Friday, 26 May 2023

ओंजळ

 



कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती । 

करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥

     दोन हात एकमेकांना जोडले की होते ओंजळ. रामप्रहरी दोन हात एकमेकांना जोडून प्रात: प्रार्थना म्हणण्याची आपली संस्कृती. हृदयाची कवाडं सताड उघडी ठेवायला शिकवणारी ओंजळ. दारात आलेला वासुदेव याला पसाभर म्हणजेच ओंजळभर धान्य दिले जाते.  दारी आलेला याचक तृप्त झाला की ओंजळभर सुख आपल्या पदरात घालून जातो. हात जोडून प्रार्थना केली जाते आणि जोडलेले हात  पसरून सगुण सुंदर परमात्म्या जवळ मागणं मागितले जाते. मी पणाची ओंजळ इथे रिकामी होते. पुन्हा या ओंजळीत कोणतं दान तो आपल्याला देईल हे कळत नसेलही पण ओंजळ भरते हे नक्की. या ओंजळीत सारे ब्रह्मांड सामावले आहे.  दातृत्वाचे प्रतीक आहे ओंजळ. कायम भरलेली ओंजळ कधी आठवणींची असते, कृष्ण सख्याच्या चरणी अर्पण होणाऱ्या प्राजक्ताच्या गंधित फुलांनी भरलेली, तर कधी संसाराच्या सुखाच्या हिंदोळ्यावर झुलणारी आनंदाची, तर कधी भक्तीची असते ही ओंजळ. भक्तीची ओंजळ म्हटले की आठवते सुदाम देवांची ओंजळ, मूठभर पोह्यांचा बदल्यात परमात्म्याने त्याची भक्ती पाहून सुखाने भरून दिलेली ओंजळ. अठरा विश्व दारिद्य्र असलेला सुदामा. मात्र कृष्णाचा परम सखा. अवघ्या विश्वाचे राजेपण पेलणारा कृष्ण आपल्याला काय देईल म्हणण्यापेक्षा याचना करणे हेच सुदाम्याच्या तत्वात नव्हते. पण पत्नीच्या आग्रहाखातर मूठभर शेजारून मागून आणलेले पोहे घेऊन सुदामा द्वारका नगरीत येतो. पण हिंमत होत नाही की का मागायचे याला आपण? याच्याजवळ आहे म्हणून. कृष्ण तर मनकवडा आहे. ज्याला स्वतः चा अभिमान नाही तोच खरा कृष्णाचा महत्वाचा अतिथी. सुदाम्याने हात पसरले नाहीत तरी त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन  त्याची भक्तीची ओंजळ सुखाने भरून दिलीच. अहंकाराची ओंजळ रिती झाली की भक्तीने ती भरून येतेच येते.

     निसर्ग भरभरून देतो पण आपण आपल्या ओंजळीत मावेल इतकेच घ्यावे हा अलिखित नियम आहे. ज्याला कळला त्याची ओंजळ कायम सुखाने भरलेली असेल. आपण पाहतो आहे आजकाल हवे हवे आणि हवे एवढंच माहित आहे. मिळण्यासाठी द्यावे लागेल हेच कळत नाही म्हणून की काय आज ओंजळ भरतच नाही. वास्तविक पाहता कधीच रिकामी नसते ओंजळ. पण दुःखाने भरण्यापेक्षा आनंदाने भरावी न. रिती केल्याशिवाय कशी बरे भरेल पुन्हा ओंजळ. निसर्ग आपला गुरू आहे तर त्याचे सारखेच सतत रिते होणे शिकले पाहिजे म्हणजे पुन्हा भरता येईल. ओरबाडणे थांबले पाहिजे. कारण ओंजळीत मावेल इतकेच अन्न पुरेसे आहे सुदृढ जगण्याला. तहानलेल्या जीवाला ओंजळ भर पाणी प्यायल्याने तृप्ती लाभते. 

     जन्मापासून लाडाकोडात वाढवलेल्या लेकीचे दान जावयाच्या ओंजळीत पाणी सोडूनच करण्याची परंपरा आहे. लाजलेले सौंदर्य लपविण्यासाठी ओंजळच सरसावते. मानवाच्या प्रत्येक टप्प्यावर ओंजळ आहेच. परमेश्वर निर्मिती करतो ती निष्कारण करत नाही. आधी दिले तेच मिळते हा निसर्ग नियम आहे. म्हणून आधी ओंजळ रिकामी करा आणि मग आपोआप भरते की नाही ते पहा. आपण विज्ञान युगात जगणारे असलो तरी आपल्या संस्कृतीने च विज्ञान निर्माण केले आहे याचा प्रत्यय देणारी ओंजळ कायम सुखाने भरलेली असावी. समर्पण शिकवणारी ओंजळ अशीच असेल......


रसिका राजीव हिंगे 

 rasraj#ओंजळ#हिंगे#

     


No comments:

Post a Comment