Tuesday, 2 August 2022

तूच एक तारक...

 



तूच एक तारक....


     आपल्या आयुष्यात कितीतरी असंख्य क्षण असतात. प्रत्येक क्षण लक्षात ठेवणे शक्य नसले तरी एखादा क्षण अविस्मरणीय ठरतो. हातात पकडून ठेवलेला असतो तो क्षण. कधीही निसटू शकत नाही असा अविस्मरणीय.

     देव आहे की नाही, असेल तर कसा असेल? विश्वास ठेवावा की नाही? कोणत्या देवाची आराधना करावी?  प्रत्येकाच्या मनात अशा कितीतरी प्रश्नांची आवर्तन सतत सुरू असतात. माझ्याही मनात असेच नेहमी प्रश्न सतत गिरक्या घेतात भोवती. पण आयुष्यात काही घटना अशा घडतात की आजन्म विसरू म्हटले तरी शक्य होत नाही. खूप काही शिकवून जातात किंवा अनुभूती तरी देतात. 

      निर्गुण निराकार कोणत्या सगुण साकार रुपात सावरेल हे कळत नाही हेच खरे. निदान मला तरी असंच वाटतं. कारण काही गोष्टी या मानवाच्या पल्याड असतात, तिथे साधनेशिवाय माणसाला पोहचणे शक्य नाही. मला पण असेच वाटले एका प्रसंगामुळे. तो प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही, इतका की आधी दुःखद वाटणारा पण त्यानंतर मात्र सुखावणारा असा क्षण.

     घर संसार म्हटले की सणवार, सोहळे, नातीगोती, याची जंत्री चालूच रहाते. सर्व सामान्य माणूस यात रमत जातो. मी ही छोट्या छोट्या प्रसंगात सुख शोधत गेले. चारचौघांसारखे आयुष्य म्हणजे संसार मुलंबाळं, त्यांचे शिक्षण, लग्न, लग्नानंतर येणारे सणवार केले की झाली इतिकर्तव्यता.  माझ्या मुलीचे लग्न झाले आणि त्यानंतर  येणारा पहिला सण मंगळागौरी. यासाठी तिला माहेरी बोलावले. तिच्या सासरचे सगळे आवर्जून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमासाठी सजावट करणे जणू आजकाल अपरिहार्य झाले आहे की काय न कळे. मूळ उद्देश साध्य करत असतानाच वेगवेगळी सजावट करणे हे विशेष आकर्षण ठरतं. पूजेची तयारी, आलेल्या पाहुण्याचे खाणे पिणे, त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे ह्यामध्येच माझा वेळ जात होता. सगळे आलेले पाहुणे  20 ते 25  जण घरात होतो.  

     इकडे आलेलो आहेच तर  शेगांवला जाऊन महाराजांचे दर्शन घ्यायचे ठरलेलेच होतं. सकाळी उठल्याबरोबर आज शेगावला जायचे असे ठरले. "आज नको आपण नंतर जाऊ, घाईघाई करण्यापेक्षा कार्यक्रम झाल्यानंतर जाऊ असे माझे म्हणणे होते. शिवाय नणंदेच्या विहिणबाईंकडे जेवायला जायचे होते. सकाळपासून लवकर आटपा प्रत्येकजण एकमेकाना म्हणत होते पण गप्पांचा ओघ काही थांबत नव्हता. स्वयंपाकाच्या काकू म्हणाल्याच," असे सगळे इथे तिथे बसून गप्पा करत बसला तर काही खरं नाही तुमचं शेगांव! आज एकादशी आहे, गर्दी असेल खूप." 

     " अरे मस्त दिवस आहे आजचा, आता तू काहीच नाही वगैरे नको म्हणू , एकादशी आहे, छान योग आलाय दर्शनाचा. असे कर तू सव्वा किलोचा प्रसाद घेऊन चल महाराजांच्या नैवेद्यासाठी. मी तयार करते." वन्सनी फर्मान काढले. लगेच सव्वा किलोचा सांग्रसगीत वन्सना हवा तसाच नेहमीप्रमाणे उत्तम प्रसाद तयार झाला. विहिणबाईंकडे जेवायला गेलो सगळेच. घरी येईपर्यंत तीन वाजले होते. प्रसादाचा डबा घेऊन कुलपं घातली आणि आमचा लवाजमा जी. एम. म्हणजे गजानन महाराजांचे दरबारी जाण्यास निघाला. सव्वा चारला  दरबारी डेरेदाखल झाले. तिथे सगळ्यानी पेढे घेतले म्हणून मी ही घ्यायला गेले तर ," तू नको घेऊ पेढे, तू प्रसाद आणला आहेस ना. मलाही पटले आणि मंदिरात दर्शनासाठी निघालो. आधी नैवेद्य देऊन येऊ महाराजांना. सगळेच वर जिथे नैवेद्य स्वीकारल्या जातो तिथे प्रसाद घेऊन गेल्यावर तेथील पुजाऱ्यांनी प्रसादाचा शिरा पाहिल्याबरोबर लगेच म्हणाले, " माऊली, हा प्रसाद स्वीकारणार नाहीत महाराज आज. एकादशी आहे. आज कसा चालेल हा प्रसाद! हे ऐकल्याबरोबर माझे सगळे अवसान गळाले. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. का असे झाले? लक्षात कसे नाही आले माझ्या? सकाळपासून दोन तीनदा एकादशी आहे याचे उच्चारण झाले. तरी का असे! हेही माहीत आहे की एकादशीला मंदिराच्या आवारात सुद्धा उपवासाच्या पदार्थाशिवाय इतर पदार्थ चालत नाहीत. नको ते विचार मनात गोंधळ घालायला लागले. ही कोणत्या संकटाची नांदी तर नसेल ना! काय सुचवायचे आहे यातून? जड अंतःकरणाने तिथून निघाली. पापणकाठी अश्रूंच्या लाटा येऊन थडकत होत्या. 

     घरी पोहचल्यावर दार उघडले अन बैठकीत समोरच घरात लावलेली शोकेस खाली पडलेली दिसली. आधी वाटले चोरी झाली की काय घरात? पण हळूहळू लक्षात यायला लागले वर असलेली पुस्तकांची शोकेस खाली पडली. यामध्ये जवळपास 200 ते 250 पेक्षा जास्त पुस्तकं होती. शिवाय एका बाजूला काही शोभेच्या वस्तू होत्या. शोकेसच्या खालीच दिवाण आणि सोफा ठेवलेला. घरात पाहुणे इतके होते की  त्यावर कायम कुणी न कुणी बसलेलं असायचेच. जर का आम्ही घरी असतो तर काय झालं असतं या कल्पनेने माझे हातपाय थरथरायला लागले. सगळंच कल्पनेच्या पल्याड होतं. किती मोठं गंडांतर माझ्यावरचे टळले होते. काही विपरीत घडले असते तर आयुष्यभर मनाला टोचणी लागून राहिली असती. माझा मुलगा हळूच मला म्हणाला, "आई तुला तर असंच वाटत असेल आता, महाराजांनी वाचवलं आपल्याला." तो असं बोलल्याबरोबर लख्खकन वीज चमकावी तसे झाले, होय महाराज होते म्हणूनच आपण वाचलो. हा इतका मोठा धक्का होता. पण मुलाने असे म्हटल्यामुळे मी जणू भानावर आले. याच साठी केला होता अट्टहास तेथे दर्शनासाठी येण्याचा. 

     अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज.... च्या गजरातच त्यांचे मानस पूजन मांडले,  कृतार्थतेचे अश्रू त्यांच्या चरणांचे प्रक्षालन करत होते, विश्वासाचे गंधलेपन आणि भावफुलांची माला त्यांना अर्पण करून आर्ततेने आरती ओवाळली. त्यांच्या कृपामृताच्या वर्षावात मी तृप्त झाले होते.....

     

     एक परी रूप अनेक

     तूच तू रे भवतारक

     सांभाळी गुरुराया रे

     देवा भक्तप्रतिपालक


रसिका राजीव हिंगे


     

     

     


     

सध्याची परिस्थिती... चिंतन

 सध्याची परिस्थिती... चिंतन


     हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

     माणसाने माणसाशी माणसासम वागणे

       कोविड-19 चा प्रादुर्भाव ओसरल्यावर दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेचे प्रांगण विद्यार्थ्यांनी फुलून आले होते. या विद्यार्थीरुपी फुलांचा सुगंध मनाला मोहवीत होता.  प्रार्थनेसाठी ओळीत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव दिसत होते. शाळेची सुरुवात बँडच्या तालावर एक सुरात प्रार्थनेने झाली अन विद्यार्थी आपापल्या वर्गात जायला निघाले. वर्गात जातांना सहज दोघी मैत्रिणींचा संवाद कानावर पडला.

       "अगं स्वाती, मी विसरूनच गेले ग ही प्रार्थना! आज आठवतच नव्हती मला."

       "करायची काय पाठ करून? आपलं हे दहावीचे वर्ष आहे. पुढच्या वर्षी आपण कॉलेजला जाणार आहोत. तिथे काही नसते प्रार्थना वगैरे. झालं बाई, एकच वर्ष सगळे नियम पाळायचे."

       "हो, ते ही खरेच आहे."

       त्या दोघी तर निघून गेल्या त्यांच्या वर्गात. पण मला विचार करायला भाग पाडून गेल्या. दिवसाची सुरुवात करतांना प्रार्थना म्हणायची असते, ज्यामुळे दिवस आनंददायी होतो, मनाचे आत्मबळ वाढविण्यासाठी  प्रार्थना करायची आहे, असे असतानाही मागचा पुढचा विचार न करता एका क्षणात उत्तर आले. का असं वाटावं. खरंच याचसाठी का हा अट्टहास मुलांना शिकविण्याचा! जणू असाच नियम असावा असे वाटले क्षणभर मला. फक्त  परीक्षेसाठी अभ्यास करायचा अन मार्क मिळवून पास व्हायचे. चांगले करियर करायचे, मोठ्या पगाराची नोकरी करायची की झाली इतिकर्तव्यता. याचसाठी का ही धडपड.  म्हणूनच लिहावीशी वाटली असेल समीर सामंत यांना ही प्रार्थना. कुठे चाललो आपण. मी मी किती करायचे. आपण समाजात राहतो तर त्याचं देणं लागतो हे कळतंच नाही आपल्याला.  आजकाल साधारण हाच सगळ्यांचा समज असतो की माझा फायदा आहे का काही, तर मी करतो. अगदी तराजू लावलेला असतो. का असे संकुचित विचार येतात मनात. निसर्ग करतो का असा विचार, आपल्याला जगायला जे जे आवश्यक आहे ते सगळंच निसर्ग बहाल करतो. आपणही निसर्गाचाच एक भाग आहे, तरीही सतत फायदा तोटा तोलत राहायचे ही संस्कृती नाही आपली. असा विचार केला तर प्रत्येकाच्या मनावर कसे शुद्धतेचे चांदणे पसरेल?  संस्कार लोप पावत चालले की, त्याचा वारसा पुढे चालविण्यात आपली पिढी कमी पडते आहे याचा विचार करायला लावणारा हा दोघी मैत्रिणींचा संवाद. 

       शिक्षणासाठी पर्याय म्हणून एकतर कोविडने  ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल नावाचा राक्षस विद्यार्थ्यांना भेट दिला. त्यामुळे आधीच नको ते ज्ञान विद्यार्थ्यांना झाले आहे. ग्रेग हॉफमन याच्या आईने त्याच्या हातात स्मार्टफोन देतांना ज्या अटी घातल्या त्याच यांना घालायला हव्या होत्या, पालकांच्या मदतीने. आता मोबाईल वापरू नको, असे म्हणणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा ठरेल, कारण सगळी भिस्त त्याच्यावरच होती करोना काळात. भरीस भर उरल्या वेळात दूरदर्शन.

      दूरदर्शन म्हणजे मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. करमणुकीचे एक साधन म्हणून त्याने अवघे जीवन व्यापले आहे. घरातील आधारवड, त्यांच्यासाठी तर  दूरदर्शन एक पर्वणीच ठरली आहे. असे असले तरी घरातील स्त्री, सानथोर सगळेच मग ते कोणत्याही वयाचे असो अगदी समरस झालेले असतात संध्याकाळी या मालिकेतील व्यक्तींशी. 

      सहज संध्याकाळी एकदा मी दूरदर्शनवर मालिका पहात होते.  मी उगाचच एका चॅनेल वरून दुसऱ्या चॅनेल वर उडया मारत होते, पण कुठेही मला पहावेसे वाटले नाही. कोणतीही वाहिनी असो, मराठी किंवा हिंदी, असं छान मनाला भावेल असे काहीच पाहता येत नाही असे मला स्वतःला वाटायला लागले. माझी आवड वगैरे बदलली की काय! मला पटल्या नाहीत मालिका यापेक्षा का पटल्या नाहीत, का आवडत नाहीत ह्याचा विचार मी करू लागले. जगण्याची पद्धतच बदलली आहे. जगण्याचे जे मापदंड असतात त्यात बदल झाला आहे असे मला वाटले. अर्थात काळानुरूप बदल अपेक्षित आहेत, ते स्वीकारले आहेत, पण इतके बदल की जगण्याची शैली वेगळी वाटावी.  

              प्रत्येक मालिकेत स्वतःचीच पोळी कशी भाजल्या जाईल याचाच फक्त विचार आहे. मग त्यासाठी काहीही करायची तयारी. म्हणजे अगदी जीव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होतो आहे. खलनायक, नायक असावेत, याशिवाय कथानक बाळसे धरु शकणार नाही, पण त्यालाही कुठेतरी मर्यादा हवी. आदर्शाचा बळी देऊन  हिसकावून घेणे हे पाहिले की मन सुन्न होतं. जे आहे त्यात समाधान मानणारी आपली संस्कृती. यामध्ये जे चांगलं आहे ते न घेता वाईटच घेण्याची वृत्ती असते सर्वसाधारण. मानव हा अनुकरणप्रिय असला तरी वाईट गुण लवकर आत्मसात केले जातात. हेच कमी झाले की काय, सोबत नेटफ्लिक्स, प्राईम व्हीडिओ, अमेझॉन प्राईम, हॉट स्टार हे ही आहेतच. युट्युब ने तर अक्षरशः धिंगाणा घातला आहे. तुम्ही काहीही शोधा सापडेलच तिथे. 

             प्रसार माध्यमांच्या जाळ्यात ही तरुण पिढी गुरफटली जाते आहे. यातून वेळ कसा मिळेल, केव्हा वाचतील आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहास. होईल का ओळख आपल्या संस्कृतीची? "वाचाल तर वाचाल"  हेच खरे आहे, सत्य आहे हे सांगायला हवे आहे, हा संस्कार घरातच व्हायला हवा आहे.  शत्रूला सुद्धा माणुसकीने वागवणारा आपला देश. माणुसकीच्या पायावर उभी आहे आपल्या देशाची संस्कृती. पाश्चात्य आणि पौर्वात्यांचे अनुकरण करता करता आपण आपले नुकसान करून घेतो आहे, आपल्याच ज्ञानाच्या भरवशावर हे देश विकसित होत आहेत, आपण मात्र अजूनही विकसनशीलच आहोत, हे कळायला हवे तरुणाईला. 

             मी माझे माझे करतांना कधीतरी आपण सगळे असा विचार का येत नाही. स्वतः साठी फक्त असे असले तरी याचीही दिशा योग्य आहे का हे पाहायला हवे. नुसती पळापळ करण्यात काय अर्थ. तो धावतो आहे म्हणून मी धावतो. शर्यत असावी, पण समजून उमजून. सातत्य हवे. कासवाने सतत चालत राहून शर्यत जिंकली, धावत सुटला नाही. पुढच्यास ठेच लागली तरी मागचा शहाणा होत नाही. कारण त्यांच्या जवळ तेवढी विचार करण्याची शक्तीच उरली नाही असे वाटते. स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याचा कधीतरी प्रयत्न करावा असे वाटायला हवे.  प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा प्रयत्न केला तर पोहता येईल. फक्त उडी मारण्याचे आत्मबळ हवे. 

             जे विचार करतात ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण पोहून जातात.  सारासार विचार करण्याची सद्बुद्धी जागृत झाली तर बदल निश्चित होईल, कारण निसर्गाचं चक्र फिरतं आहे.....

          


रसिका राजीव हिंगे

             

ऋतू झरला पानापानातून...



आल्या आल्या आषाढ सरी

भिजली भिजली अवघी धरणी

गंध दरवळे ठायी ठायी

ऋतू झरलाय पानोपानी


     सावळेसे जांभुळले मेघ नभी दाटून आले, सौदामिनी कडकडायला लागली अन जलधारांचे नृत्य सुरू झाले सावळ्या धरेवरी.  तृषार्त धरणी तिचे सहस्र बाहू पसरवून जलधारा झेलीत होती. तृप्त होऊन ती हर्षभरे चिंबचिंब भिजत होती. तिच्या तृप्ततेचा सुगंध आसमंत व्यापून उरला होता. जणू गंधसोहळे साजरे करते आहे.  तिच्या अंगोपांगी बहरलेली हिरवाई स्वच्छ आणि सतेज दिसायला लागली. वरुण राजा बरसला होता. त्याची ती अगदी आतुरतेने वाट पहात होती.  झाडांच्या  पानापानातून चंदेरी थेंब पाठशिवणीचा खेळ खेळत जणू ही रत्नांची माला तयार करून वसुंधरेला अर्पण करत होते, भूमाता सगळं आनंदाने स्वीकारत होती. तिचीच लेकरं नदी, तळी, विहीरी, ओढे, तलाव आपापले कलश भरण्यात मग्न झालेले आहेत. कधी ओसंडून वाहतील काही कळेना. चराचरात, मनामनात ऋतू बहरायला लागला.

     आषाढ आला आहे याची ही नांदी आहे.  आषाढ सरीसवे वारकरी निघाले सावळ्याला भेटायला. काळ्याच्या भक्तांना त्रास होऊ नये म्हणून या आषाढ सरी हवेत गारवा आणतात अन भक्तिरसात न्हाऊन निघालेला वारकरी यांच्याशी समरस होऊन पंढरीची वाट चालत जातो. भक्तीचा ऋतू असा बहरतो ठायी ठायी, कणाकणात, वारकऱ्यांच्या नसानसात. 

     एकीकडे भक्तीच्या पानाफुलातून ऋतू झरत असतो तर कुठे प्रीतमंदिरी एखादी नवयौवना तिच्या श्रीहरीच्या आठवणीत व्याकुळ होऊन त्याची वाट पहात बसते. झरझरणाऱ्या पाऊस धारा, गंधाळलेले चराचर, पानामध्ये चाललेले थेंबांचे नर्तन पाहून तिलाही भिजावेसे वाटते.  नकळतपणे ही स्वप्न वेडी रंगून जाते. वाऱ्यावर स्वार होऊन, जलधारांच्या अश्वाचे लगाम खेचत तिचा साजण येतो. त्याच्या सहवासात, त्याच्या सानिध्यात ती भावविभोर साजणी स्वतःला झोकून देते. तिच्या रोमारोमातून वर्षा ऋतू झरत जातो. तिचं मन देहभान विसरून गायला लागतं

     कधी तू ...... कोसळत्या धारा थैमान वारा

    बिजलीची नक्षी अंबरात ...

    सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा

     चिंब पावसाची ओली रात ....

     कधी तू रिमझिम झरणारी बरसात


©®रसिका राजीव हिंगे

     

 rasraj#ऋतू#पानोपानी#

     

     

स्वातंत्र्य व्यक्तिमत्वाचे

     शॉपीजन कथा स्पर्धा

    

    स्वातंत्र्य व्यक्तिमत्वाचे


     घनदाट रानातून रमा झपाझप पावलं उचलत चालली होती. काळे सावळे मेघ आभाळात गोळा झाले होते. गार वारा सुटला होता. झाडांची सळसळ मनात भय निर्माण करत होती. पाऊस केव्हाही कोसळायला लागेल असे वाटत होते. भराभर चालू की पळत जाऊ रमाला कळत नव्हते. तिच्या विचारांच्या चक्रात ती चालत होती. तिला मधूनच असे वाटत होते की कुणीतरी तिचा पाठलाग करतं आहे. दोन तीन वेळा तिने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण दिसलं कोणीच नाही. जंगली जनावर वगैरे असेल का? या विचाराने तिचे सर्वांग थरथरले. भीतीमुळे भराभर पावलं पण टाकू शकत नव्हती. तरीही  जीव मुठीत घेऊन जमेल तसे ती पळत सुटली आणि तिने घर गाठले. घरात येताच आईच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. रमाचा घाबरलेला आणि घामाने डबडबलेला चेहरा पाहून लक्ष्मीच्या मनात धस्स झालं.

     " रमा, काय झालं? तू का इतकी घाबरलीस? कोणी काही बोलले का? का जातेस रानातून? तू आणि तुझे बाबा का ऐकत नाहीत हेच कळत नाही मला!"

     यावर रमा काहीच बोलली नाही. पण तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. कोण असेल पाठलाग करणारे की खरंच एखादा चित्ता!... ती पुन्हा शहारली भीतीने. बाबा पण असेच तर जातात रानातून, त्यांनाही असाच अनुभव येत असेल का? पण कधी बोलले नाहीत बाबा याबाबत! बाबा म्हणतात तसे असेल का काही? आपल्या कार्यामध्ये कोणी विघ्न आणण्याचा प्रयत्न तर करत नसेल न? काही झालं तरी आता घाबरायचे नाही. बाबा करतात तसंच करायचं. 

     रमाला शांत पाहून लक्ष्मीचा जीव कासावीस होत होता. तिला तिचे पूर्वीचे दिवस आठवत होते. असेच व्हायचे जेव्हा विष्णुपंत रानावनात हिंडायचे, डोंगराळ भागात शिकवायला जायचे तेव्हा  विष्णुपंत घाबरत नव्हते तरी त्रास होतच होता.

     विष्णूपंत हे एक हुशार आणि मेहनती व्यक्तिमत्त्व. लहानपणापासूनच हुशार असलेल्या विष्णुपंतांचे आईवडील शेतकरी. घरी भरपूर जमीनजुमला असलेले जमीनदार.घरात समृद्धी  आणि संस्कार हातात हात घालून होते. अशा सुसंस्कारित घरात विष्णुपंत लहानाचे मोठे झाले. सुशिक्षित आणि सुसंस्कृत विष्णुपंतांना तहसीलदार व्हायचे होते. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तेथील ग्रामातील सुधारणा करण्यासाठी, जमेल तसे खेडोपाडी जाऊन जनजागृती करायची होती. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा देऊन ह्या क्षेत्रात प्रवेश केला. आणि सुरू झाले विष्णूपंतांचे नोकरीच्या माध्यमातून समाजकार्य. प्रामाणिकपणे ते ज्या तालुक्यात बदलून जात तिथे काम करत होते. ऑफिसच्या व्यतिरिक्त इतर वेळेत गावागावात फिरून ग्रामस्थांना लिहिता वाचता येत नसेल तर त्यांना रात्रीच्या वेळी शिकवत असत. समोर आलेल्या अडचणी स्वतःच कशा प्रकारे सोडवाव्यात, स्वावलंबी व्हावे, याबाबत गावकऱ्यांशी गप्पांच्या ओघात बरंच काही सांगत होते. मनमिळाऊ स्वभाव आणि मदतीला तत्पर असलेले विष्णुपंत प्रत्येक गावात लोकप्रिय झाले. या लोकप्रियतेमुळे वधुपित्यांची जणू रांगच होती घरी त्यांच्या साठी. बी.ए. झालेली सालस लक्ष्मीची त्यांनी निवड केली आणि विष्णुपंत कुलकर्णी चा संसार सुरू झाला. 

     वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होत गेल्या अन त्यांच्यापाठी लक्ष्मी फिरत होती. कधीही कोणतीच तक्रार न करता ती विष्णुपंताचे नोकरी साधून सुरू असलेले समाजकार्य अनुभवत होती. विष्णुपंतांच्या कार्याला आणि संसाराला ही छान बहर आला होता. त्यांच्या संसारवेलीवर लक्ष्मीचेच प्रतिरूप घेऊन रमा अवतार घेती झाली. त्यामुळे लक्ष्मी घरात पूर्णपणे अडकली होती. तरीही अडल्या नडल्याला मदत करतच होती. पण घरावर तुळशीपत्र ठेऊन कार्य करणे तिला पटत नव्हते. कितीदा तरी ती विष्णुपंतांना याविषयी बोलत असे. पण विष्णुपंत कधी लक्ष देत नव्हते तिच्या बोलण्याकडे, किंबहूना तिला समजवयाचे की,

     " लक्ष्मी, ही अडाणी लोकं आहेत. यांना स्वतःच भलं कशात आहे ते पण कळत नाही ग! आपला देश स्वतंत्र जाऊन इतकी वर्षे झाली, तरीही ही माणसं गुलाम असल्यासारखीच जगतात. स्वातंत्र्याचा खरा अर्थ यांना कळलाच नाही."

     "अहो, पण घर आहे,संसार आहे तुमचा. तिकडे पण लक्ष नको का द्यायला? दुसऱ्याचे संसार सांभाळतांना स्वतःचा वाऱ्यावर का सोडायचा?"

     "तसं काही होणार नाही लक्ष्मी. त्यांच्यातली जाणीव जागी करायची आहे. ते पण आपल्यासारखंच जगले पाहिजेत, असं नाही का तुला वाटत?" 

     लक्ष्मीला हे सगळं कळत होतं, पण वळत नव्हतं. विष्णुपंत तहसीलदार असल्यामुळे कायमच तालुक्याला राहावे लागत असे. त्यामुळे आजूबाजूच्या गावाशी संपर्क येतच होता. गावातील परिस्थिती पाहिली की तिच्याही पापणकाठी अश्रू गोळा व्हायचे. सरकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत नाहीत म्हणण्यापेक्षा तळागाळातील लोकं त्या स्वीकारत नाहीत असे म्हणावे लागेल.  कारण तेवढं ज्ञान, समज त्यांना नाही. विशेष म्हणजे माहीत करून घ्यायचे पण नसतं. यासाठीच विष्णुपंत प्रयत्नरत होते. त्यांच्या कार्यात आडकाठी आणणारे बरेच असले तरी त्यांना मदत करणारेही होतेच. 

     रमा लहान होती तोपर्यंत कुठेही बदली झाली तरी काही विशेष जाणवले नाही. पण रमा मोठी होत होती. सतत खेडोपाडी फिरत असल्यामुळे लक्ष्मी समोर रमाच्या शिक्षणांचा प्रश्न आवासून उभा होता. तालुक्यातील शाळांमध्ये तिचे माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पण पुढील शिक्षणासाठी रमाला शहरात वसतिगृहात ठेवणे गरजेचे होते. रमा शिक्षणाच्या निमित्ताने शहरात वसतिगृहात राहू लागली. गावातली जगण्याची शैली आणि शहरातील जगणे यामध्ये बराच फरक रमाला जाणवला.  हा बदल स्वीकारत रमा शिक्षणातील एकेक शिखर सर करतच होती.  तिला तिच्या बाबांसारखेच कार्य करायचे होते. खूप हुशार नसली तरी प्रथम श्रेणीमध्ये रमा दरवर्षी उत्तीर्ण होत होती. बघता बघता पत्रकारिता हा विषय घेऊन तिचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. पण रमाला गावात राहणे जास्त आवडायचे.  लहानपणापासून खेडोपाडी राहिल्याने असेल कदाचित. 

     विष्णुपंतासोबत  आदिवासी पाड्यांमध्ये रमा फिरत होती. लहान असताना तिला त्यांच्याशी बोलायला, खेळायला आवडायचे. पण आता मोठी झाली आणि शिक्षणामुळे त्यांच्या अडचणी, त्यांचे अज्ञान, परंपरा आणि त्याविषयी असलेली अंधश्रद्धा पाहून यांच्यासाठी काहीतरी करावे असे वाटत असे. पण काय आणि कसे करावे याबाबत तिला मार्ग दिसत नव्हता. तिची धडपड सुरू होती, पण सहजासहजी कोणी हे मान्य करेल असे नव्हते. तिला सोबत हवी होती. तिचे बाबा असायचे पण नोकरी करून जास्त वेळ देऊ शकत नव्हते. या आदिवासी लोकांचे इतके पक्के विचार होते की ते बदलणे किंवा त्यांना काही सांगणे कठीण होते. पूर्ण पणे त्यांच्यामध्येच राहून बदलता आले तर शक्य होईल. आई परवानगी देत नव्हती जास्त वेळ बाहेर राहण्याची. कारण एकतर सगळा डोंगराळ भाग होता आणि गावात पोहोचायचे म्हणजे रानातून जावे लागत असे. घनदाट रान नव्हते तरी जंगली श्वापदे होतीच. दिवसा काही त्रास नव्हता पण थोडा जरी अंधार झाला तर भीती होतीच. 

     गावात त्यांचा म्होरक्या  भिकू याचा मुलगा जगन्नाथ तालुक्यातील शाळेत जायचा हट्ट करत होता. पण घरातील आजी आजोबा आणि आईवडील तसेच गावातील सगळेच वृद्ध नाही म्हणत. शिक्षणामुळे मुलं बिघडतात, घरापासून, आईबापापासून लांब राहतात. परंपरावादी असतात हे आदिवासी. शिवाय रोज रानातून जाणे येणे करावे लागेल. जगू अजून लहान आहे. जंगली प्राण्यांशी लढू नाही शकणार. अशा कितीतरी गोष्टी होत्या त्यामुळे तेथील लोक शिक्षण घेत नव्हते. पण जगूला रमा सारखे शिकायचे होते. ती जशी गोष्टी वाचून दाखवायची तसे त्याला वाचायचे होते. जगू सारखा रमाला म्हणायचा,"ताई,मला शाळेत जायचे आहे, नाहीतर तू शिकव."  रमाला कळत नव्हतं काय करावं.

     रमा तिच्या बाबांशी बोलली याबाबत. विष्णुपंत म्हणाले,  "मला माहीत आहे हे आदिवासी किती कट्टर आहेत ते. रमा, जीवाला धोका पण निर्माण होऊ शकतो. तरीही तू त्यांना तिथेच गावात शिकवायचे. घाबरू नको. मी तिथेच गावात असतो दिवसभर. मला बाहेर जावे लागले तर मात्र तू येऊच नको तिकडे. बघू काहीतरी मार्ग सापडेल. जगू दोन पावलं चालत आला आहे न, आपण चार पावलं चालत त्यांच्यापर्यंत जायचे."  बाबांच्या या शब्दांनी रमाला धीर आला.

     रमा रोजच्या प्रमाणेच गावात बाबांबरोबर जात होती. पण ज्यावेळी गावातले पुरुष शिकारीसाठी किंवा इंधन गोळा करण्यासाठी रानात जायचे त्यावेळी रमा जगूला शिकवू लागली. हळूहळू बाराखडी, छोटे छोटे शब्द जगूला सरावाने वाचता यायला लागले. जगुबरोबर गावातली पण चारपाच मुलं यायला लागली.  त्यांच्यात शिकण्याची गोडी निर्माण झाली. समजायला लागल्या काही गोष्टी. त्यामुळे जगुच्या वागण्याबोलण्यात फरक जाणवायला लागला. भिकूच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. पण तो शांत होता. वेड आहे, थोडे दिवस चालेल अन बंद होईल.

     रमा रोजच यायला लागली गावात. विष्णुपंत बाहेर असले तरी ती येतच होती. जेव्हा एखादा चांगल्या कार्यासाठी पाऊल उचलतो तेव्हा त्याचे पाय ओढणारे, त्याला मागे खेचणारेही असतातच. तसेच रमाच्या बाबतीत घडत होते. ज्यांना काहीच करायचे नसते अन दुसऱ्यालाही करू द्यायचे नसते असाच होता राणा. राणा म्हणजे गावातील भंटोल या सदरात मोडणारा होता. व्यसनांच्या आहारी गेलेला  राणा  रमाला अजिबात आवडत नव्हता. तरी तिने तिची शाळा घेणे सुरूच ठेवले. राणा काही न काही खुरापती काढतच होता. गावातील लोकांना रमा आणि विष्णुपंत यांच्या विरोधात भडकवीत होता. जगुच्या वडिलांना म्हणजे भिकूला हे कळत होतं. पण मुलाच्या प्रगतीकडे, त्याचे बदललेले व्यक्तिमत्व याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही हे अडाणी भिकूच्या लक्षात आले होते. राणाचा बंदोबस्त करावाच लागेल नाहीतर तो गावाच्या प्रगतीच्या आड येईल हे ओळखून होता भिकू. 

     तिचे बाबा बाहेर गावी असल्यामुळे आठ दहा दिवस झाले रमा एकटीच येत होती.  रानातून येतांना तिला रोज जाणवे, की  कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. पण दिसत कोणीच नव्हतं. असं किती दिवस चालणार आहे. याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. रोजच्याप्रमाणे रमा निघाली, तिने भिकू आणि त्याच्या सोबत दोघे यांना तिच्यापासून थोड्या दूर अंतरावर मागे यायला सांगितले. सवयीप्रमाणे ती रानातून भराभर चालायला लागली, पण तिला पुन्हा जाणवलं तिचा पाठलाग होतो आहे. ती थांबली, अन मोठ्या आवाजात म्हणाली," जो कोणी असेल त्याने पुढे यावे, उगाच भेकडासारखा लपून का राहतो? असेल हिंमत तर ये पुढे!" पण कोणीच समोर आले नाही. फक्त पाण्यातून चालण्याचा आवाज आला. पावसामुळे रानात पाणी साचलेले होते.  रमाने अंदाज घेतला, भिकू आहे पाठीमागे, ती पुन्हा भराभर चालायला लागली. थोडे पुढे जात नाहीतर झाडीतून राणा आला समोर, रमा किंचित घाबरली, जवळून राणाला कधी पहायचा प्रसंग आला नव्हता. "का पाठलाग करतोस रोज माझा? सरळ बोल तुला काय बोलायचे आहे ते." 

     " रमा, तू आमच्या गावात येऊ नको. तुला दगा फटका होण्याची भीती आहे. गावातील वृध्द म्हातारे यांना पटत नाही तू गावातील मुलांना शिकवतेस ते." राणा चे शुद्ध आणि नम्र बोलणे ऐकून रमा अवाक झाली. तिला कळेना हा कसा काय असा वेगळाच आहे. "राणा, मला आधी सांग तू स्वतः तर चांगला शिकलेला वाटतोय तुझ्या बोलण्यावरून. पण मग मला का सांगतो आहेस शिकवू नकोस म्हणून."

     "रमा, मला लहानपणापासूनच शिकण्याची आवड होती. मी माझ्या आबा सोबत तालुक्याला जायचो तेव्हा तेथील शाळा पाहिली की, मला पण शिकावेसे वाटे. पण आबा नाही म्हणायचे. कोप होईल आपल्यावर, गावात वाळीत टाकतील आपल्या घराला, जगणं कठीण होईल वगैरे भीती घालून मला चूप करायचे. एकदा खूप राग आला मला घरातल्या सगळ्यांचा. मी रागातच घर सोडले आणि भटकत राहिलो वाट मिळेल तिकडे. घरापासून खूप लांब जायचे होते मला. घरातून गेलो तेव्हा 8 वर्षाचा होतो मी. नशिबाने साथ दिली अन एका सद्गृहस्थाच्या मदतीने माझी शाळा सुरू झाली. पांडुरंगशास्त्री भेटले नसते तर मी  पदवीधर झालो नसतो, कदाचित एखाद्या गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या असतो आज." बोलता बोलता राणा शांत बसला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. रमा पण भारावून गेली होती राणाची कथा ऐकून. भिकू पण अवाक झाला. भिकूचेही पापणकाठ ओलावले. 

     "आरं पन राना, तू आम्हांसनी सांगतल न्हायी तू शिकेल आहे बुक म्हून!" भिकू कडे राणा फक्त पहात होता. कारण त्याच्याविषयी गावात कोणीच चांगलं बोलत नव्हतं. 

     "बोल की रं राना! सगळे वंगाळ धंदे करतुया. कामून करतं हे समदं?"

     "काय बोलू भिकू दादा सांग न. गावात राहिल्यावर यापरिस वेगळं काय होणार? तुझ्यासारखे नाही रे सगळे गावात! शिवाय आबांनी स्वतःची शपथ घातली मला, तू शिकून आलास हे गावात सांगशील तर बघ. मी खूप चिडलो, पण काही उपयोग झाला नाही."

    " रमाने गावात येऊन शाळा सुरू केली ते मला खूप आवडले. आपण ही तिला मदत करावी असे वाटत होते. पण गावातली चावडीवरची चर्चा ऐकली अन रोज रमाचा पाठलाग करत होतो. कारण कधीही तिला दगा फटका होण्याची शक्यता  आहे."

    " हे बघ राणा, असं काहीही होणार नाही. जे चांगलं काम करतात त्यांना नेहमीच मदतीचा, सहकार्याचा हात मिळतो. तू सुद्धा माझ्यासोबत सहभागी हो. भिकू आहे आपल्यासोबत आणि गावातली बरेच लोकं आता विरोध करत नाहीत. तू अजिबात घाबरू नको."

    रमा घरी आली आणि तिने तिच्या बाबांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. विष्णुपंतांना आश्चर्याचा धक्काच बसला ऐकून. किती ही अंधश्रद्धा, आणि अज्ञान! यावर काहीतरी मार्ग शोधावा लागेलच. दुसऱ्या दिवशी विष्णुपंतांनी गावातली पंचायत बोलावली. सगळ्यांसमोर  विष्णुपंतांनी राणा च्या शिक्षणाचा गौप्यस्फोट केला. ऐकल्याबरोबर सगळेच राणाला वाटेल ते बोलू लागले. पण विष्णुपंतांनी परिस्थिती पाहून रमा आणि राणा ला पंचायती समोर बोलायला सांगितले.  पण कोणीच ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. सगळा गोंधळ पाहून पंचायत उठून गेली.

     राणा आणि रमा रोज घरोघरी जाऊन त्यांना शिक्षणाचे फायदे, त्यामुळे आपल्यात कसा बदल होईल, गावातील बदल, सुधारणा होत जातील, आपली आर्थिक परिस्थिती बदलेल, शांतपणे सगळं नीट सांगत होते. राणाचे बोलणे ऐकून गावकऱ्यां मध्ये हळूहळू बदल जाणवायला लागला. शाळेत येणाऱ्या मुलांची आणि मुलींची पण संख्या वाढली. 

     विष्णुपंतांना स्वतःच्या मुलीचा खूप अभिमान वाटला. विष्णुपंतांच्या मदतीने राणा आणि रमा दोघांनी मिळून गावातील लोकांमध्ये विचारांची जागृती केली. त्यांची विचार करण्याची संकुचित प्रवृत्ती बदलली. त्यांच्यात विचार स्वातंत्र्य निर्माण केलं. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी डोंगराळ भागात, तळागाळातील लोकांमध्ये विचाराचे स्वातंत्र्य, जगण्याचे स्वातंत्र्य नाही, ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे. 

     गावात शाळा सुरू झाली. फक्त शिकार करणारी तरुण मुलं वेगवेगळी कामं करण्यास उद्युक्त झाली, रोजगार निर्माण करणारे छोटे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी सरकारी मदत मिळवून देणे यासाठी रमा, राणा आणि विष्णुपंत कार्यरत होते. गावाचा विकास व्हावा हा ध्यास जणू सगळ्यांनीच घेतला होता.

     अंधश्रद्धा आणि बुरसटलेल्या विचारांच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना परावृत्त करून त्यांच्यात जगण्याचे स्वातंत्र्य निर्माण झाल्याचे पाहून विष्णुपंत, लक्ष्मी, रमा आणि राणा सगळेच आनंदित होते. राणा स्वतः खूप समाधानी होता, कारण तो त्याच्या गावाचा विकास घडवून आणण्यात सहभागी झाला होता.


रसिका राजीव हिंगे