Friday, 31 May 2024

अनावश्यक खर्च टाळता येतात...

  


 


अनावश्यक खर्च टाळता येतात...

#rasraj#खर्च#संसार#

 

    मोह आणि आसक्ती माणसाला सरळ सात्विक जीवन जगण्यापासून परावृत्त करतात हेच खरे. आजकाल सोशल मीडियावर होणाऱ्या जाहिरात बाजीमुळे नको तिथे लक्ष जाते आणि अमाप खर्च होत जातो. हे खरे असले तरी स्वतः चा स्वतःवर संयम असला की बऱ्याच गोष्टी टाळता येतात.

     पूर्वीच्या काळी कोंड्याचा मांडा करून काटकसर केली जात असे. म्हणजे घरात जे आहे तेच करून खाणे असा अलिखित नियम होता. आवड निवड असा काही प्रकार नसायचा. तरीसुद्धा समाधान असायचे. एकटाच कमवणारा असल्याने  कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी घरातल्या गृहिणीला काटकसर करून संसार करावा लागत असे. काडी काडी जमवून मुलांना सुशिक्षित करण्या सोबतच सुसंस्कृत करण्याची हातोटी पूर्वीच्या स्त्रियांमध्ये होती. 

     काळाची गरज म्हणून स्त्री उंबरठया बाहेर पडली. हातात पैसा खेळू लागला आणि भरीसभर पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीचा पगडा, विविध प्रलोभने, माणसाला खर्च करायला भाग पाडू लागलीत. पैसा आहे म्हणून खर्च करावाच का? हा प्रश्न कधीच पडत नाही कारण तो खर्च करण्यासाठीच असतो असे गृहितक झाले आहे जणू.  पूर्वीच्या काळी ज्या आवश्यक गरजा आहेत त्याच पूर्ण करण्या कडे कल होता. पण आज आवश्यकता नसेल तरी खरेदी (शॉपिंग) केले जाते. कधी हौस म्हणून तर कधी प्रलोभनांना बळी पडून. 

     कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलंमुली फॅशन म्हणून वाट्टेल तसे कपडे खरेदी करतात. ज्याची इतकी आवश्यकता पण नसते. तिच्याजवळ इतके आहेत तर माझ्याजवळ पण हवेत असा अट्टाहास असतो आणि पालक तो पुरवतात. का? कशासाठी? पालकांनी जर सांगितले नाही गरज इतक्या कपड्यांची तर काहीतरी परिणाम होऊ शकेल एखाद वेळेस. लहानपणा पासूनच या सवयी लावल्या तर फायदा होईलच. कपड्यांसारखेच चपलांचे जोड असतात. प्रत्येक ड्रेस वर मॅचींग हवे. या सगळ्या अनावश्यक गोष्टी टाळता येऊ शकतात. ज्याने खर्च कमी व्हायला मदत होईल.

     मॉल संस्कृती ने तर अक्षरशः धिंगाणा घातला आहे. एकदा मॉल मध्ये गेले की नको असलेल्या बऱ्याच गोष्टी घेतल्या जातात. घ्यायला गेलो असतो एक अन् घेऊन येतो दहा वस्तू ज्याची खरच गरज आहे का याचा विचार करावा असे का वाटत नाही. असूया. सगळ्यांकडे आहे मला पण हवे. या विचारातून अनाठायी खर्च होतो आहे याकडे हेतू पुरस्पर कानाडोळा केला जातो.

     असेच सौंदर्य प्रसाधने. मॉल मध्ये किंवा इतर कुठेही इतकी महाग असतात की सर्वसामान्य लोकांना परवडणारी नसतात. तरीही ती घेतली जातात. विशेष म्हणजे या सौंदर्य प्रसाधनांमुळे मूळचे सात्विक सौंदर्य नष्ट होते आहे हे कळत नाही. एखादे दुसरे घ्यावे स्टेटस मेन्टेन करण्यासाठी. भरमसाठ घेतली जातात. वाट्टेल तसा खर्च यावर होतो. हा खर्च अनावश्यक आहे. समजा यातून पैसे वाचले तर छान पुस्तके खरेदी करून वाचावीत. त्यामुळे ज्ञानात भर पडेल. पण आज कोणाला ते नको आहे. याला अपवाद असू शकतील. 

     किराणा दुकान आज असे राहिलेच नाही की काय असे वाटते. सुपर शॉपी मुळे यादीतील वस्तू सोबत यादी बाहेरच्या ही वस्तू घेतल्या जातात. रेडी टू कुक या बद्दल तर काही बोलणेच खुंटावे. आयते मिळते आहे न घेऊन घेऊ. वेळ कुठे आहे करायला. पण पासष्ट रुपयाचे बटाटा पराठा चे पाकीट आणले तर त्यामध्ये फक्त आठ पराठे झाले. तेच जर घरी केले असते तर पासष्ट रुपयात तीन चार वेळा आठ पराठे झाले असते. किती खर्च वाचला असता. आवड असली की सवड मिळते हे खरे जरी असले तरी काटकसर करून संसार करण्याची कला अवगत असली की चार पैसे गाठी बांधले जातात असा सरळ सोपा विचार का येत नाही. 

     किती अन् काय केले म्हणजे संसार काटकसरीचा होऊन अडीअडचणीच्या वेळी पैसा उपयोगी पडेल याचा सारासार विवेक जागृत ठेवून जर खर्च केला तर संसारात आनंदी आनंद निर्माण होईल यात तिळमात्र शंका नाही. फक्त थोडा विवेक आणि विचार करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी लागेल. अगदी सोपी आहे ही सवय लावणे फक्त स्वतःची तयारी हवी......


रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment