Thursday, 9 July 2020

सहज सुचलं म्हणून...ध्यास




"झालं का ग तुझं?"
"जाऊ दे ग मला काही जमत नाही ग बाई !"
"अग असं कसं जमत नाही?" नीट लक्ष दे म्हणजे कळेल कस करायचं ते. कोणतंही काम असो माझं उत्तर आईला नेहमी ठरलेलं असायचं. आणि तीही अगदी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या शब्दात मला सांगायची.
"येत नाही याचा अर्थ सरळ आहे तू लक्ष घालत नाही कामात. कोणतंही काम जर यावं असं वाटत असेल तर त्याचा ध्यास घ्यावा लागतो ग. तसं नाही जमत वरवर नुसतं." किती मोठं तत्वज्ञान सांगायची न आई. विश्वामित्रा सारखं मागे लागलं पाहिजे हे नेहमी ती म्हणायची. म्हणजे काय हे मला आजही कळलेलं नाही. असो.
ध्यास घेतल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. अगदी छोटं काम सुद्धा.
साधी परीक्षा जरी असली शाळेची तरी सुद्धा त्या परीक्षेचा ,अभ्यासाचा ध्यास लागत नाही तोपर्यंत यश आपल्याकडे पाहत पण नाही. होऊन जाईल असे म्हटले की निकाल बरोबर जागा दाखवून देतो. ज्यांनी तन मन धन झोकून दिलेलं असत ते यशोशिखरावर आरूढ झालेले असतात.
आयुष्यात जगतांना सुद्धा जगण्याचा म्हणजे केवळ साधं जगण्याचा नाही तर काहीतरी चांगले कर्म करून,कीर्ती मिळवून जगायचे असेल तर त्यासाठी क्रमबद्ध तयारी करावी लागते , ध्यास घ्यावा लागतो तरच शक्य आहे अन्यथा जन्मला आलो अन.....
आजच्या तरुण पिढीला एक वेगळीच झिंग आली आहे जगण्याची. भरपूर पैसा कमविण्याचा जणू ध्यास लागला आहे. पण हा ध्यास सुखाचा मार्ग नाही तर सतत चिंता, टेन्शन देणारा आहे. हे कळायला हवं आहे आता या पिढीला.
भवसागर पार करायला नामस्मरण, भक्ती हे छान साधन आहे. पण जितकं सोपं आणि छान आहे तितकंच साध्य व्हायला कठिण. गुरुचरणाचा ध्यास जोपर्यंत लागत नाही,उठता बसता,जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी फक्त नाम दिसत नाही, नामाचा ध्यास लागत नाही तोपर्यंत  साधना फलद्रुप होत नाही.
थोडक्यात काय तर काहीही साध्य करायचे असेल तर त्याची आस हवी म्हणचे ध्यास लागतो, जेव्हा ध्यास हा श्वास होतो तेव्हाच आणि तेव्हाच प्रत्येक साध्य खास होतं. आणि हे जे खास  साध्य आहे न त्याचा कधीच ऱ्हास होऊ शकत नाही  त्याचा आपणांस नेहमीच सहवास लाभतो असं मला वाटतं....

रसिका राजीव हिंगे


No comments:

Post a Comment