनात चीड,घृणा निर्माण होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून केवळ मुलींसाठी बेट्टी हे साहस करते.  बेट्टी च्या या साहसाला त्रिवार मुजरा.

रसिका राजीव हिंगे
अकोला
8600047066
    
  

Sunday, 10 May 2020

कालिंदी


गूढ गहन अंधारात ब्राम्ह मुहूर्तावर साधनेसाठी पद्मासन घातलं की जगाचं भान विसरून साधनेचा परमोच्च बिंदू गाठणाऱ्या कालिंदीची जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेली  ही भावरम्य कहाणी आहे.
पुण्यासारख्या शहरात भिक्षुकाच्या घरी जन्मलेली विशाल अथांग डोळ्यांची कालिंदी अतिशय सुंदर होती. आईबाप आणि मोठ्या बहिणी व भाऊ सगळेच अहंकारी. कुजकट स्वभावाची रक्ताची नाती होती. आपल्या  प्रारब्धानुसार आपणास कुठे जन्म मिळेल हे ठरलेलं असत.यामध्ये ही सगळ्यात वेगळी. लहानापासून सगळंच शिकण्याची आवड असलेली कालिंदी वडिलांच्या अनुपस्थितीत छान प्रवचन सुद्धा करायची. मिळालेल्या मानव जन्माचे सार्थक करून घ्यावे हेच उद्दीष्ट असावे कालिंदीचे असे वाटते.
धाडसी,विक्षिप्त, अध्यात्माची आवड असणाऱ्या स्वामी नावाच्या वल्ली ची आणि कालिंदीची भेट होते. शिक्षण,नोकरी नाही, चित्र काढणे,गाणे, मिळेल ते काम करून जीवन जगणारा स्वामी कालिंदीला आवडू लागतो.
आणि सगळ्यांचा विरोध पत्करून भावनाप्रधान पण धाडसी स्वामी आणि शांत,निश्चल, संयमी कालिंदी चा विवाह होतो. यावेळेस घरात उठलेले वादळ, पोलीस तक्रार हे सगळंच खूप छान लेखकाने रंगविले आहे. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन संसार सुरू होतो. सर्वसाधारण बेरोजगारीचा जसा संसार असतो तसाच यांचा ही सुरू असतो. दारिद्र घरात ठाण मांडून बसलेलं. कारण कुठेच जीवनाला स्थिरता नाही. वारं जणू.  थोडं कुठे स्थिर होऊ लागलं की मध्येच स्वामी पळायचा अध्यात्माच्या वेडात. कसलेच भान नसायचे. दोन मुलं झालीत पण लगेचच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी सिगरेट च्या धुराच्या वलयात स्वामी दुःख विसरायचा. दुसरा मुलगा गेल्यावर स्वामींचे वक्तव्य वाचतांना त्यांची अध्यात्माची उंची किती खोल आहे हे जाणवते.
मन चंचल पण स्थिर असलेल्या कालिंदीची साधना, नामस्मरण चालूच असत. स्वामी हा जन्मापासूनच साधनेतला माणूस. कालिंदी त्याला त्याची आदिशक्ती वाटायची. संसाराचा गाडा ओढायला फार कष्ट करावे लागत होते, त्यात स्वामीचे आजारपण तरीही सगळं करून कालिंदीची साधना सुरूच असते.
पुढे एक मुलगी आणि दोन मुलं अशी तिची संसारवेल बहरते. कालिंदी च घरातील कर्ती असते जणू. कारण केव्हाही स्वामी कधी सहा महिने तर कधी चार दोन महिने साधनेसाठी हिमालयात किंवा कुठेही अरण्यात निघून  जायचा. मुलांच्या वाटेला कधी यायचाच नाही.मुलांना घडवितांना कालिंदी साधनेच्या एकेक पायऱ्या चढत होती.अन्यायाच्या, अत्याचाराच्या विरोधात प्रतिकार करणारी कालिंदी वाचतांना अक्षरशः आपल्यातही अशी शक्ती यावी असं वाटायला लागतं.  प्रचंड ताकद, धाडस कालिंदी मध्ये होतं. तिच्या साधनेचं तेज असावं कदाचित.
प्रेस मध्ये बनावट छपाईचा आरोप स्वामी वर येतो. श्री भाऊसाहेब काळे पोलीस अधिकारी स्वामीचे निर्दोषत्व सिद्ध करतात. केवळ सद्गुरू शंकर महाराजांची कृपा. यावेळी स्वामीला शारीरिक त्रास खूप होतो  मानसिक त्रास होणे शक्य नाही कारण या गोष्टी मनावर घेतल्याचं नाहीत कधी. स्वामींची साधना आणि वैराग्य उजळून निघत होत.
दोघेही जिथे जात तिथे माणसं जोडत असत. स्वामी भोवती साधनेवर त्याचे बोलणे ऐकायला लोक जमा होत. त्याला गुरू मानणारे बरेच होते पण तो सगळ्यांना श्री शंकर महाराजांना शरण जाण्यास सांगत असे. सद्गुरु श्री शंकर महाराजांनी स्वामीला भारत भ्रमण करण्याचा दिलेला आदेश म्हणून स्वामी पुन्हा घराबाहेर. याकाळात त्याला समाधी अवस्थेत पुढे घडणाऱ्या घटनेचा दृष्टांत, महाराजांनी घरी जाण्याची दिलेली अनुमती हे सगळं खूप अलौकिक आहे. वाचतांना क्षणभर विश्वास ठेवावा की नाही असाही विचार मनात येऊन जातो. कालिंदीला जंगलाचा चांगला अभ्यास होता. कितीही विषारी साप असले तरी ती सहज पकडू शकत होती.
स्वामीचे कधी हिमालयात तर कधी घरात असे करत यांचा उनपावसाचा संसार सुरू असतो. सांसारिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर कालिंदी वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचे ठरवते. स्वामीसह सद्गुरू शंकर महाराजांच्या परवानगीने लांब कृष्णेच्या काठी स्वामी आणि कालिंदी जाऊन राहतात. तिथल्या शांत वातावरणात दोघेही आपापल्या साधनेत  मस्त असतात.   पण सुनेला  कळतं की हे दोघेही कुठे आहे आणि ती त्यांना घरी घेऊन येते.  स्वामी पुन्हा निघून जातो. चार दोन महिन्यात परत आल्यावर सद्गुरूंनी संन्यास घेण्याची आज्ञा दिल्याचे सांगतो. आपल्याला संन्यास घे सांगणारे  सद्गुरू शंकर महाराज समर्थ आहेत कालिंदीला  सांभाळायला. कालिंदीचा सगळा भार आपल्या सद्गुरुवर सोपवून स्वामी कालिंदीला साष्टांग नमस्कार करून  कायमचा सोडून निघून जातो.
 वानप्रस्थाश्रमामुळे बिघडलेली  कालिंदीची प्रकृती दोन वर्षात सुधारली.  दरम्यान स्वामीला कोणीच पाहिले नाही.
स्वामीकडून काहीच खबर मिळाली नाही .आता आपणही  एकटं, कायमचं घर सोडायचे असे कालिंदी ठरवते. यावेळी खूप लांब कोणाला कळणार नाही अशा ठिकाणी जायचे ठरविते. स्वामीच्या साधनेच्या आड आपण येऊ नये म्हणून जाणून त्याला दूर ठेवणारी कालिंदी स्वामींच्या भेटीसाठी हळवी होते. आसक्ती नाही पण एकदा तरी पाहता यावे यासाठी. स्वामी म्हणजे एक विचित्र चीज आहे
घर सोडायचे हे नक्की करिते. कधीही कोणाला त्रास न देणारी कालिंदी आताही कोणाचीच झोप मोड होणार नाही याची दक्षता घेत पहाटेच्या अंधुक अंधारात झपाझप पावलं टाकीत निघाली. कुठे जायचं माहीत नाही. सद्गुरू नेतील तिकडे जायचं. एका सद्गुरू वाचून मनात काहीच नव्हतं.
तरीही मनात स्वामीला भेटण्याची ओढ होती. प्रेमाला नेहमी मनाची ओढ असते तशीच स्वामी च्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या कालिंदीच्या डोळ्यात क्षणभर अश्रू दाटून येतात. स्वामींच्या आठवणीत किती चालून आली याच भानही तिला रहात नाही. मध्ये कोणी भेटले तरी जास्त वेळ त्यांच्या बरोबर न राहता स्वतः मार्ग काढत चालत होती. नर्मदेच्या काठावर एका छोट्या गावात कालिंदी  आली.
कालिंदी या गावात येते आणि या गावाचा कायापालट करते. रात्री साधना, दिवसभर नामस्मरण, एकवेळच दुपारी जेवण बाकी काही नाही.  सुरवातीला भाषेची अडचण आली तरी हळूहळू कालिंदी या आदिवासी गावात रमू लागली. स्वतः काटकसरीचा संसार केल्याने तेथील बायकांना रोजगार कसा उपलब्ध करावा याचे ज्ञान देत होती.
मोठया मुलाच्या अरण्य अभ्यासामुळे तिलाही अरण्याची माहिती होती. या पार्श्वभूमीवर तिने बरेच बदल गावात घडवून आणले. याचबरोबर सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या कृपेने नामस्मरण आणि साधना उत्तरोत्तर वाढत जाते. या क्षेत्रातील एकेक पायरी ती वरवर चढतच जाते. जे जे आपणासी ठावे ते इतरांना सांगावे या न्यायाने स्वतः बरोबर इतर ही साधक घडविते. तिच्या कुटीमध्ये सातत्यानं सुगंध दरवळायचा. सुगंध आहे म्हणजे सद्गुरूंचे अस्तित्व आपल्याजवळ आहे. कालिंदीच्या कुटीत लोकांना वेगवेगळे अनुभव यायचे.
कुठूनतरी असाच हिंडत आलेला तरुण ज्याला साधनेची आवड असलेला.  सगळं गाव कालिंदीला नानी म्हणायचे आणि हा गुरू नानी म्हणू लागला.  हा शिल्पकार दगडातून मूर्ती घडविणारा. दिवसभर छिन्नी हातोडी घेऊन मूर्ती साकारणारा ह्या शिल्पकारास मधून सिगरेट,चहा,कांद्याची भजी लागायची. संध्याकाळी गुरू नानी सोबत नामस्मरण, साधना करायचा.
कालिंदी जवळ असलेल्या श्री शंकर महाराजांचा फोटो पाहून शिल्पकार महाराजांची मूर्ती घडविण्यासाठी शिळा घेऊन येतो. मूर्ती घडविण्यास सुरुवात केल्यावर त्याच्यातील सात्विक भाव, त्याची साधना, मूर्ती पूर्णत्वास येत असतांना शिल्पकारास आलेले अनुभव, वाचतांना अक्षरशः अंगावर शहारे येतात. एक टाकी सगळं वाचावं असं वाटत. कुठलीतरी अनामिक ओढ खिळवून ठेवते.
कालिंदीने आयुर्वेदिक  वनस्पतींचे इतके मोठे जंगल विकसित  केले असते की त्यासाठी सगळी औषधे बनवून बाहेर विक्रीस पाठवले जातात. गावाला रोजगार मिळतो.
शिल्पकारासाठी कालिंदीच्या हृदयात मातृत्वाचा एक हळवा कोपरा होता. शिल्पकारास कालिंदीने साधनेची संथा दिली. श्री शंकर महाराजांच्या शिल्पा समोर च स्वामी आणि कालिंदीचे शिल्प शिल्पकार साकारतो. या दोघांचीही साधना पराकोटीला पोहचली आहे.  एकदा तरी स्वामी भेटावा असं कालिंदीला मनापासून वाटत असतं. सद्गुरू शंकर महाराजांवर सगळं सोपवून  कालिंदी  संन्यास न घेता संन्यस्त जीवन जगते. तिच्या साधनेच्या परमोच्च क्षणाचे वर्णन करतांना लेखकाच्या भाषेला,प्रतिभेला अशी  काही मखमली झालर आली आहे की वाचतांना  स्वतः आपण तो क्षण अनुभवतो आहे की काय असे वाटतं. कारण लेखक पण याच अवस्थेतून गेलेले असावेत.
जग जसं चालावं तसच चालत असतं! सगळं 'छान आहे' म्हणावं,अधिक सुंदर; अधिक छान व्हावं यासाठी प्रयत्न करावे,सगळं सुंदर होईल, हो, फक्त भगवंताचं अधिष्ठान असावं!

रसिका

कहाणी लंडनच्या आजीबाईंची



"अवोS काय सांगू? मले लिवता आलं असतं ना तर एक मोSठं बुक, मोठंS बुक लिवलं असतं बघा!" असं म्हणणाऱ्या निरक्षर आजीबाई स्वतः एक मोठंS बुक झाल्या आहेत हे त्यांनाही कळले नाही.
सरोजिनी वैद्य यांनी लिहिलेल्या कहाणी लंडनच्या आजीबाई या पुस्तकाचे वैशिष्टये म्हणजे एका निरक्षर स्त्री ने स्वतःच्या जीवनाचा आलेख कसा उंचावत नेला हे होय.
जिद्द , कष्ट, दैन्य , सुख दुःख, कठोर योगायोग यांचं  मिश्रण म्हणजे अशिक्षित असलेल्या विदर्भातील राधाबाई, ज्या पुढे लंडनच्या आजीबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.राधाबाईंचा जन्म 10 फेब्रुवारी1910 रोजी देवळी तालुक्यातील चौंडी या गावी म्हणण्यापेक्षा 100 ते 150 मातीच्या आणि कुडाच्या घरांची वसाहत असलेल्या ठिकाणी झाला.  राधाबाईंचे आजोबा गोमाजी डहाके यांनी ही वसाहत वसवली होती.
तीन भाऊ आणि दोघी बहिणी अशी पाच भावंड आईवडिलांसोबत गुण्यागोविंदाने राहत होती. परंतु नियती वेगळंच काहीतरी ठरवित होती. लहान बहीण एक दीड वर्षाची असतांना चौंडी गावात आलेल्या प्लेग च्या साथीमध्ये गावातील बरेच मृत्युमुखी पडले त्यात राधाबाईंचे आईवडील ही ह्या रोगाच्या साथीचे बळी ठरले. घराची संपूर्ण जबाबदारी राधाबाई वर येऊन पडली. कामसू आणि कष्टाळू राधाने हळूहळू ही जबाबदारी लीलया पेलली.
घर सांभाळत असतांना एकीकडे वय वाढत होते. तेरा वर्षाच्या  राधाचे लग्न करणे गरजेचे होते.  तिच्यासाठी मुले बघण्यासाठी जनात्या आणि तिचा नवरा यवतमाळ मध्ये जातपंचायत मध्ये कोणाचे मुले मोठी आहेत याबाबत चौकशी करत असत. पाहिलेल्या तीन चार स्थळांपैकी
यवतमाळ मधील डेहणकर पाटील यांचा पस्तिशीतील चौथेपणाचा तुळशीराम राधाबाईच्या मनात भरतो आणि राधाबाई डेहणकरांच्या घरात गृहप्रवेश करतात. सुरुवातीला नव्याचे नऊ दिवस बरे जातात. पण मुळातच कजाग असलेली सासू राधाबाईंना त्रास द्यायला लागते. दोन अडीच वर्षानंतर त्यांना पहिली मुलगी होते आणि त्यानंतर लागोपाठ चार मुली झाल्यामुळे सासूचा जाच वाढत जातो.
मुलासाठीच सर्व काही असं समजणाऱ्या समाजात आजही कुठे विषेश फरक पडला आहे.  समाज अशिक्षित की सुशिक्षित याने काही फरक पडत नाही. समाज सुजाण असायला हवा हेच सत्य आहे. पुढे मुलगा नाही म्हणून काय करायचे  जमीन जुमला असा विचार करून  तुळशीराम शेतात जाणे बंद करतात. त्यातच उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो आणि एक दिवस राधाबाई आणि चार मुली मागे ठेवून तुळशीराम या जगाचा निरोप घेतो. राधाबाईवर आभाळ कोसळतं. एकीकडे चार मुलींची जबाबदारी तर दुसरीकडे दीर आणि जाऊ सगळं हडप करण्याच्या मागे असतात. तुळशीरामच्या आजारपणात घरातील होत नव्हतं ते सगळं गेल्यावर त्यांच्याजवळ काहीच उरत नाही. चार मुलींचे पोट कसे भरायचे हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या समोर आ वासून उभा होता. पण आहे त्या परिस्थितीत कोंड्याचा मांडा करून जगणे हे बालकडू मिळाले असल्यामुळे यातून  एकच मार्ग त्यांना दिसत होता तो म्हणजे दोन मुलींचे लग्न करायचे निदान दोन घास खायला तरी मिळतील मुलींना. मोठ्या भावाला सांगून आपल्या दोन मुलींचे लग्न राधाबाई लावून देतात. दिराला न सांगता स्वतः पण लग्नास उपस्थित नसतात. मनावर दगड ठेवणे म्हणजे काय याची जाणीव इथे होते. लग्नासाठी त्यांना त्यांचे स्वतःचे घर गहाण ठेवावे लागते.
अठराविश्व दारिद्र्य दूर करण्यासाठी राधाबाई त्यांच्या  परीने खूप प्रयन्त करत होत्या.  हे वाचतांना अक्षरशः मन हेलावून जातं.भाजी विकणे,धुणी भांडी करणे  यासारखी पण कामं त्यांनी केली. जोडीला  देवधर्म सुरू होतेच. पण दोन वेळेचे कसेबसे पुरेल एवढेच त्या कमवू शकत होत्या. घर सोडविणे गरजेचे होते. दीराचे जातपंचायतीच्या माध्यमातून दबाव आणण्याचे प्रयत्न चालूच असतात. पैसे नाहीतर पाट लाव म्हणजे दुसरे लग्न कर असा अनाहूत सल्ला दीर जातपंचायत च्या समोर देतो. त्यावेळी  अगतिक राधाबाई सगळ्यांसमोर या गोष्टीला नकार देतात. एकदा का स्त्रीने ठरविले तर ती काहीही करू शकते, तिची जिद्द, तिचा निर्धार हेच तिची इच्छाशक्ती होऊन जाते.
राधाबाईचे असे  हलाखीचे दिवस काढणे चालूच होते. राधाबाईंच्या ओळखीचे पांडुरंगपंत जिरापुरे यांचेकडे विलायतेचा वारकरी म्हणजे सीताराम उर्फ आबाजी बनारसे ही व्यक्ती डेरेदाखल होते. आबाजींचे तीन मुले अतिशय हुशार आणि कष्टाळू. एक इंग्रज अधिकाऱ्याच्या पाठीमागे त्यांचा मोठा मुलगा लंडन ला नशीब आजमावयास जातो आणि तिकडेच राहतो. उद्योगाच्या मदतीसाठी आबाजींचे तिन्ही मुले लंडन मध्ये स्थायिक होतात. मुलांमागे आबाजी पण तिकडेच  रमतात कारण त्यांची बायको त्यांना मुले लहान असतांनाच सोडून गेलेली असते. पाच सहा वर्षानंतर आबाजी भारतात येतात.  पांडुरंगपंत जिरापुरे आणि आनंदीबाई जिरापुरे याना 55 वर्षाचे आबाजी पुन्हा लग्न करण्याविषयी सांगतात. यवतमाळ चे मिठेमास्तर आणि आनंदीबाई जिरापुरे राधाबाईचे स्थळ सुचवतात पण राधाबाई स्पष्टपणे नकार देतात.
माणसाने ठरविलेले जे आहे त्याच्या अगदी विरुद्ध नियती करण्यास भाग पाडते. परिस्थिती जसं शिकवून जाते तसंच काहीवेळेस लाचार पण करते. असच काहीसं राधाबाईच्या बाबतीत झाले. राधाबाईंच्या अनुपस्थितीत मुलींचे दिराशी भांडण होते त्यावेळी  मुलींना रस्त्यावर उभे राहून भीक मागा पण इथे राहू नका. असे ऐकल्यावर राधाबाई खूप चिडतात, त्रागा करतात पण काही उपयोग होत नाही. खूप विचारांती  दोघी मुलींचे पोट भरण्यासाठी आणि या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी थोडक्यात काय तर उपजीविकेसाठी राधाबाई आबाजी बरोबर पाट लावायला तयार होतात. गावाच्या बाहेर मारुतीच्या मंदिरात रात्री बारा वाजता राधाबाईचा आबाजीसोबत पाट लागला म्हणजे लग्न होतं कारण हे पाट लावणे असेच मध्यरात्री करावयाचा विधी आहे अशी रूढी आहे.
राधाबाईंचा दुसरा संसार तर सुरू झाला पण दुर्दैवाने इथेही त्यांची पाठ सोडली नाही. आबाजींनी लग्नाआधी दिलेली सगळी वचनं मोडीत काढली. दोघी मुली सांभाळण्याचे दिलेले वचन  तर त्यांनी  अजिबातच पाळले नाही. दोन्ही मुलींना राधाबाईंच्या लग्न झालेल्या मुलीजवळ पाठवून दिले आणि त्यांचा सगळा खर्च मात्र आबाजी करतात.
मुलींना आणण्याबद्दल राधाबाई काही बोलल्या तर त्यांना मार खावा लागे.जगायचे म्हणून जगणे चालू होते. आणि एक दिवस दोन्ही मुली इथेच ठेवून आबाजी समवेत राधाबाई लंडन ला जातात.
लंडनला सावत्र मुलांकडे राहून पडेल ते कामे करीत राधाबाई जगत होत्या. उपजीविकेचे साधन म्हणून आबाजीसोबत पाट लावलेल्या राधाबाईंना पुन्हा वैधव्य येत. जलोदराचे निमित्त होऊन आबाजी चार वर्षात राधाबाईना सोडून गेले.सावत्र मुलांनी राधाबाईंना फसवून सगळी इस्टेट  स्वतःच्या नावावर करून घेतात. पण राधाबाई सावत्र सुनांच्या मदतीने स्वतःच्या दोघी मुलींना लंडन मध्ये बोलावून घेतले. मुलांच्या घरात राहून मोलमजुरी करून राधाबाई दिवस काढत होत्या. मुलीही शाळेत जाऊ लागल्या
1952 सालात बनारसे कुटुंबावर बऱ्याच आपत्ती कोसळल्या. या काळात त्यांची नातवंडे त्यांच्या अधिक जवळ आले. आणि राधाबाई या आजीबाई झाल्या.
सगळं सुरळीत चालू असतांना त्यांचा सावत्र मोठा मुलगा बोटीचे तिकीट काढून आणतो आणि त्यांना भारतात परत जाण्यास सांगतो. दहा दिवसात घर रिकामे करावयास सांगतो. पण आजीबाई पक्का निर्धार करतात कोणत्याही परिस्तिथीत लंडन सोडायचे नाही. सोबत असतात त्यांच्या दोन मुली आणि त्यांच्याकडे राहणारे विद्यार्थी.
आजीबाईंचा देवावर फार श्रद्धा,विश्वास असतो. त्यांचे आराध्य साईबाबा यातून काहीतरी नक्की मार्ग काढतील याबर त्यांचा विश्वास असतो. स्वतःच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असूनही प्रत्येकवेळी नियतीचा  खेळ वेगळाच होता. घर सोडायच्या दोन दिवस आधीच त्यांना एका घराचा पत्ता कुणीतरी एजंट आणून देतो. लगेच आजीबाई त्यांच्या मुलीच्या मदतीने त्या पत्त्यावर जाऊन मालकाशी बोलून त्या घर भाड्याने मिळवतात आणि पंचवीस हुप लेन येथे रहावयास येतात.  डोक्यावर छप्पर मिळालं आता मला आकाश मोकळं आहे या श्रद्धेने त्या देवाचे आभार मानतात.
पंचवीस हुप लेन मध्ये राहायला आल्यावर आजीबाईंनी मागे वळून पाहिले नाही. अपार कष्ट, आणि सुग्रास जेवण आजीबाई करत गेल्या आणि अवघ्या तीन महिन्यात भाड्याने घेतलेले घर स्वतः विकत घेतले.   लंडन मध्ये सुरूवातीला आजीबाईंना काम करतांना सगळ्यात मोठी अडचण होती ती भाषेची.  परंतु त्यावर ही मुलीच्या मदतीने त्यांनी हळूहळू मात केली. रोज मार्केट मध्ये जाऊन ओळखी वाढल्या, काहींनी मदत केली तर काहींनी फसवले सुद्धा. पण हरतील त्या आजीबाई कशाला. त्यांचा जम त्यांनी लंडन मध्ये बसविलाच.
पंचवीस खूप लेन मध्ये तर जणू प्रत्यक्ष अन्नपूर्णा अवतरली आहे असे वाटत होते. भारतातून लंडन ला गेलेले बहुतेक सगळेच आजीबाई कडे गेले नाही असे होत नसे. यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर,पु.ल.देशपांडे , ज्योत्स्ना भोळे यासारखे आणि लंडनमधील आर्चबिशप कॅटरबरी अशी बरीच मंडळी आजीबाईकडे असत. भारतातून आलेल्या मराठी लोकांना लंडनमध्ये आजीबाई चे घर म्हणजे एकत्र भेटण्याचे एक ठिकाण होतं.
आजीबाईंनी लंडन मध्ये स्वतःचे साम्राज्यच जणू उभे केले असे म्हणायला काही हरकत नाही. जवळपास बारा ते तेरा इमारती आजीबाईच्या मालकीच्या होत्या. त्यांच्या घरातील गणपती उत्सव म्हणचे एक महोत्सव असे लंडन मध्ये. त्यांचे आराध्य साईबाबा याचे भव्य मंदिर त्यांनी तिथे उभे केले.
लहानपणापासून प्रत्येक वळणावर आलेली स्थित्यंतरे, त्यातून हिमतीने स्वबळावर काढलेला मार्ग  हे सगळं कल्पनेच्या पलीकडचे आहे.एका निरक्षर स्त्री ने अनेक हालअपेष्टा सहन करून लंडन सारख्या परक्या देशात स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला ही सामान्य गोष्ट नाहीच.
    03 डिसेंबर 1983 साली त्यांच्या सगळ्या इच्छापूर्ती झालेल्या असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. अशी ही साठा उत्तराची लंडनच्या आजीबाईंची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

रसिका राजीव हिंगे
अकोला
8600047066

सहज सुचलं म्हणून..आई







     आई! ब्रह्माड साठवलं आहे या दोन अक्षरात. माझी आई खूप वेगळी होती. प्रत्येकाची आई स्वतःसाठी वेगळीच असते ना! साधी, संस्कारक्षम,सालस रूप लाभलेली. जगातलं व्यवहाराने वागणं तिला कधीच जमलंच नाही. शब्दांचं भांडार तर इतकं होत की  काहीवेळेस असे वाटे की ही कुठून आणते एवढे शब्द, म्हणी तर इतक्या पाठ होत्या की माझ्या भावजयीला त्याच अप्रूप वाटलं आणि चक्क तिने त्यावर लेख लिहिला तेव्हा कळलं आईचे शब्दभांडार कारण भावजय पण मराठी ची जाणकार शिक्षिका. तिला यातलं सौंदर्य कळलं. कधी कुणाचा दुस्वास नाही की कुणाशी स्पर्धा नाही. नेहमी म्हणायची "त्याचं चांगलं होऊ दे त्याच्यापाठी माझं चांगलं होऊ दे" कोंड्याचा मांडा करून संसार करणारी आई कधी हट्ट नाही की कोणाची बरोबरी नाही. मुलांना चांगले संस्कार दिले त्याचे फळ तिला मिळाले. आम्ही सगळी बहीण भावंड आपापल्या घरी सुखात आहोत. चालता बोलता ज्ञानकोश,संस्कार कोश म्हणजे माझी आई. आज mothers day च्या निमित्ताने सारखी डोळ्यासमोर येते आहे. सकाळपासून बरेच छान छान msg वाचले आणि तिची उणीव जास्त जाणवायला लागली.

माझी आई

आई माझी गोरीपान
दिसे सुंदर गव्हाळ
नाक तिचे चाफेकळी
रूप असे ग सोज्वळ

माय माझी आठवता
ऊर भरून येई ग
अश्रू नयनी दाटले
बांध कसा घालू ग

नसे व्यवहार ठावे
स्वार्था सवे परमार्थ
होते जगणे साधेच
झाले जीवन कृतार्थ

बाळघुटी संस्कारांची
तुच दिली उगाळून
सांग ना ग आई मला
कसे फेडू तुझे ऋण

नसे कशाचीच भीती
जगतांना आता मला
तुझ्या संस्कारांची ठेव
देते पुढच्या पिढीला

राहू दे ऋणात देवा
नको याची उतराई
वसा चालविण्या तुझा
मज बळ दे ग आई

रसिका