Tuesday, 30 May 2023

हिमाचल प्रदेश (05.05.2023 ते 12.05.2023)



 
  05.05.2023
     आज तीन साडेतीन महिन्या नंतर घराबाहेर निघाले ते थेट हिमाचल प्रदेशाच्या सहलीसाठी. पुणे ते चंदीगड विमान प्रवासात आलेले अनुभव. पहाटे साडेचार ला  विमानाने टेक ऑफ केले त्यावेळी चांदण्यांचे काळेभोर नभांगण धरेवर उतरून खाली आले आहे, असे वाटावे इतका सुंदर दिव्यांचा झगमगाट दिसत होता.
     अक्षरशः पोकळी. खाली वर आकाश. कुठे  ढग दाटलेले तर कुठे निळसर आकाश. कापूस पिंजून ठेवला आहे असे वाटावे इतके पांढुरके ढग. तर कुठे असं वाटत होतं की सागराचे पाणी आहे त्यावर बर्फ जमा झाला आहे. आकाश आणि सागर एकच रुप आहे असे वाटायला लागले.
     ज्यांना ब्रह्म ज्ञान झालेले आहे, जे या मायेच्या पल्याड गेले आहे, माया काय आहे ज्यांना कळले. त्यांनी सगळीकडे ब्रह्म भरले आहे हे स्वतः च्या अनुभवाच्या कसोटीवर घासून ज्ञान प्राप्त केले आहे. ही किमया आहे की भास कळत नाही. कारण मी तर सामान्य अज्ञानी जीव आहे. पण हे सगळं पाहिलं की कळतं एक शक्ती आहे जी हे विश्व निर्माती आहे. अन् तेच कळायला साधनेच्या किती पायऱ्या खाली आहे म्हणण्यापेक्षा पहिल्या पायरी पर्यंत सुद्धा अजून पोहचले नाही. निसर्गाचा चमत्कार म्हणू की संतांनी सांगितलेले हेच ते ब्रह्म सगळं व्यापून उरलेले हे खरे मानू. ब्रह्म सत्य जगत मिथ्या हेच खरे का? असंख्य विचारांचा भुंगा कुरतडतो आहे.....

रसिका राजीव हिंग

 

06.05.2023

     एकीकडे डोंगराच्या उंचच उंच रांगा तर एकीकडे खोल दऱ्या. या दऱ्या मध्ये वसलेली वस्ती. जवळ जवळ घरे असलेली ही वस्ती बसमधून जातांना पत्यांचे बंगले वाटावे असे वाटतात. शिमला चे सौंदर्य, तिथला स्नो फॉल पाहण्यासाठी डोळे आतुरलेले होते. शिमला जाता जाता चंदीगड साईड सिन पहातच निघावे लागले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय च्या गजरात दिवसाची सुरुवात झाली.यावेळचा प्रवास केसरी टूर्स सोबत असल्यामुळे सामान उचलणे वगैरे काही टेन्शन नव्हते. प्रवास म्हंटला की याचेच जास्त टेन्शन असत. सकाळीच आठ वाजता चंदीगड साईड सिन पहाण्यासाठी बस ने निघालो. चौतीस सहकारी सोबत घेऊन गप्पा आणि हशा सोबतीला होतेच. टूर मॅनेजर कल्पेश आणि त्यांचा सहकारी हार्दिक मध्येच हिंदी तर मधेच मराठी किंवा इंग्लिश मध्ये सूचना देत होते. चंदीगड शहर पंजाब आणि हरियाणा ची राजधानी. उत्तम शहर रचना असलेले हे शहर फ्रेंच आर्टिस्ट ली कार्बोझियार याने या शहराची रचना केली आहे. या शहराची देवता चंडी देवी आहे म्हणून यालां चंदीगड नाव पडले. अशी माहिती टूर मॅनेजर  कल्पेशने दिली. हमारा पहला पाडाव था सुखना लेक. हा सुखना लेक कृत्रिम रीतीने तयार केलेला आहे. पंजाब मधील भाक्रा नानगल धरणाचे पाणी आणि पावसाचे पाणी यामध्ये  साठवले जाते. कृत्रिम असला तरी सौंदर्याने नटलेला आहे. वर्षभर पाणी पुरवठा करणे सोईचे होत असेल. रस्त्याने जातांना दुतर्फा आब्यांची झाडे, त्याला लगडलेल्या हिरव्या कंच कैऱ्या पाहून मन ही हिरवं व्हायला लागले. कोणी तोडत नसेल का असा बाळबोध? की शंकेखोर विचार मनात आला.
     कुठल्याही स्थळाचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेण्यापेक्षा कॅमेरा मध्ये बंद करण्याची वृत्ती आजकाल जास्त असते. इथेही असेच झाले. प्रत्येक जण मोबाईल सरसावून फोटो सेशन करत होते. वेगवेगळ्या पोझेस देत प्रत्येक जण फोटो काढण्यात रंगून गेलेले. पुढे कधीतरी हे फोटो पाहिले की त्या क्षणाचा पुन्हा अनुभव येतो, कारण डोळ्यात ही साठवलेले असतातच. "चला केसरी चला" या आरोळीने सगळे भानावर आले अन् पुढच्या स्थळाला भेट देण्यास आगेकूच केली.
     रॉक गार्डन. चंदीगड शहराची रचना करतांना जे वेस्ट मटेरियल म्हणजे उरलं सुरलं सामान होते त्याच्यातून  रॉक गार्डन ची निर्मिती झाली.  तुटलेल्या काचेच्या बांगड्या, टाईल्स चे तुकडे वापरून दगड धोंड्यांचा वापर सुंदर प्राणी,पक्षी, मानव यांच्या छान मूर्ती तयार केलेल्या आहेत. बाहुल्यांचे प्रदर्शन. गुहेत आल्यासारखे वाटते काही ठिकाणी. सगळीकडे दगड आणि दगडच. उगाचच ह्या दगडांचे नेटकेपण, त्याचा अतिशय कल्पकतेने केलेला उपयोग पाहून मला असे वाटले या दगडांना पण मन भावना असाव्यात, म्हणून तर ते इतके सजीव सुंदर दिसतात आहे. सतत मान वाकवून नम्रपणे वागायला शिकवणारा रॉक गार्डन नेकचंद यांनी आकारास आणला आहे.
     कर्नाटकातील वृंदावन गार्डनची प्रतिकृती म्हणजे पिंजोर गार्डन. वेगवेगळी फुले, कारंजे असलेला हा पिंजोर गार्डन पाहण्यात मला तरी कशी मजा नाही आली. छान आहे, पण वयोपरत्वे असेल रमली नाही मी गार्डन मध्ये. पुन्हा एकदा टूर मॅनेजर चा पुकारा झाला आमच्या बसरुपी रथाचे लगाम सैल झाले, अन् दौडत निघालो शिमला च्या दिशेने....

रसिका राजीव हिंगे

  

07.05.2023

    शिमल्याच्या वेशीवरच गार वारे स्वागताला उभे होते. सगळा प्रवासाचा शीण नाहीसा करण्याचे सामर्थ्य असलेले आल्हादक, थंड वातावरण याचा अनुभव घेतच संध्याकाळी साडे सहा वाजता हॉटेल सत्यम पॅराडाईज मध्ये डेरेदाखल झाले. शिमल्याच्या गारव्याचा आनंद घेण्यासाठी जवळपास एक ते दीड तास सिटी मध्ये फिरायला गेलो. बराच वेळ प्रवास झाल्यामुळे पायांना पण थोडे चालायचे होते. पाणीपुरी, मसाला पुरी चाट याचाही इथे आस्वाद घेतला मी सोडून. मस्त मजा आली फिरताना. रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी कठडे नव्हते, अगदी काठावर कार लावल्या होत्या. कसे काढतील तिथून कार,थोडी जरी मागे गेली तर दरी आहेच  झेलायला. पाहूनच धडकी भरली. अर्थात तिथल्या लोकांना सवय आहे त्या भागाची,  तरी भीती वाटलीच.
    ढगाळलेले आकाश, धुक्यानी दाटलेल्या दऱ्या लांब प्रवासासाठी (long drive) आवश्यक असलेले वातावरणाची भेट घेऊन आली सकाळ. अशा रम्य वातावरणामध्ये आम्ही धडक दिली कुफ्री येथे. जेव्हाही या भागात बर्फ पडायला सुरुवात होते तेव्हा सर्वात आधी कुफ्री येथे बर्फ पडतो. या भागात बटाट्याची शेती केली जाते. या बटाट्याचे नाव कुफ्री आहे. त्यामुळे या भागास कुफ्री हे नाव पडले. या बटाट्या मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. कुफ्रि ला जाण्या आधी एका सैनिकी वाहनतळावर बस पार्क करावी लागते. कारण पुढे खूपच अरुंद रस्ते असल्यामुळे फक्त लहान गाड्या म्हणजे तवेरा,सुमो,झायलो यासारख्या गाड्यांनी  प्रवास करावा लागतो. सैनिकी विमानतळावर स्नो फॉल बर्फाच्या पावसाने आमचे स्वागत केले. आनंद आणि स्वतःचा बचाव करतच कुफ्री च्या प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी मिळेल त्या गाडीतून सगळेच निघालो. पाच सात मिनिटे खूप भारी बर्फाचा पाऊस पहायला मिळाला. इथे केव्हा कोणते वातावरण राहील याचा अंदाज येत माझी. घटकेत पाऊस तर घटकेत ऊन. बालकवींच्या श्रावण मासी या कवितेतील क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे या ओळींची आठवण करून देणारे वातावरण. प्राणी संग्रहलयातील वाघोबा दादांची भेट झाली मात्र. मस्त डौलदार चालत होते दादाश्री. मृग मात्र कोण आलंय, याचा अंदाज घेत हळूच दुडक्या चालीने आपल्याकडे कोण कोण पाहतंय हे पाहण्यासाठी वळून वळून पाहत होते. कस्तुरी मृग आहे असे लिहिले होते. साध्या हरणा पेक्षा वेगळा. कस्तुरीचा वास काही आला नाही. पण असावा कस्तुरी मृग. काही पक्षी होते. लिहिले होते पण काही कळे ना. खूप नव्हते. ओळखीचे नव्हते पक्षी. ते पण येऊन पाहायचे अन् लपून जायचे कशाच्याही आड. तिथेच थोडीफार चुटुक पुटुक खरेदी केली.
    02 जुले 1972 रोजी भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जो करार झाला तो सिमला करार या नावाने प्रसिद्ध आहे. ज्या ठिकाणी झाला ते चिनी बंगला म्हणजे इंदिरा हाऊस पहायला गेले. आतून काही दाखवत नाही. फक्त त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष असलेली ही वास्तू पाहून मनात विचार आला, की असे करार करून वेळ मारून नेण्याची कला पाकिस्तान ला चांगली जमते. या करारातील कोणत्याच अटी पुढे पाकिस्तान सरकारने पाळल्या नाहीत याचा प्रत्यय कारगिल चे युद्ध.  हा करार होत असताना तिथे खूप गर्दी झाली होती. करार काय होतो हे ऐकण्यासाठी नाहीतर झुल्फिकार भुट्टो ची मुलगी बेनझीर भुट्टो तिथे आली होती. ती अतिशय सुंदर होती म्हणून तिला पहायला गर्दी झाली होती. तिथून निघालो
     पुढे  इनडोअर आऊट डोअर गेम होते. ज्यांची लहान मुले होती, मोठ्यांना पण गेम खेळण्यात आवड होती तेच खेळ खेळण्याची मजा लुटत होते. मला खेळ खेळता येत नाही पण खिलाडूवृत्ती आहे माझ्याजवळ? असो. जेवण झाल्यानंतर पुढे निघाले.
    शिमला समुद्र सपाटीपासून 2200मीटर उंचावर आहे. त्याच्यावर मॉल रोड 200मीटर वर आहे. हे 200 मीटर चे अंतर आम्ही लिफ्ट ने पार केले. मॉलरोड हा इग्रजांच्या  काळातील आहे. जोपर्यंत इंग्रज भारतात होते तोपर्यंत भारतीय नागरिकांना मॉल रोडवर प्रवेश नव्हता. तीन स्तर असलेले मार्केट आहे. मॉल म्हंटले की मोठे मोठे शोरुम वगैरे असतील असे वाटले. नामांकित कंपनीच्या वस्तू मिळतात. इथेच चर्च आहे. आम्ही गेलो नाही पण छान असावे.
    प्रत्येक प्रांताचे काही  वैशिष्ट्ये असतातच. हिमाचल प्रदेश म्हणजे थंडी, बर्फ, वारा,पाऊस. कसे जगत असतील इथले लोकं असा प्रश्न पडतो.  ज्या भागात राहतो तिथली सवय होऊन जाते. तिथली जीवन शैली अंगवळणी पडते. ठिकठिकाणी रस्त्याचे कामे चालू आहेत, कुठे बोगद्याची कामे सुरू आहेत, इतकेच नव्हे तर उड्डाण पूलाचे कामे सुरू आहेत. कसे इतक्या थंडीत हे लोकं काम करत असतील देव जाणे. त्यांना पाहिले की एक कडक सलाम द्यावासा वाटला, अन् मनोमन दिल्या गेला.  सगळ्यांना शक्ती दे रे देवा म्हणतच निद्रा देवीच्या कुशीत पहुडले, सकाळी उठून मनाली गाठायचे होते....

रसिका राजीव हिंगे

 

08.05.2023 आणि 09.05.2023

     सकाळी आठ वाजता मनाली कडे आगेकूच केली. पूर्ण दिवसाचा प्रवास. जाता जाता सगळ्यात मोठी असलेली हसन व्हॅली पाहिली. किती खोल आहे याचा अंदाज लागत नाही. सतलज आणि बियाज नदीचा संगम पहायला मिळाला. सतलज नदीवरचे भाक्रा नानगल धरण हे सगळे प्रवास करतांनाच पाहिले. एसीसी सिमेंटचा कारखाना सतलज नदीच्या जवळ आहे. या नदीतील किंवा किनाऱ्या वरील दगड सिमेंट बनवण्यासाठी वापरतात. खूप मोठा प्लांट आहे. दहा हजार कर्मचारी इथे तीन शिफ्ट मध्ये काम करतात.
     पावसाची रिमझिम सोबत करतच होती. मध्येच आमच्या बस ड्रायव्हर ने एका टॅक्सीला धडक मारली. त्यामुळे ते सगळे प्रकरण निस्तरायला दोन अडीच तास लागले. त्यामुळे संध्याकाळी मनाली पोचण्यास उशीर होत होता. मध्ये येताना आर.के.फॅक्टरी मध्ये खरेदीसाठी गाडी थांबविली होती. खरेदी म्हंटले की स्त्रियांचा उत्साह अगदी उतू जातो. आर. के. चा मस्त गल्ला भरून दिला अन् मगच केसरी चे सहकारी बाहेर पडले. तिथून थेट मनाली गाठले. पाऊस, वारा यामुळे थंडी चांगलीच भरली होती अंगात. हातपाय गारठले होते म्हणजे खरोखर आक्रसले होते. हॉटेलच्या पायऱ्या चढताना काहीच दिसत नव्हते इतका पाऊस. कसेबसे आत शिरलो. म्हणजे सेफ झोन मध्ये. तसंही माणसाला नेहमी सुरक्षितता हवी असते. आपण सेफ झोन मध्ये आहे न विषय संपला अशी वृत्ती साधारण असते आजकाल. याला अपवाद आहेतच पण साधारणतः असेच असते.
     मनालीची बर्फाच्छादित थिजलेली असली तरी चैतन्यमय सकाळ. मनाली साईड सिन पाहण्यासाठी सगळेच तयार होऊन खाली आलोत. सकाळ छान झाली पण थोड्याच वेळात अत्यंत वाईट बातमी कळली. आमच्या सोबत असलेल्या गादेवार मॅडम यांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचे दुखःद निधन झाले. सगळ्यांशी बोलणाऱ्या माधुरी ताई अचानक निघून गेल्या. वास्तविक पाहता चार पाच दिवसांची ओळख.  सरसरून अंगावर काटा आला. कळेचना काय करावे. कोणीही नीट नाश्ता केला नाही. सगळे आपापसात चर्चा करत होते. ग्रुप मधील सौ. खांबेकर मॅडम यांचा पुढच्या दिवशी वाढदिवस आहे कळल्यावर फक्त त्यांनीच शुभेच्छा दिल्या होत्या आधीच्याच दिवशी. जणू त्यांना कळलं होतं का उद्या शुभेच्छा द्यायला मी नसेल म्हणून. एक सहकारी गेले चार पाच दिवस आपल्या सोबत "होता" असे म्हणावे लागत होते. लगेच चैतन्याचे रूपांतर बॉडी म्हणजे शव,कलेवर मध्ये झाले. इतकं क्षणभंगुर जीवन असूनही आपण मी मी माझे माझे करत राहतो. शो मस्ट गो ऑन या न्यायाने सहाय्यक टूर मॅनेजर सोबत मनाली येथील वसिष्ठ ऋषींचे मंदिराला भेट दिली. वसिष्ठ हे ब्रह्माचे पुत्र. पहिले पाच जीव निर्माण झाले त्यात वसिष्ठ ऋषी आहेत. वसिष्ठ मुनींचे शंभर पुत्र कल्माषपाद राक्षसाने मारले. पुत्र शोकात वसिष्ठ अतिशय उद्विग्न झाले. मन अस्थिर झालेले असताना ते मनाली इथे बियाज नदीच्या मध्यभागी देह समर्पण करण्यासाठी गेले. तिथे गेल्यावर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. त्यानंतर त्यांनी तिथेच बरीच वर्षे तप केले. राम रावण युद्धात रावणाचा वध झाला. ब्रह्म हत्येचे पाप नष्ट व्हावे म्हणून रामाने अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरविले. वसिष्ठ ऋषी हे रघु कुळाचे गुरू होत. त्यांना शोधण्यासाठी रामाने लक्ष्मण यास पाठविले. खूप शोध घेतल्यानंतर लक्ष्मणाला वसिष्ठ ऋषी सापडले. खूप थंड वातावरण असल्यामुळे आपल्या गुरूंना स्नानासाठी गरम पाण्याची व्यवस्था करावी या उद्देशाने लक्ष्मणाने बाण सोडून एक कुंड तयार केले ज्यामध्ये गरम पाणी होते. पण वसिष्ठ हे तर ब्रह्मज्ञानी, त्यांना गरम पाण्याची गरज नव्हती. म्हणून लक्ष्मणाला त्यांनी त्या कुंडात स्नान करण्याची आज्ञा केली. यापुढे जे कोणी या कुंडात स्नान करतील त्यांचे सगळे पाप नाहीसे होईल, त्वचा रोग नाहीसे होतील असे वरदान दिले. आजही इथे गरम पाणी आहे. बरेच भाविक येथे स्नान करतात. या गावाचे नावच वसिष्ठ आहे. समोरच रामाचे मंदिर, शिवाचे मंदिर होते. या सहलीमध्ये मंदिरात जाणे पूजा, अभिषेक असे काहीच नव्हते त्यामुळे थोडे चुकल्या सारखे वाटले. पण वसिष्ठ ऋषींच्या मंदिरात गेल्यावर सहल सुफळ संपन्न झाल्यासारखे वाटले. कुठलीही सहल  देव दर्शना शिवाय पूर्ण करणे अजून तरी पचनी पडत नाही असे वाटले. म्हणून की काय आजचा दिवस मंदिरासाठी होता जणू. हिडिंबा मंदिर. पाच पांडवांपैकी भीम याची सहचारिणी. पांडव वनवासात असताना भीम आणि हिडिंबा यांनी लग्न केले होते. मनालीच्या जंगलात ती राहत असावी.ती या जंगलाची राणी होती. हिडिंबा या गावाची ती ग्राम देवता आहे. खूपच गर्दी होती दर्शनाला. पण छान झाले दर्शन. मंदिर पुरातन आहे. पन्नास साठ पायऱ्या चढून जावे लागते. मंदिर जंगलातच आहे. हिडिंबा मंदिराच्या परिसरातच घटोत्कच याचे मंदिर आहे. घटोत्कच हा भीम आणि  हिडिंबा यांचा मुलगा. अतिशय पराक्रमी. मंदिरात प्रवेश केला तेव्हा मस्त उन होते. दर्शन घेऊन निघाले तेव्हा एकदम गार वारा, हुडहुडी भरली अंगात. क्षणाक्षणाला बदलणारे हवामान. तिथे काही जंगलात राहणारे लोक अजगर घेऊन बसले होते. बरेच पर्यटक खांद्यावर घेऊन फोटो काढून घेत होते. मुक्या प्राण्याचा असाही उपयोग पैसे कमविण्यासाठी. ससा सगळ्यात भित्रा प्राणी. त्यालाही हातात घेऊन फोटो काढत होते. सशाला धडकी भरली होती, थरथरत होता. कोण कोणाचा कसा उपयोग करून घेईल हे सांगता येत नाही हेच खरे.
     संध्याकाळी स्थानिक लोकांनी लोक कला सादर केल्या. हिमाचल प्रदेशातील छान पारंपारिक लोकगीत आणि लोकनृत्य सादर केलेले. आम्ही ही सगळे त्यांच्यासोबत फेर धरून त्यांनी सांगितल्या तशा स्टेप करत नृत्य केले. मजा आली. काही गेम खेळलो. कच्ची पपई,पक्की पपई सारखे. दोन तास धूम केली सगळ्यांनी. लय भारी.
     चला केसरी चला चा पुकारा झाला. उद्या सकाळी स्नो पॉइंट ला जायचे आहे. सकाळी सात वाजता निघायचे आहे. या आनंदातच उद्याचे उत्साहित करणारे स्वप्न बघत निद्रादेवीच्या मांडीवर स्वतः ला झोकून दिले...

रसिका राजीव हिंगे 

 

10.05.2023

     ओली पहाट. मनालीची दुसऱ्या दिवशीची सकाळ. सृष्टीचे आरसपानी रुप डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न तसाच कॅमेरा बंद करण्याचा अट्टाहास. किती पाहू अन् किती नको असे होते. सकाळीच सात वाजता रोहतांग पास च्या पाच किलोमीटर आधी कोकसर मध्ये स्नो पॉइंट  पहायला निघालो. रोहतांग पास पॉइंट बंद असल्या मुळे कोकसर मध्ये पाहू असे ठरले. आधीच्याच दिवशी जायचे होते पण खूप बर्फ पडला त्यामुळे  जाणे शक्य नव्हते. तेव्हा बराच जणांचा विरस झाला. हवामान खराब आहे त्यामुळे जाता आले नाही. "आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है, आज मौसम" असे उगाचच वाटून गेले. अर्थात मौसम त्याच्या प्रमाणेच चालणार. पण आपल्याला हवे ते मिळाले नाही की आपण लगेच त्यावर बोट ठेवणार.
     रस्ता अरुंद असल्यामुळे छोट्या गाड्या घेऊन जावे लागले. बर्फात खेळायचे होते शिवाय केव्हा वातावरण बदलेल आणि पाऊस सुरू होईल किंवा बर्फ पडायला लागेल याचा काहीच अंदाज नव्हता. त्यासाठी डंगरी म्हणजे जंक सुट भाड्याने घेणे गरजेचे होते. तसेच गम बुट, लोकरीचे मोजे, हातातले मोजे असा सगळा लवाजमा घालून जणू चंद्रावर चाललो आहे की काय या थाटात बर्फाच्छादित शिखरे गाठण्यासाठी छोट्याश्या बस रुपी अश्वाला टाच मारली.
     जिकडे नजर जाईल तिकडे पांढरे शुभ्र बर्फाच्छादित डोंगर, त्यावर पडलेले कोवळे पिवळसर ऊन, अप्रतिम दृश्य. किती फोटो काढले, व्हिडिओ काढले तरी मन भरत नव्हते. कुठे आभाळ टेकलेले तर कुठे कापूस पिंजून ठेवलाय इतके बर्फाचे पुंजके. उंच उंच देवदार वृक्ष, फर चे वुक्ष त्यांच्यामधून दिसणारी बर्फाच्छादित शिखरे. सृष्टीचे सौंदर्य पहावे तितके कमी. शब्द नाहीत माझ्याकडे या सौंदर्याचे वर्णन करायला. निसर्गाचे हे ईश्वरी रुप पाहता पाहता आपोआपच नतमस्तक होता होता गहिवर दाटून आला.
     सगळ्यात मोठा म्हणजे 9.7 किमी असलेला अटल टनल मधून गाडी जाताना पुन्हा एकदा ज्यांनी हा घडविला त्यांच्यासाठी त्रिवार मुजरा केल्या गेला. इतक्या थंड वातावरणात, कमी जागेत, एकीकडे बर्फाचे डोंगर तर एकीकडे खोल दरी, अशा आव्हानात्मक कार्याला सुरुवात केली ती अटलजी सारख्या कविमनाच्या पण कणखर व्यक्तिमत्वाने भूमी पूजन करून. काम करणाऱ्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तेच अटलजींनी केले. त्यांच्या हयातीत त्यांना हा भव्य प्रकल्प पाहता आला नाही हे त्यांचे म्हणण्यापेक्षा आपले दुर्दैव. किती विचारपूर्वक बनविलेला आहे हा बोगदा. या कार्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करणारे अभियंता, कर्मचारी, महत्वाचे म्हणजे मजूर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना केव्हा डोळ्यांतून अश्रू धारा व्हायला लागल्या कळले नाही. एक कडक सलाम पुन्हा एकदा मनोमन दिला अन् समोर साद घालणाऱ्या हिमशिखरांना प्रतिसाद देण्यासाठी गाड्या अटलच्या बाहेर आल्या तसेच मन ही धाव घेत होते.
     कोकसर येथे आम्ही पोहचलो तेव्हा गर्दी काहीच नव्हती. तिथल्या वेगवेगळ्या पाच खेळांचे एकत्रित पॅकेज होते. बाईक राईड, ट्युब राईड, याक राईड, झिप लाईन, स्केटिंग. मस्त वाटले हे इव्हेंट करताना. झिप लाईन आणि याक राईड केले नाही. बाकी मस्त मजा. बर्फात मस्त वाटले. मौसम आज बेईमान नहीं था. हमारे साथ था. त्यामुळे तिथे सगळ्याच गोष्टीचा आस्वाद घेता आला. मॅगी कधीच खाल्ली नाही, आवडतच नाही, तरीपण तिथे खाल्ली. गरम गरम छान वाटली. बर्फात बसून वेगवेगळ्या आकार बनविणे, पुन्हा मोडणे, बर्फ झेलत अंगावर उडवणे म्हणजे अगदी बालपण जागे झाले जणू. तिथे आलेले लहान मुलांनी छान पुतळे बनविले. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या रंगात निरनिराळ्या रंगाचे जंक सुट घातलेले पर्यटक म्हणजे रांगोळीत भरलेले रंग असे वाटले. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते हेच खरे. इथे हे प्रकर्षाने जाणवले. लहान, थोर, तरुण,प्रौढ सारेच होते इथे. वय विसरायला लावणारे वातावरण. रोप वे म्हणजे  केबल कार द्वारा सोलांग व्हॅली चढून वर गेले. हा पण एक जीव मुठीत घेऊन चढणारा अनुभव होता.वर गेल्यावर पूर्ण मनाली शहराचा  व्ह्यू पाहता आला. निळे, राणी कलरचे छप्पर असलेले घरे थेट डोंगराच्या कुशीत पहुडलेली दिसत होती. बेसुमार फोटो काढले इथे. गावातील पण काही फोटोग्राफर इथे येतात. त्याच्या कडून पण फोटो काढून घेतले. भरार वारा होता. वर वातावरण जर खराब असेल तर मनाली शहर दिसणार नाही असे टूर मॅनेजर म्हणाले होते.आज मौसम ने खूपच मेहरबानी केली होती. सगळ्याच सौंदर्याला,लावण्याला दाद देता आली. सगळं अनुभवता खूपच थकायला झाले. सव्वातीन साडेतीनला जेवण झाले. निद्रा माय ने अंगाई गायला सुरुवात केली अन् अलगद कुशीत घेतले. झोपेतही जीव मुठीत घेऊन केलेले बाईक रायडिंग, स्केटिंग दिसत होते.
     खूप दिवसांनी जादूचे प्रयोग पहायला मिळाले. संध्याकाळी गेट टुगेदर मध्ये मुंबई पुण्याचे जादूगार आले होते. केसरी टूर साठी ते जून पर्यंत मनाली ला राहतात. त्यांनी नाव सांगितले पण मला काही कळलेच नाही. खूपच छान जादूचे प्रयोग होते. हसून हसून पुरेवाट झाली. लहान मुलांबरोबर मोठेही आनंद घेत होते.  अफलातून हातचलाखी होती. शेवटी तर एकमेकांच्या हातावर हात ठेवून आवडणारे फुल कोणते हे विचारले. हात एकमेकांवर घासायला सांगितले अन् आता वास घ्या म्हणाले, तर खरच ज्याने जे फुल सांगितले होते त्याचा गंध आला. हा काय प्रकार कळला नाही, मस्त दरवळ होता हे मात्र खरे.
     आता घर आठवायला लागले होते. घरचे साधं वरण भात दिसायला लागला. केसरी ने याची जाणीव करून दिल्यामुळे तर जास्तच घर डोळ्यासमोर यायला लागले. शेवटी  घर ते घर. चला केसरी टूर चला. उद्या पासून आपला घराकडे जाण्याचा प्रवास सुरू होईल. घरी जाण्याच्या विचारातच माधुरी ताई गादेकर यांच्या रूम समोरून जाताना त्याची आठवण झाली. पुण्या हून निघताना भेटलेले पहिले केसरी ग्रुप चे सहकारी. "अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती" हेच खरे.... सकाळी लवकर उठून चंदीगड सर करायचे आहे हे ठरवतच निद्रादेवीच्या अंकी आरूढ झाले....

©️®️रसिका राजीव हिंगे 

 
11.05.2023 आणि 12.05.2023

     आजचा दिवस प्रवासाचा. लांबच लांब प्रवास. 310किमी. मनाली ते चंदीगड. घाटाचा रस्ता, पुन्हा हिमशिखरे साद घालत होती. पण प्रतिसाद फक्त नजरेनेच देणे शक्य झाले. वारा डरकाळ्या मारत वाहतो आहे की काय असे वाटले. मनाली हून निघाल्या बरोबर दीड दोन तासातच आर के(are key) शॉल फॅक्टरी वर पुन्हा धाड टाकली. अन् राहिलेली म्हणण्यापेक्षा आलोच आहे तर घेऊनच घेऊ असे म्हणत आर के चे दुकान रिकामे व्हायला सुरुवात झाली. चला चला म्हणता म्हणता जवळपास  दीड तास फक्त चहा कॉफी साठी लागला. निसर्गाचा चमत्कार पहात पदार्थांच्या, सिनेमाच्या भेंड्या खेळत प्रवासाचा वेळ घालवणे चालले होते. सिनेमाच्या भेंड्या खेळताना वेगळेपण अनुभवायला मिळाले.  टेक्नोसॅवी पिढी सोबत असल्यामुळे सिनेमाचे नाव सांगितले की "हा नाही सिनेमा काही सांगायचे नाही" असे म्हणून ही पिढी थांबली नाही तर लगेच गुगल बाबाला पाचारण करून खरे खोटे ठरवत होते. मी सहज म्हटले की गुगल प्रत्येक वेळी उत्तर बरोबर देतोच असे नाही.  सगळेच खळखळून हसले कारण जणू काही मला  माहीतच नाही  गुगल. गुगल म्हणजे प्रमाण असे झाले आहे सध्या. स्मरणशक्तीला ताण द्यायचा नाही, गुगल सर्च करायचे अन् वेळ साजरी करायची किंवा मारून न्यायची ही गोष्ट मात्र अधोरेखित झाली हे सत्य आहे कटू असलं तरी.  मजल दरमजल करीत एकदाचे रात्री नऊ वाजता चंदीगड गाठले.
     आली निरोपाची वेळ
     जीव भारावून जातो
     राहू द्यावा स्नेहबंध
     आम्ही विनंती करतो
     दुसरा दिवस उजाडला तो निरोपाचे वारे घेऊनच. आठ दिवसांची ओळख पण ऋणानुबंध छानच जुळले होते. टूर मॅनेजर कल्पेश ने तर चंदीगड पोहचल्या बरोबरच निरोप घेतला. सहाय्यक टूर मॅनेजर हार्दिक मात्र एअर पोर्ट पर्यंत सोडायला आला होता. त्यांच्या पण कितीतरी अशा टूर्स होत असतात, प्रत्येक ग्रुप चा निरोप घेताना त्यांच्या मनात काय भावना असतील बरे! प्रत्येक सहलीचा अनुभव वेगळा, व्यक्ती वेगळे,  प्रत्येकाला न चिडता सांभाळणे म्हणजे कठीणच. त्यांना या करीयर मध्ये यश हवे असेल तर हेच महत्वाचे होय. तरीपण प्रवृत्ती असतेच काहीतरी वेगळे वैशिष्टे असलेली. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले माणसे एकत्र येतात म्हणजे नक्कीच कुठेतरी ऋणानुबंध असतातच असतात. उगाचच कोणाशी भेट होत नाही. इतके अठरा पगड लोक आहेत, पण सगळ्यांशीच कुठे ओळख होते. ज्यांच्या व्हायच्या त्यांच्याच  भेटी होतात.
     हिमाचल प्रदेशातील निसर्गाच्या सौंदर्याचे, लावण्याचे विविध रुप पाहताना असे वाटले इथे राहणारे लोक किती भाग्यवान यांना रोजच हा अनुभव घेता येतो. प्रत्येक भागाचे वैशिष्टे वेगळी असतात, सृष्टीचे सौंदर्य सगळीकडे विविध रुपात अवतरले आहे, फक्त ते पाहण्याची शक्ती दे हीच प्रार्थना करून मनोमन निर्मात्याचे आभार मानले इतकी छान सहल घडविली म्हणून अन् घराच्या दिशेने पावले वळली....

रसिका राजीव हिंगे
    
    

rasraj#हिमाचल प्रदेश # सहल#   

    


     

   
   
   
     





No comments:

Post a Comment