Friday, 21 May 2021

ओठ बंद

 



ओठावरी पहारे बसवून कोण गेले

श्वासास भार आता देऊन कोण गेले


ओठात काय आहे सामावले अजुनी

नादावल्या क्षणांना फसवून कोण गेले


आभाळ भेटलेले आहे जणू धरेला

स्पर्शातल्या सुखानी लाजून कोण गेले


मौनातली असावी भाषांतरे प्रितीची

निःशब्द भावनांना सजवून कोण गेले


ओठात बंद केले जगण्यातले निखारे

दुःखात या तरीही मोहून कोण गेले


©️रसिका राजीव हिंगे

Thursday, 20 May 2021

माझी आठवण आल्यावर

 


सोनसळी कातरवेळी

दूर दूर कुठे क्षितिजावर

दिसे मोरपीस प्रीतीचे

माझी आठवण आल्यावर


कालिंदीच्या तीरावरी

राधेच्या गंधित कुंतली

माळतांना सुगंधित फुले

रानवाट ही गंधाळली

अभिसारिका भासे नवथर

माझी आठवण आल्यावर


चांदणफुले होती बरसत

नवी स्वप्ने नवा उन्मेष

येता नभांगणी शशीनाथ 

उधळला चौफेर प्रकाश

आठवे सुख हिंदोळ्यावर

माझी आठवण आल्यावर


विसरूनिया हेवेदावे

रंगला होता डाव छान

इंद्रधनू सम सौंदर्याची

सप्तसुरांची सजे रुणझुण

असेच भास होती क्षणभर

माझी आठवण आल्यावर


सोनसळी कातरवेळी

दूर दूर कुठे क्षितिजावर

दिसे मोरपीस प्रीतीचे

माझी आठवण आल्यावर


©️रसिका राजीव हिंगे

Wednesday, 19 May 2021

चित्रकाव्य




काळाच्या गर्भातुनी वेळ येतसे जन्मास

क्षणांच्या सृजनातून  आकार आयुष्यास


प्रहर घटिका पळे निसटून ऐसे जातात

नक्षीदार संवत्सरे जणू एका निमिषात


मी  तू अहंकारात का तू ऐसा बुडविसी

सख्य जोडीत जावे मोजलेल्या श्वासांसी


कसा कधी पडेल घाला विचित्र दैवाचा

कर्म संचित प्रारब्ध खेळ हा नियतीचा


उगाच अट्टहास का भौतिकी जगण्याचा

शाश्वत आहे तोच आधार असे  सृष्टीचा


रसिका राजीव हिंगे

Tuesday, 18 May 2021

आधार

 



    दारावरची बेल वाजली. मालतीबाई नी दार उघडलं समोर पोलीस उभे पाहून त्यांचे सर्वांग थरथरू लागलं. "विजयराव देशमुख आहेत का घरी?"

 " हो, आहेत. काय काम होतं?" थरथरत मालतीबाई कशा बशा बोलल्या. 

 "त्यांनाच भेटायचे आहे. आत येऊ का?"

 "अ, हो  या ऽऽ नं."

 तोपर्यंत विजयराव बाहेर आले, कोण आहे ते पहायला. दारात आयपीएस भरत दराडे यांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. "या आत या सर" असे म्हणत त्यांना विजयराव घरात घेऊन आलेत.

     विजयराव आणि मालतीबाई बैठकीत त्यांच्या समोरच बसले होते. आयपीएस दराडे बैठकीत सभोवार नजर फिरवत सोफ्यावर स्थानापन्न झाले. 

     घर छान सजविले होते. कुठे भपका नाही की पाश्चात्य संस्कृती चे प्रदर्शन नाही. टीव्ही,सोफा, एसी असलेलं साधं चार खोल्यांचा घर होत. उच्च मध्यमवर्गीय घर जसं असतं तसंच. विजयरावांकडे पाहून वाटलं एक सेवानिवृत्त सुखी आयुष्य जगत असलेले समाधानी व्यक्तिमत्त्व. सारं बघता बघता मालतीबाई कडे नजर जाताच भरत दराडे यांचे डोळे पाणावले. अश्रू च्या अंधुकशा प्रकाशात त्यांच्यासमोर सिनेमातील खेळाप्रमाणे सारा भूतकाळ तरळून गेला. पंचवीस वर्षांपूर्वी चा तो दिवस त्याच्या डोळ्यासमोर आला.

     संसाराचा गाडा नीट चालावा म्हणून मालतीबाई शाळेत नोकरी करत होत्या. विजयराव बँकेत असले तरी खूप पगार नव्हता. नोकरी लागल्याबरोबर लगेच मालतीबाई शी प्रेम विवाह केला असल्यामुळे आधीची काहीच शिल्लक नव्हती. शिवाय पदरात दोन गोंडस मुलं होती. त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी  मालतीबाई ना नोकरी करणे गरजेचे होते.

     मालतीबाई ची सवय होती रोज संध्याकाळी शाळेतून घरी येतांना  त्या वाटेतल्या  गजानन महाराजांच्या मंदिरात न चुकता जात असत. 

     एके दिवशी त्या मंदिरात आल्या तर त्यांच्या समोर एक सात आठ वर्षाच्या छोटा मुलगा उभा राहून 

     "आई हार घे ना, बाबासाठी, आज गुरुवार आहे, महाग नाही फक्त पाच रुपये."

      मालतीबाई नि विचार न करता पाच रुपयाचा हार  घेतला आणि त्या मंदिरात गेल्या. दर्शन घेऊन बाहेर आल्या आणि नेहमी प्रमाणे चप्पल घालून निघाल्या तर पुन्हा तो समोर आला. 

      " आई आज तुम्ही हार घेतला न बघा माझ्या धंद्याचीच बोहनी झाली हो. आठवड्यापासून इथे फुलं विकतो आहे पण कोणी घेई ना. खूप उपकार झाले तुमचे."

     "बरं बरं रोज घेईल मी हार" असे म्हणून मालतीबाई घराकडे झपझप चालू लागल्या. यानंतर त्यांचा रोजचाच क्रम झाला, याचेकडून हार घ्यायचा अन दर्शन घेऊन त्याच्याशी थोडं जुजबी बोलून त्या घरी येत. हळूहळू ओळख वाढत गेली.  

  "काय रे नाव काय तुझं?"

 "राजू" 

 " कुठे राहतो?, आईबाबा काय करतात तुझे?"

 " मी समोरच्या घरात राहतो. मावशी कडे. मावशी म्हणजे आईची शाळेतली मैत्रीण आहे. तिच्याकडे सगळी कामे करतो. अन संध्याकाळी इथे फुलं विकतो."

      त्याची कर्म कहाणी ऐकून मालतीबाई ना खूप वाईट वाटायचे. इतका गोड मुलगा का त्याच्या वाट्याला असे कष्ट यावे. खेळायचे, बागडायचे दिवस त्याचे अन तो व्यवहार शिकतो आहे. खरंच काय असेल बरं त्याचं प्रारब्ध. 

      घरी आल्यावर एकदा जेवतांना  मुलांना त्या सांगत होत्या. "बाहेर किती वाईट परिस्थिती आहे. शिक्षणासाठी काय काय करावं लागतं. तुम्हाला मिळतं आहे तर तुम्ही मेहनत करा आणि यशाची शिखरे गाठा जी तुम्हाला खुणावत आहेत." असे रोज काहींना काही मालतीबाई मुलांना सांगून त्यांना प्रोत्साहित करत होत्या.

      आज राजू खूपच उदास दिसत होता. त्याचे डोळे सारखे भरून येत होते.काय करावे काहीच त्याला सुचत नव्हते. तेवढ्यात मालती बाई मंदिरात पोहचल्या. त्याच्याकडे पाहताच  आज काहीतरी झालं आहे हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. दर्शन झाल्यावर  त्या राजूजवळ आल्या, "काय रे काय झालं आज? का असा दिसतोस? रडला का?"

 "आई, मावशी म्हणते आता पुढं काही शिकू नको, एवढे पैसे नाहीत आमच्याजवळ" 

 "पण मला शिकायचे आहे,कसेही करून मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. सरफरोश सिनेमामध्ये जसा अमिरखान होतो तसे ."

 "तू कुठे बघितला सरफरोश?"

 "मावशीची मुलं बघत होती तेव्हा पाहिला टीव्हीवर. आई तुम्ही करू शकता काही माझ्यासाठी. म्हणजे मावशीला सांगा न मला पुढे शिकू दे."

 "ठीक आहे बघू आपण ."

      असे म्हणून मालतीबाई विजयरावांना याविषयी सांगतात,पण विजयरावांना असे काही आवडत नव्हते. त्यांचे म्हणणे एवढेच होते की "असे कितीतरी प्रत्येक मंदिरासमोर असतात, फुटपाथवर असतात त्यांना काय प्रत्येकाला तू मदत करीत फिरशील का?" पण मालतीबाई ना काही हे पटेना. राजू चा रडवेला चेहरा सारखा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता.

      त्यांचं शिक्षकी मन त्यांना शांत बसू देत नव्हतं. कसंही करून राजुला मदत करायची पण कशी हे सुचत  नाही. शेवटी शिक्षकच खरा मार्ग दाखवितो ये सत्य आहे. त्यांनी राजुला जवाहर नवोदय विद्यालय दिल्ली ची परीक्षा द्यायला सांगितले. त्या परीक्षेची फी,पुस्तके सारा खर्च मालतीबाई करत होत्या. विजयरावांचा विरोध पत्करून. राजू ने त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. राजू नवोदय विद्यालयाची परीक्षा पास झाला आणि पाचवीपासून राजू नवोदय विद्यालयात दाखल झाला. त्याचे स्टेट बँकेत मालतीबाई नी खाते उघडले आणि दरमहा त्याच्या खात्यात पैसे जमा करू लागल्या. 

      राजुचे शिक्षण सुरू झाले. दरवर्षी पहिल्या तीन क्रमांकात त्याचा क्रमांक येत होता. पाचवीपासून राजू बाहेरगावी असल्यामुळे कधी त्याची भेट होत नव्हती. त्याच्या शाळेत मुख्याध्यापकामार्फत त्यांची चौकशी मालतीबाई करत असत. त्याच्या अवांतर खर्चाचा सगळा भार एक पालक म्हणून मालतीबाई नी उचलला होता.याबाबत विजयराव आणि त्यांचे कधीच एकमत झाले नाही. तरीही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले.

      मालतीबाई आणि विजयराव दोघेही आता सेवानिवृत्त झाले. त्यांची दोन्ही मुलं शिक्षण पूर्ण करून नुकतीच नोकरीला लागली होती.

      एक दिवस अचानक राजुचा फोन आला,"आई आता मला पैसे पाठवू नको,माझे शिक्षण पूर्ण झाले आहे मी नोकरीला लागलो आहे. लवकरच भेटू आपण." 



राजू च्या आवाजातील आत्मविश्वास,मार्दव ऐकून मालतीबाईचे पापणकाठ पाणावलेत. आपण योग्य निर्णय घेतल्याने त्या सुखावल्या. कधी एकदा राजुला भेटते असे झाले त्यांना. किती मोठा झाला असेल न आता, ओळखायला येईल की नाही आपल्याला या विचारात त्या रमू लागल्या. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचीही जपवणूक करता आली याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

      "मालती, हे आयपीएस भरत दराडे. नव्याने रुजू झाले आहेत इथे. कालच माझी एका कार्यक्रमात यांची ओळख झाली."  विजयरावांच्या आवाजाने आयपीएस भरत दराडे भानावर आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून विजयराव चपापले. 

      "काका माझी ओळख काय करून देता या माऊलीला! हिच्या खंबीर आधाराने मी आजचा दिवस पाहतो आहे. ही माऊली नसती तर मी कुठेतरी हमाली करत असतो आज."

आई मी राजू तुला हार विकणारा राजू..... "

     राजुचे शब्द ऐकले आणि मालतीबाई नी  डोळयातल्या आनंदाश्रू ना वाट करून दिली.....


©️रसिका राजीव हिंगे

      

   #Adhar#sobat#rasraj#shikshn#ips#

Sunday, 16 May 2021

वाट



अंगावरी उन्हाळा घेऊन वाट जाते

गुलमोहरी फुलांना पाहून वाट जाते


वारा उनाड झाला थैमान पावसाचे

पाण्यात चिंब भिजली वाहून वाट जाते


अंधारले तरीही आधार देत राही

मार्गात चालण्यासी  शिकवून वाट जाते


चाफ्यास गंध आला दारात लावलेल्या

ग्रीष्मात गारव्याला  देऊन वाट जाते


दुःखास मागतांना कुंती जरा न ढळली

कृष्णावरी विसावत चालून वाट जाते


रसिका राजीव हिंगे


Wednesday, 5 May 2021

चित्रकाव्य

 



काय सांगू नवलाई

माझ्या मराठी मातीची

बहू रत्नांची निर्माती

माय साऱ्या संस्कृतीची


मांदियाळी संतांची गे

येई इथेच जन्मास

शौर्य नि पराक्रमाचा

रुजे इथे इतिहास


सालंकृत झाली भूमी

गड किल्ले कपारींनी

गोदा, चंद्रभागा तीर्थे

पापे सारे प्रक्षाळणी


सह्याद्रीच्या सावलीत

महाराष्ट्र सुरक्षित

आर्थिकाच्या सिंहासनी

विराजतो माझा प्रांत


जरीपटक्याचा डौल

ऐसी गौरवाची गाथा

तुज त्रिवार मुजरा

तव चरणी हा माथा


 

रसिका राजीव हिंगे



Monday, 3 May 2021

चित्रकाव्य

 



गर्भातल्या या फुलानी

हाक हळूच दिधली

नाळ तुटता क्षणांती

साद आईचीच आली


मार्गावरी वात्सल्याचे

स्तंभ आगळे वेगळे

जीवनाच्या वाटेवरी

जगण्याचे हे सोहळे


मखमली झाली वाट

आधाराला कुठे माप

कोण्या जन्माची पुण्याई

सुख दाटले अमाप


ऐसा चालतो वारसा

जन्मा मागुती जन्माचा

दान ममतेचे लाभे

खेळ सारा संचिताचा


रसिका राजीव हिंगे



Sunday, 2 May 2021

स्वप्नपूर्ती

 

   


     सकाळपासूनच आज अंजलीची धावपळ सुरू होती. घर आवरण्यात वेळ भराभर पुढे जात होता. दिवाणखान्यातील सोफ्याचे कव्हर बदलले, पडदे बदलले, फुलदाणीतील फुले बदलून आज टवटवीत छान मोगऱ्याचा गुच्छ फुलदाणीत ठेवला होता. सगळं घर मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळले होते. दारावर द्वारकेला घेतलेले तोरण लावले होते.

     अंगणात सुरेख रांगोळी घातली होती. अंगणातील सगळीच फुले गुलाब, निशिगंध, मोगरा अबोली आज विशेष फुललेली होती.

     स्वयंपाक पण सगळा चारी ठाव केला होता, नाहीतर रोज फक्त दोघांच्या पुरेसा हलका फुलका स्वयंपाक असायचा. आज वरण भात, बटाट्याची भाजी,आंब्याचा रस, शेवयाची खीर,चटणी,कोशिंबीर सारच कसं सगळं मनासारखे करून घेतले. माठात वाळा घालून ठेवला होता थंडगार वाळ्याचे पाणी पिण्यासाठी.

     हो.  आज समीर यायचा होता, खूप दिवसांनी घरी. आज अजय अंजलीच्या आयुष्यातील खूपच महत्वाचा दिवस. स्वप्नपूर्ती चा दिवस. त्यांचा समीर आज विंग कमांडर झाला होता. स्वयंपाक करता करता अंजली समोर सगळा भूतकाळ तरळून गेला. 

     लहानपणा पासूनच देशसेवा करायची असे समीर ने ठरविले होते. त्याच दिशेने त्याची वाटचाल सुरू होती.अजय  एका  खाजगी कंपनीत नोकरीला होता, अंजली एक गृहिणी.  काटकसर करून कोंड्याचा मांडा करून पै पै जमवून समीर चे शिक्षण सुरू होते. एकुलता एक मुलगा असल्याने सर्वसाधारण मुलांप्रमाणे समीर ने इंजिनिअरिंग करावे, जमल्यास पदव्युत्तर व्हावे एवढी माफक अपेक्षा असलेले अजय अंजली होते.

     पण समीर चे स्वप्न वेगळेच होते. शाळेत असल्या पासूनच त्याला भारतीय वायुसेनेचे आकर्षण होते. विंग कमांडर अभिनंदन म्हणजे समीरचा आदर्श जणू. त्याला  विंग कमांडरच्या गणवेशाचे  ही अप्रूप वाटायचे.अभिनंदन  सारखेच मला व्हायचे असे तो सारखा ठरवायचा.



     पण त्याच्या आईवडिलांना मात्र हे सगळं कठीण आहे, याला झेपेल का असं वाटत होतं. ज्यावेळी बारावीनंतर मला (एन.डी.ए.) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे असे समीर ने म्हणल्यानंतर आई चा जीव कळवळला. 

      "समीर, तुला हे सगळं जमणार आहे का? फार कठीण असतात या परीक्षा, नंतरचे प्रशिक्षण. सगळा नीट विचार करायला हवा समीर!"

      "आई बाबा तुम्ही काळजी करू नका, मी ठरवले आहे (एन.डी.ए.)  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मार्फत मला भारतीय वायुसेने मध्येच नोकरी करायची आहे. आई,  ८ ऑक्टोबर १९३२ पासून भारतीय वायुसेना देशाचे रक्षण करते आहे. हवाई युद्ध करण्यासाठी या दलाची स्थापना झाली. आजपर्यंत कितीतरी शूर योद्धे भारतीयांचे रक्षण करतात आहेत. विंग कमांडर अभिनंदन आपल्या प्राणाची बाजी लावू शकतो तर मी का नाही. बाबा, तो पण एक भारतीय आणि मी पण भारतीय आहे. मला भारताच्या सरंक्षण क्षेत्रात वायुसेने मध्ये जाऊन वेगळं करायचं आहे. मला परवानगी द्या." यावर दोघेही काय बोलणार! काहीतरी वेगळं करायला निघालेल्या मुलाला त्यांनी भरभरून आशिष दिले.

      अथक परिश्रम करून समीर ने (एन.डी.ए) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ची प्रवेश परीक्षा पास केली आणि तेथील शिक्षण पूर्ण केले. नजरेच्या टप्प्यात आपले स्वप्न दिसू लागले याचा किती आनंद झाला होता समीरला आणि त्याच्या आईबाबांना पण. 

      एकुलता एक मुलगा देशासाठी आपलं आयुष्य द्यायला निघाला आहे हे पाहून अजय ला भरून आलं. कारण त्याचे आजोबा सुद्धा स्वातंत्र्य युद्धात सावरकरांच्या सोबत कोणत्या न कोणत्या रुपात देशसेवा करतच होते. आजोबांनी कधी घराचा विचार केला नव्हता. दोनतीन वेळ तुरुंगात पण जावे लागले होते. आता आपला मुलगा त्याच्या पणजोबांचा वारसा चालवितो आहे यामुळे अजय अंजली दोघांनाही  कृतार्थ झाल्यासारखे वाटले.

       (एन.डी.ए.) राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समीर ची वायुसेने मध्ये पायलट ऑफिसर या रँक वर नियुक्ती झाली आणि या तिघांनाही आभाळ ठेंगणे वाटू लागले. "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" ही समर्थांची शिकवण आचरणात आली होती.

       समीर आता मागे वळून पहायला तयार नव्हता. मनासारखे सारे जुळून आले होते. प्रत्येक काम लीलया करण्याचा जणू त्याने सपाटाच लावला. देवभोळ्या आईबाबांचा हा देवभोळा मुलगा. परमेश्वरावर प्रचंड विश्वास असलेल्या समीर ला हे माहीत होते 

"सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।  

परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।"

     चळवळ म्हणजे आपले कर्म करत रहावे असे समजून समीर एक एक रँक वर चढत होता. त्याचा या क्षेत्रातील चढता आलेख पाहून,त्याची अद्वितीय कामगिरी पाहून त्याला अल्पावधीतच विंग कमांडर या रँक वर बढती मिळाली होती. शालेय जीवनापासून विंग कमांडर अभिनंदन सारखे होण्याचे स्वप्न पहात असलेल्या समीरची स्वप्ने प्रत्यक्षात उतरली होती. 

     दारात गाडी थांबल्याचा आवाज झाला आणि अंजली भानावर आली, दारात समीर उभा होता,विंग कमांडर समीर अजय कुलकर्णी, विंग कमांडर च्या गणवेशात. ....


रसिका राजीव हिंगे