Thursday, 17 November 2022

अन् माझे/त्याचे/तिचे आयुष्यच बदलले..



अन् त्याचेआयुष्यच बदलले..

    

      उदयाचली केशरियाची उधळण झाली, सलज्ज उषाराणी नटून भास्कराच्या स्वागताला उभी राहिली, पहाट पक्षी किलबिलत घरट्याबाहेर डोकावत निसर्गाचा आस्वाद घेण्यास आतुर झालेले होते, गंगेच्या पात्रात सोनसळी किरणांनी येऊन रविराज आल्याची वर्दी दिली अन चैतन्याला जाग आली. अशा प्रसन्न पहाटेच्या वेळी गंगेचे अभूतपूर्व सौंदर्य निरखत राहणे, तिच्या प्रवाहात हरवून तिच्याशी संवाद साधायला आशुतोषला फार आवडायचे. मनातलं सगळं तिच्याशी बोलले की त्याला एकदम शांत वाटायचे. दिवसभर ऑफिसमधे काम करायला उत्साह देणाऱ्या गंगेची ओळख झाली तीच एका चैतन्यमय व्यक्तिमत्वामुळे. जर त्यावेळी मला ती माऊली भेटली नसती तर मी आज कुठे असतो, कल्पनाही करवत नाही. गंगेच्या पाण्यातील गोल गोल उठणाऱ्या तरंगा सारखेच भूतकाळातील त्याच्या भवसागरातल्या तरंगावर तो तरंगत अगदी खोल खोल मुळाशी पोहचला.

     आशुतोष एक हुशार आणि समंजस विद्यार्थी म्हणून शाळेत ओळखला जायचा. लहानपणीच आईवडील गेल्यामुळे आजीच्या कुशीत लहानाचा मोठा झाला. आशुतोष दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला त्याचवेळी आजीस देवाज्ञा झाली. एकदा देवाज्ञा झाली की सामान्य माणूस कोणत्याच न्यायालयात दाद मागू शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे. आजी गेल्यामुळे आशुतोष एकटा झाला. मामा मामी होते पण दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे त्यांनाही आशुतोषला वेळ देणे शक्य नव्हते. कॉलेजचे फुलपाखरी दिवस. म्हणणारे, बोलणारे कुणीच नाही त्यामुळे स्वतःच स्वतःचे निर्णय घेत जगत होता. काय चुकीचे, योग्य की अयोग्य कळत नव्हते. मित्रमैत्रिणीच्या सहवासात आशुतोष हळूहळू या आभासी जगात रमत गेला.

      वर्ष वाया न जाता पदवीधर तर झाला. मार्क्स ही बरे मिळाले, पण आशुतोष व्यसनांच्या आहारी गेला होता. हे जे चालले आहे ते काही योग्य नाही हे कळत होते. यातून बाहेर पडावेच लागेल हे त्याला कळत होते, पण पहिलाच पेला उचलताना संयम ठेवला तरच यातून सुटका आहे अन्यथा हा शेवटचाच असे म्हणत कधीच तो शेवटचा प्याला ठरत नाही. शिवाय ठायी ठायी तळीराम असतील तर नाहीच नाही. आशुतोषचे हे बेधुंद वागणे मामाला त्रासदायक होत होते. पदवीधर होईपर्यंत शिक्षणाचा खर्च मामा करत होताच, पण कुठेतरी हे थांबेल अन हा काही नोकरी करेल असे मामाला वाटत होते.

      मामाने आशुतोष ला बरेच वेळा समजवण्याचा प्रयत्न केला. "आशु, तुला पुढे शिकायचे असेल तर मी खर्च लावायला तयार आहे. तू मोठा व्हावंसं एवढंच मला तुला सांगायचे आहे.  दिवसेंदिवस तुझे वागणे मला असह्य होतं आहे. बाळा, असे किती दिवस चालेल! नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. स्वतःच्या पायावर उभे रहावेच लागेल. आपल्यासारख्या सामान्य लोकांना अशी व्यसनं परवडत नाहीत. का जीवाला धोक्यात घालतो आहेस! हुशार आहेस तू , जगण्याचा उत्तम मार्ग निवड आणि आयुष्याचे सोने करून घे."  

     आशुतोषला सगळे कळत होते पण वळत नव्हते. नैराश्य त्याच्या मनात ठाण मांडून बसलं होतं. कुठेच मार्ग दिसत नव्हता. अवहेलना, अपमान ठायी ठायी होतच होता. घरातले, बाहेरचे टोचून जिव्हारी लागेल असे बोलत होते. व्यसनापासून मुक्तता मिळत नव्हती. त्यासाठी लागणारा पैसा पुरत नव्हता. मामा मामी नी पैसे देणे बंद केले होते. 

     सद्सद्विवेक बुद्धी हरवलेला आशुतोष पहाटेच सकाळी पाच वाजता घराबाहेर पडला. अन गंगेच्या दिशेने पळत सुटला. बेभान झाला होता, काहीच सुचत नव्हते. आता गंगाकाठच मला आधार देईल,  तिच्या कुशीत घेईल हा विश्वास त्याला वाटायला लागला.कमरेपर्यंत पाण्यात उतरला होता आणि आता जान्हवीच्या पाण्यात स्वतःला झोकून देणार एवढ्यात त्याला एका नाजूक पण आत्मविश्वास, आत्मबळ असलेल्या हातांनी मागे खेचले. आशुतोष बेशुद्ध झाला होता. त्याला काठावर इतर जणांच्या सहाय्याने आणले. त्याला सावध करण्याचा प्रयत्न चालू होता. थोड्या वेळातच तो शुद्धीवर आला. पण काही बोलू शकत नव्हता. डोळ्यातुन अखंड पाणी वाहत होते. त्याला तसेच तिने बसू दिले.  हळूहळू तो शांत झाला. आजूबाजूची गर्दी पांगली तशी ती सरळ काठावरच्या देवळाकडे चालू लागली. तिच्या मागे आशुतोष खेचल्यासारखा चालत गेला. 

      सगळे दरवाजे जेव्हा बंद होतात तेव्हा ईश्वर कवाड उघडतोच. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार आणि संचिताप्रमाणे त्याचे भाग्यात असलेले त्याला देण्यासाठी तो द्वार उघडतो. फक्त कोणत्या रुपात येईल हे सांगता येत नाही. आशुतोष साठी जान्हवी अशीच ईश्वर रूप घेऊन आली जणू असे वाटले त्याला. जान्हवी सेवानिवृत्त झालेली एक शिक्षिका. सकाळी फिरायला म्हणून रोज गंगेवर जाते. पहाटेचे प्रसन्न गंगेचे रूप पाहण्याची,अनुभवण्याची तिची सवय. पहाटेच्या चैतन्यमय वातावरणाशी, गंगेच्या संथ प्रवाहाशी संवाद करणे जान्हवीला फार आवडत होतं. आजही रोजच्याप्रमाणे जान्हवीचे सकाळी गंगेच्या प्रवाहसोबत हितगुज चालू होते. अन आशुतोष आला पुढ्यात प्रवाह पतित होत होता. 

      आशुतोषकडे एकटक पहात होती जान्हवी. त्याचे मन वाचण्याचा प्रयत्न करीत होती. त्याच्यातल्या हरवलेला विश्वास शोधत होती. आशुतोष काहीही न बोलता  बसला होता. यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होण्यापूर्वी आपण इथून निघून जावे असे त्याला वाटले. तो निघाला.

      "थांब" जान्हवीच्या आवाजातील जरब पाहून आशुतोष एकही पाऊल पुढे टाकू शकला नाही. त्याच्यासमोर उभी राहून जान्हवी त्याला निरखत म्हणाली," काय झालं आहे? का एवढा जीवावर उदार झालास?  

      "मला जगायचं नाही, काही अर्थच नाही आहे आता जगण्यात. सगळीकडे आयुष्यात मी हरलो आहे" 

      "हरला आहेस म्हणजे. आयुष्य ही तुला स्पर्धा वाटते! तू मागितलं म्हणून नाही मिळालं हे आयुष्य. मग ते तुझ्या मना प्रमाणे कसं संपवू शकशील?" 

      आशुतोष काहीच बोलला नाही. का विचारते आहे ही बाई मला असे प्रश्न? काय अधिकार ह्यांना. कोण आहेत ह्या? मला ओळखत असतील का? मी तर ओळखत नाही ह्यांना. 

      "बोल काहीतरी बाळा." आजी गेल्यापासून कोणीच त्याला बाळा हाक मारली नव्हती. 

      "काय करायचं मग? असंच रडत भेकत जगायचे, लोकांची टोमणी ऐकत." 

     जान्हवीला कळाले की आत चांगलीच ठेच लागली आहे. हळूहळू आंजारून गोंजारून जान्हवीने त्याला बोलतं केलं. हाडाची शिक्षिका होती जान्हवी. बरेच विद्यार्थी तिच्या हाताखालून गेले होते.  आशुतोष पण जर मोकळा झाला, तिच्याशी बोलता बोलता. 

     " तू हुशार आहेस, चांगलं काहीतरी करू शकतोस. तुझी इच्छा असेल तर मी मदत करीन तुला. मान्य आहे का?"   आशुतोषला ही जान्हवीशी बोलायला  आवडत असे. तिच्याशी रोज संवाद होऊ लागला. गंगेशी संवाद साधायला जान्हवी ने शिकविले आशुतोषला. त्याच्यातला आत्मविश्वास जागवीत जान्हवीने आशुतोषला  यूपीएससीच्या मार्फत सीएसई परीक्षा द्यायला लावली, आशुतोष मुळातच हुशार विद्यार्थी होता. जान्हवीच्या सांगण्याप्रमाणे आशुतोष एकेक यशाची पायरी चढत गेला. आशुतोष चे यश पाहून मामाला पण खूप आनंद होत होता. आशूच्या आयुष्यातील काळे कभिन्न दिवस सरलेत याचे श्रेय जान्हवीचे होते याची जाणीव मामाला होतीच. योग्य मार्गावर हात धरून चालणारा भेटला की यशोशिखर गाठणे सहज शक्य होतं हे आशुतोष ने सिद्ध करून दाखवले. आशु IAS ची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचा त्याच्यावरच विश्वास बसत नव्हता आपण एवढा मोठा पल्ला गाठला. 

     त्याचा ठिकठिकाणी सत्कार होऊ लागला. प्रत्येक सत्काराच्या वेळी आशुतोष  जान्हवीची माऊली म्हणून ओळख सांगत होता. सगळे श्रेय जान्हवीला देऊन तिचाच सत्कार करत होता.

     आताही गंगेशी हितगुज करतांना तो मनोमन गंगेचा आणि जणू तिचेच रूप असलेल्या जान्हवीचा, त्याच्या माऊलीचा मानस सत्कार करत होता...


रसिका राजीव हिंगे

     

     

      


भाषेचे सौंदर्य बोलीभाषेच्या वापराने वाढते किंवा कमी होते?

 भाषेचे सौंदर्य बोलीभाषेच्या वापराने  वाढते किंवा कमी होते?


व्यंजन आणि स्वरांचे

मिलन झाले  भूवरी

शब्द अवतरले अन

प्रगटली भाषा सुंदरी


     जेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळी संपूर्ण प्राणिजात जन्माला घालतांना निर्मात्याने मनुष्य प्राण्यास बुद्धी आणि  मन नावाची एक चीज दान केली आहे, या मनातील भावभावनांचे सादरीकरण करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी भाषा प्रदान केली. 

     अक्षर केव्हा आणि कसे प्रगट झाले हे नक्की जरी सांगता येत नसले तरी अति प्राचीन  काळापासून  अक्षर अस्तित्वात आहेत,  हे निर्विवाद सत्य आहे.

     प्राचीन काळी मानव हा एकटाच जंगलामध्ये रहात होता. हळूहळू पुढे गट, समूह,  तयार करून रहायला लागला. आपसात देवाण घेवाण होऊ लागली, सहवासात राहिल्यामुळे त्याच्या भावना विकसित झाल्या. त्याच्या मनातील भावभावनांचे तरंग अक्षरांमध्ये उमटू लागले, हे  व्यक्त करण्यासाठी ईश्वराने प्रदान केलेल्या बोलण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. मुखावाटे आवाज येऊ लागला म्हणजेच अक्षरांचा बोध झाला, शब्द, वाक्य विकसित होऊ लागले. अक्षर, शब्द हे बुद्धीच्या कसोटीवर घासून, स्वतःच्या बुद्धीचे सामर्थ्यानुसार भाषेमुळे प्रेम, राग, द्वेष, मत्सर या सारख्या भावना व्यक्त होत गेल्या आणि भाषा समृद्ध होत गेली. 

     वास्तविक पाहता प्रत्येक बारा कोसांवर भाषा बदलते. भाषेचं स्वरूप बदलत जातं. तरीही तिचं सौंदर्य मात्र बदलत नाही. शब्द कसेही असले तरी त्या त्या भागातील ते प्रमाण असतात.  प्रांताची ओळख होते बोली भाषेमुळे. सांस्कृतिक वारसा, परंपरा, जगण्याची पद्धत, शब्द उच्चारण, यावरून त्या त्या ठिकाणी भाषा बोलली जाते. प्रत्येक बोलीभाषेत गोडवा कायम आहेच. 

     साधारण सगळ्याच बोलीभाषेची जननी संस्कृत भाषा आहे. असे असले तरी कालांतराने त्यात बदल होत गेले. उच्चारण पद्धती बदलली. जसे शब्द बोलता येत होते तसेच शब्द बोलल्या जाऊ लागले. आणि तीच त्या त्या प्रांताची बोलीभाषा झाली. परंपरेने चालत आलेल्या शब्दांचा, अक्षरांचा उपयोग पिढ्यांपिढ्या जसाच्या तसा होत गेला, वारसा तसाच पुढे जातो. बोललेले ऐकणाऱ्याला कळले की झालं, भाव व्यक्त होणे गरजेचे, भाषा शुद्ध की अशुद्ध याला महत्त्व नाही. बोलीभाषा टिकून राहिली तर संस्कृती टिकेल.

     ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेतील गीता सामान्य लोकांपर्यंत पोहचावी म्हणून मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली. ती लिहिता लिहिता समोर बसलेल्या सामान्य जनसमुदायला समजावत लिहीत गेले.  समोर बसलेला सामान्य इतका सामान्य होता की त्यांना ज्ञानोबा, ज्ञानेश्वर या शब्दांचे उच्चारण पण येत नव्हते, ग्यानबा म्हाराज असे उच्चारत त्यांनी महाराजांबद्दलचा आदरभाव, भक्ती व्यक्त केली, ग्यानबा तुकाराम च्या गजरातच  सगळ्यांच्या मनातला भक्तिभाव जागृत झाला. विशेष म्हणजे पुढे ग्यानबाच प्रचलित झाले. इथे शुद्धतेचे परिमाण मोजण्यापेक्षा शुद्ध भक्तिभाव, आदर आणि तसेच आचरणही महत्वाचे ठरले. भाषा शुद्धतेचा अडसर नाही आला इथे. म्हणजे काय तर बोलीभाषा कोणतीही असो भाव महत्वाचा. "माय, मले भाकर दे!" किंवा "आई, मला जेवायला वाढ!"  ह्या दोन्ही वाक्याचा अर्थ एकच आहे. इथे भाषा कोणती हे महत्वाचे नाहीच फक्त अर्थ अभिप्रेत आहे. त्यामुळे त्या भाषेचे सौंदर्य कमी होत नाही तर वाढतेच आहे.  कारण प्रत्येकालाच प्रमाण भाषा किंवा शुद्ध भाषा बोलता यावी हे गरजेचे नाही. बोलीभाषा ही त्या त्या प्रांताचे सांस्कृतिक आणि पौराणिक महत्त्व जपते.

     सर्वसाधारण बोलीभाषा आणि प्रमाण भाषा  दोन्ही जरी वापरात असल्या तरी ही प्रमाण भाषा महत्वाचीच आहे. शुध्दव्याकरण, शुद्ध उच्चारण व्यक्तिमत्व विकासाचे निकष ठरू शकेलं. यासाठी भाषा  बोलता येते म्हणजे त्या भाषेचे व्याकरण ही कळतेच असे नाही. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे गरजेचे आहे. " व्यक्रियनो शब्द अनेन इति व्याकरणम्!" म्हणजे ज्याच्यामुळे अशुद्ध शब्द,अपशब्द वेगळे काढले जातात किंवा शुद्ध शब्दांचे ज्ञान होते ते व्याकरण. भाषेच्या  प्रत्येक कंगोऱ्याचे विवेचन केले जाते.  अशी तावून सुलाखून निघालेली भाषा म्हणजे प्रमाण भाषा, शुद्ध भाषा. शहरी भाषा ही प्रमाण भाषा.  बोलीभाषेत बोलणं असलं तरी लेखन हे प्रमाण भाषेतच लिहिल्या जातं. प्रतिभाशाली साहित्य लिहायाचे म्हणजे शास्त्रशुद्ध प्रमाण भाषेतच लिहिले तर वाचकांच्या पचनी पडतं म्हणजे वाचकांना आवडतं. किंबहुना साहित्य हे प्रमाण, शास्त्रशुद्ध भाषेतच असावे म्हणजे येणाऱ्या पिढीवर चांगल्या भाषेचे संस्कार होतील आणि भाषेचे सौंदर्य कसे आहे, तिला कोणकोणत्या अलंकारांनी सजवता येईल याचे ज्ञान कदाचित मिळेल. दीर्घ, र्हस्व जर चुकले तर अर्थ बदलतो. न आणि ण चे उच्चारण योग्य पद्धतीने व्हायलाच हवे. तरच भाषेचे सौंदर्य अबाधित राहील. वारंवार चांगलेच वाचायला मिळाले, ऐकायला मिळाले तर तरुणाईला पण भाषेचे सौंदर्य कळेल आणि भाषा अधिक सौंदर्यवती होईल, समृद्ध होईल.

     शास्त्रशुद्ध भाषा निर्मितीसाठी, भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी व्याकरणकार म्हणजे वाक्यकार वररूची, भाष्यकार पतंजली आणि सुत्रकार पाणिनी यांनी जे परिश्रम घेतले आहे ते वंदनीय आहेत. शास्त्रशुद्ध भाषेचे उच्चारण म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासातील एक मैलाचा दगड म्हणता येईल. सुशिक्षित असलेला जर बोलीभाषेत बोलत असेल तर  एक प्रकारे अशिक्षित पणाचे द्योतक आहे असे वाटते. ज्याला आपण इंग्रजीत standard maintain करणे म्हणतो ते शुद्ध भाषेमुळे होतं. 

     शेवटी काय तर ज्याला जे भावेल, रुचेल तेच  तो बोलेल.  बोलीभाषेमुळे भाषेचे सौंदर्य कमी होईल की वाढेल हे प्रत्येकाला आलेल्या अनुभवांती ठरेलच. नाही का!.......


©®रसिका राजीव हिंगे


     

     

     

     

     

     

     

     

पाल्य आणि पालक संबंध मैत्रीपूर्ण असावेत की शिस्तबद्ध?

   पाल्य आणि पालक संबंध मैत्रीपूर्ण असावेत की  शिस्तबद्ध?


   "मॅडम, कळलं का तुम्हाला! बारावीतील ऋत्विक ने काल आत्महत्या केली."

     कॉलेजमधल्या मॅडम ने ही बातमी सांगितली अन् सरसरून काटा आला अंगावर, ऐकून क्षणभर थिजल्यासारखे झाले. काही सुचत नव्हतं.  "का? असं, कोणतं आभाळ कोसळलं त्याच्यावर?  कारण काय आत्महत्या करण्याचे?" इतकं जीवावर उदार होऊन कसं काय ते संपवू शकतात?" खोलवर विचार करत याचं मूळ शोधत गेले तर मन विषण्ण होतं. परस्पर नात्यातील संवाद हरवत चालला आहे. आईवडील आणि मुलांमध्ये नाते फक्त नाते राहिले आहे. वात्सल्य,प्रेम, जिव्हाळा असला तरी व्यावहारिक स्तरावर आहे असे वाटायला लागले. याला कारणं बरीच असली तरी व्यवहार हा प्रेमाची, वात्सल्याची जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत आहे हे नक्की. 

     का इतकी कमकुवत आहेत ही मुलं! काय वाटत असेल मनात आत्महत्या करतांना? इतका टोकाचा निर्णय घ्यावासा कसा वाटला? सगळ्या इच्छा आकांक्षा संपल्या? भीती,भय काहीच कसं वाटत नाही? प्रश्नांची मालिका संपतच नाही. नाती बदलली, पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा, फक्त मी आणि माझे एवढाच विचार करण्याची संकुचित वृत्ती. स्वतःच्या करिअरसाठी मुलांकडे होणारे दुर्लक्ष. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझा मुलगा किंवा मुलगी सगळ्यांचं क्षेत्रात अग्रेसर असावेत हा आईवडिलांचा अट्टहास. याचा मुलांवर काय परिणाम होईल याचा कधी विचार केला जात नाही. त्याला काय शिकायचे आहे, तुला काही समजत नाही असे म्हणून त्याच्या आवडीनिवडींना काही महत्वच द्यायचे नाही, याचा परिणाम मुलांना नैराश्य येतं. वास्तविक पाहता घर हे सगळ्यांचे असते, कोणताही घरासंबंधी निर्णय घेतांना सगळ्यांचा समावेश असावा असे गृहितक आहे. मुले जरी असली तरी त्यांचेही मत विचारात घेणे गरजेचे आहे.  पाल्यांच्या मनात यामुळे घरासंबंधी आस्था निर्माण होते, आईवडिलांविषयी आदर आणि प्रेम निर्माण होत.

     काळ बदलत चाललाय. जगण्याची शैली बदलते आहे, काळानुसार बदल अपेक्षित असले तरी काही अढळ अशा गोष्टी असतात किंवा असाव्यात. काळानुरूप समाजव्यवस्था आणि त्याबरोबर चालणे हे जरी खरे असले तरी संस्कृती बदलणे अपेक्षित नाही. जेव्हा संस्कृती बदलते तेव्हा नको त्या गोष्टी घडत जातात, असं खरचं असेल असे वाटते अशा काही घटना पाहिल्या, वाचल्या की. कारण संस्कृती, संस्कार, परंपरा जपण्याची जबाबदारी पालक या सदरातच येते

      मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की लगेच तळपायाची आग मस्तकात कशी जाते? मुलांवर संस्कार करणाऱ्या माताच कमकुवत झाल्या की मागच्या पिढीचे संस्कार पुढच्या पिढीत संक्रमित होताना ते घेण्याची ताकद या पिढीत नाही. आईबाप होणं सोपं आहे पण जबाबदार पालक होणं अवघड आहे. फक्त जन्माला घातले म्हणजे आईबाबा झाले असे होत नाही. फक्त कडक शिस्त असली की मुलं ही शिस्तीत वाढतात, आदर्श होतात असे नाही. कधी आंजरून गोंजरून तर कधी प्रेमळ शब्दात समजावून, प्रसंगी एखादेवेळी रागावून सुद्धा मुलांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तर आईबाबा बद्दल त्यांच्याही मनात आदर, प्रेम कायम राहील. प्रत्येकवेळी शिस्तीचा बडगा दाखवून मुलं कोडगी होतात, त्यांच्यावर कशाचाच परिणाम होत नाही,उलट ते जास्त बिथरतात. मुलांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मेहनत घेणे गरजेचे आहे, निदान त्याला त्याचे भले काय आहे हे कळेपर्यंत तरी. नाहीतर असे म्हणावेसे वाटेल 

      हाती नाही दोर

      दारी नाही आड

      त्याने फुलझाड लावू नये

      सोसता सोसेना संसाराचा भार

      त्याने आईबाप होऊ नये

     घराघरांतून होणारे संस्कार, मोठ्यांचे अनुकरण आणि कुल परंपरा याचा परस्परांतील नात्यावर परिणाम होत असतो. संस्कार ही एक प्रक्रिया आहे. ती हळूहळू पण नकळत घडत जाते. विभक्त कुटुंब पद्धती, नोकरीची गरज म्हणून एका घराचे दोन तीन घर झाले, लहान कुटुंब काळाची गरज त्यामुळे एका घरात जास्तीतजास्त दोनच मुले आहेत. एकेक नाते संपुष्टात येऊ लागले आहे. संसाराचा गाडा सुरळीत चालावा, महागाईशी दोन हात करता यावे म्हणून  स्त्री ने घराचा उंबरठा ओलांडला. अन् ज्या वयात आईवडिलांची विशेष गरज असते त्याच वयात मुलांची ससेहोलपट होऊ लागली. आपला पाल्य काय करतो आहे, त्याचे मित्र कोण, कोणत्या सोशल मीडियावर तो जास्त ॲक्टिव आहे, हे पाहणे गरजेचे असतांनाच आईबाबा वेळ देऊ शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. माती ओली आहे तोपर्यंत हवा तो आकार देता येतो. अन्यथा जे आहे ते स्वीकारून कर्माची फळं भोगणे भाग आहे. नात्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विश्वास आणि संवाद हवा.  आदरयुक्त मैत्री हवी, यामुळे नाते घट्ट आणि सुदृढ होत जातं. आईवडीलांचे आणि मुलांचे नाते हे मैत्रीपूर्ण असावे. असं म्हणतात एका विशिष्ट वयानंतर मुलांचे मित्र व्हावे.  आपला पाल्य काय सांगतो आहे, याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. अपेक्षा न ठेवता संवाद साधत त्यांच्या विचारांचा चिडचिड न करता शांतपणे विचार केला तर अपेक्षाभंग होत नाही. मुलांच्या मनात पालकांविषयी आदरयुक्त भाव, प्रेम निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे. स्वतच्या जबाबदारीचे ओझे मुलांवर लादले तर त्याचे अपेक्षित परिणाम मिळतीलच असे नाही.

     आजच्या या स्मार्ट युगात आणि कोविड मुळे अगदी बाल शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोबाईल शिवाय पर्याय नव्हता. या काळात पालकांची दुहेरी जबाबदारी होती.  स्वतःचे काम आणि मुलांचा अभ्यास, शिवाय मुले मोबाईल मध्ये काय पहातात आहे याचाही विचार करावा लागत होता. आता शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. पण मुले अजूनही मोबाईल नावाच्या राक्षसाचा तावडीत आहेत. उगाचच पाल्याचा अपमान करत त्याला यापासून सोडवणे धोकादायक ठरू शकते. यावेळी संयम ठेवून, गोड बोलून त्यांना मोबाईलच्या विळख्यातून  बाहेर काढणे गरजेचे आहे. त्याचे फायदे तोटे समजतील अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधला तर अपेक्षित यश मिळेल.

     अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून, प्रसंगातून पालकांनी आपलं प्रेम दिसू दिले तर पाल्य ही आपोआप जोडल्या जातात. पालकांनी पाल्यारुपी झाडाला प्रेमाचे खतपाणी घातले तर ह्याचे वृक्षात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. फक्त अति खतपाणी नको की जेणेकरून रूप कुजून जाईल. मुलांचे मालक नव्हे पालक व्हावे.....


रसिका राजीव हिंगे