Sunday, 18 April 2021

रम्य ते बालपण...

 




               असेच असू दे लहानपण

               जे जे मज बहु आवडे

               मनासारखे जगता येते

               ना चिंता ना कशाचे वावडे

       मस्त! ना चिंता ना काळजी! हे शब्दच माहीत नसतात बालपणी. निरागस,निरोगी आणि स्वच्छंदी बाल्य.

       प्रत्येकाच्याच वाट्याला येतं रम्य बालपण. असं कधीच होत नाही न एकदम तरुणपणच आले. बालपण आल्याशिवाय कसे बरे तरुण, वृद्धा वस्था येईल?असा खोडकर विचार आताच माझ्या मनात आला अन मी गेले हुंदडत भूतकाळात जिथे माझं बाल्य होतं.

       पाखरासारखे भुर्रऽऽऽकन उडून जातात हे बालपणातील दिवस. असे असले तरी या वयात झालेले संस्कार,लाभलेले मैत्र आजन्म पुरतील असे असतात.

       त्यावेळी कळतही नाही. चिमणदातांनी तोडलेले छोटे चिंचेचे बाटूक मैत्रिणीला देतांना वाटून खाण्याचा संस्कार नकळतपणे होत जातो.  भांडणे पण कशी तर आहे काय नाय काय. क्षणात गट्टी तर क्षणात कट्टी करणारी.

       शाळेत जातांना येतांना होण्याऱ्या गमतीजमती, एकमेकांसाठी थांबणे, म्हणजे सोबतच जाणे येणे. घरातील कामे सुद्धा आम्ही मैत्रिणी एकमेकींना करू लागायचो पाचवीत होते त्यावेळेस चे आठवले. असा आधार असायचा बालपणात मैत्रीचा.

       संध्याकाळी गिल्ली दांडू,लगोरी,दोरीवरच्या उड्या, पतंग उडविणे आणि चिडवचिडवी. राग आला तर येऊ दे असा खाक्या होता. अभ्यास ही सोबतच करायचा,जणू मिनी शाळाच भरायची रोज आळीपाळीने एकेका घरी.

       हरतालिकेची पूजा सोबतच, गल्लीतले सगळे मुलेमुली मिळून कार्यक्रम सादर करायचे हरताळकेच्या दिवशी. त्याची 15 दिवस आधीपासूनच तयारी.  कार्यक्रमच्या तालमी अशा थाटात व्हायच्या की जणू राज्यस्तरीय कार्यक्रम आहे.  त्यावेळी काही भाड्याने वगैरे ड्रेपरी आणण्याची पद्धत नव्हती. घरातलेच जे कपडे आहे ते त्या भूमिकेला साजेसे घालायचे, एखादीला कमी पडले तर ज्याचे जवळ आहे त्याने द्यायचे हा अलिखित नियम, नाही दिले तर भांडून घ्यायचे अन कार्यक्रम साजरा व्हायचा.

       तुझा भाऊ,बहीण ते माझेही असायचे असे विश्व बंधुत्वाचे बीज पेरणारे बालपण आजकाल च्या मुलांना नाही अनुभवता येत याची खंत वाटते.ही तंत्रज्ञान प्रेमी(टेक्नोसॅव्ही) पिढी असे स्वच्छंदी, रम्य बालपण जगू शकेल का? बाल्य हरवले तर नाही ना अशी भीती,काळजी वाटते या पिढीकडे पाहून. असो. कालाय तस्मै नमः.

       बालपणाने दिलेली ही शिदोरी आजही पुरते आहे म्हणून तर या जगात घट्ट पाय रोवून उभे राहणे शक्य झाले आहे असे मला वाटतं....

       

       रसिका राजीव हिंगे

       

No comments:

Post a Comment