Sunday, 28 June 2020

सहज सुचलं म्हणून... कृष्ण सखी द्रौपदी


      कृष्ण सखी द्रौपदी ही महाभारतातील असं व्यक्तिमत्व आहे की तितका जास्त विचार केला तितके जास्त तिच्यात
गुरफटत जायला होत.
महाभारतातल्या प्रत्येकाने कुठेतरी कपट केलेच आहे पण द्रौपदीने कधीच नाही अशी ती मानिनी,स्वाभिमानी होती. सौंदर्याची परिसीमा म्हणजे द्रौपदी. विपुल केशसंभार, विलक्षण सौंदर्य लाभलेलं. कुणालाही मोहिनी पडावी असे न भूतो न भविष्यती व्यक्तीमत्व.  द्रौपदी विविध नावांनी ओळखली जात होती. यज्ञातून आली म्हणून याज्ञसेना, द्रुपद राजाची कन्या द्रौपदी, पांचाल देशाची म्हणून पांचाली, सावळी म्हणून कृष्णा तर व्यास तिला मनस्विनी म्हणत असत.   प्रचंड बुद्धिमत्ता होती तिच्याजवळ. तिचे वाक् चातुर्य वाखाणण्यासारखे होते. युधिष्ठीर सम्राट असतांना त्याची सचिव होती पांचाली. सगळ्यांकडे तिचे लक्ष असायचे. कोमल हृदयाची द्रौपदी प्रसंगी कठोरपणे निर्णय ही घेत असे. इंद्रप्रस्थाचे सम्राज्ञी पद तिने लीलया पेलले होते.
इतकी सर्वगुणसंपन्न, द्रुपद राजकुमारी, बलाढ्य कुरुवंशाची कुलवधू,  पाच अजिंक्य पांडवांची सम्राज्ञी, पाच पुत्रांची माता असूनही एखाद्या सामान्य दासीसारखे विटंबनेचे प्रसंग तिच्यावर यावेत यापेक्षा दैवदुर्विलास तो कोणता?
स्त्रीला गृहीत धरूनच पुरुषाची  निर्णय घेण्याची वृत्ती ही फार पुरातन आहे. पांचाली ला न विचारता द्यूतात पणाला लावले जाते. सगळंच हरलेले पांडव निष्प्रभ झालेले, पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर यासारखे रथी महारथी कुरु सभेत दुर्योधनाने मांडलेल्या या अनाचारी कृत्यास त्रयस्थ म्हणून पाहण्या शिवाय काही करू शकत नाही.  महाराणी गांधारी, राजमाता कुंती सुद्धा हतबल होतात. तिचा सखा कृष्ण तिच्या मदतीला येतो. जणू चिंधीचे ऋण फेडण्यासाठी.
वनवासात जटासूर राक्षस तिला पळवून नेले त्यावेळी भीमाने द्रौपदीला राक्षसाच्या तावडीतून सोडवून आणले. जयद्रथाने तिला पळवले त्यावेळी अर्जुन आणि भीमाने जयद्रथाला पकडले. अज्ञातवासात विराट राजाच्या सभेत त्याचा मेव्हणा किचकाने तिला लाथ मारली, अभिलाषेने पाहिले, तिचा अपमान केला यावेळी ही भीमाने तिचे रक्षण केले आणि किचकवध केला. किती आणि कसे हे प्रसंग झेलत होती याज्ञसेना. अग्नीचे रुप ल्यालेली ही अग्निशिखा असूनही कसले भोग भोगत होती. तरीही ती डगमगली नाही. येईल त्या प्रसंगाला सामोरे जात राहिली. स्वतःचे पाच ही पुत्र युद्धात मारले गेले, तिच्या  रक्तांचा एकही अंश या पृथ्वीतलावर शिल्लक राहिला नाही याचे दुःख उराशी बाळगूनच पांडवासवे स्वर्गारोहण करती झाली.
मी सुरुवातीलाच म्हणाले की पांचालीचा जितका जास्त विचार केला, तिला वाचत गेले तर तिच्यात जास्त गुरफटले जातं. असे कोणते जन्मजन्मांतरीचे कर्म होते तिचे  की तिच्या वाटेला असे जीणे यावे.  समस्त स्त्री सामर्थ्याचे ती प्रतिनिधित्व करत होती, की ही कलियुगातील वास्तवता होती याचा विचार करता करता मन निःशब्द होत. हे केवळ तिचा कृष्णसखा जाणत असेल असे मला वाटतं.....

रसिका
05.06.2020

2 comments: