Wednesday, 22 May 2024

जागतिक वाढते तापमान एक समस्या

 



जागतिक वाढते तापमान एक समस्या

#rasraj#तापमान#हवामान#पृथ्वी#

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।

     जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी हा अभंग लिहिला कारण त्यांना वृक्षांचे महत्व पटले होते. ज्या गोष्टीचे महत्त्व कळते ती गोष्ट आपल्या जीवाभावाची असते यात शंका नाही. अलीकडच्या काळात रानावनांचे महत्व किंवा उपयोग म्हणू, फक्त जंगल सफारी एन्जॉय करण्यासाठी होतो आहे. त्यातील वनस्पती, पशू, प्राणी, पक्षी यांचे दृष्टीसुख घेण्या पुरसे होतो की काय असे वाटायला लागले आहे. बेसुमार जंगल तोड, वृक्ष तोड यामुळे वातावरणातील गारवा, थंडावा हरवत चालला आहे. परिणाम पृथ्वीचे तापमान वाढते आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. पण ते ओरबाडून घेतले तर तोही कोपेलच. त्याला पण राग येतोच की. 

     स्वतः च्या सुखासाठी विज्ञानाच्या टिमक्या मिरवत जी निसर्गाची अवहेलना केली जात आहे त्याचे परिणाम आपण सगळेच भोगत आहोत.  ऋतुचक्र बदलले का? नेमेची येतो पावसाळा ही म्हण आज खोटी का ठरते आहे? याचा विचार करून पाहिला तरी इतकी भयानक परिस्थिती समोर उभी राहते की क्षणात मनातला विचार झटकून टाकल्या जातो. 

     पाणी जपून वापरा असे नुसते म्हटल्याने खरेच पाणी जपून वापरल्या जाईल का? मी एकट्याने जास्त पाणी वापरल्याने काय फरक पडणार आहे असा प्रत्येक जण विचार करतो अन् हवे तसे वागत राहतो. फक्त स्वतः पुरसे जगणे मानव शिकला आहे. थोडाच विचार करा, आज मला पाणी मिळाले, उद्या माझ्या बाळाला पाणी नाही मिळाले तर काय होईल?  पाण्याचे साठे भराभर संपत आहेत, वेळेवर पाऊस पडत नाही, कुठे ओला दुष्काळ तर कुठे कोरडा दुष्काळ, कशामुळे? पृथ्वीचे वाढलेले तापमान.  बाष्प तयार झाले तरच त्याचे ढग तयार होतील अन् वारा लागून पाऊस पडेल. पण बाष्प तयार होण्यासाठी आधी पाणी तर हवे न पृथ्वीवर. हे दुष्ट चक्र कुठेतरी तर थांबायलाच हवे. मानव निर्मित आहेत ही संकटे. 

     प्रगतीच्या नावाखाली विविध प्रकल्प राबवले जातात. रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी विषारी वायूची निर्मिती करावी लागते. हे करत असताना हा विषारी वायू वातावरणात पसरत जातो. त्याचे दूरगामी परिणाम होऊन धरणी माय गुदमरते आहे. समुद्र मंथन करताना मंथनातून विष निघाले त्यावेळी भगवान शिवाने ते ग्रहण केले अन् सगळा अनर्थ टळला.  जर भगवान शिव यावे असे वाटत असेल तर प्रगती व्हावी पण निसर्गाचे रक्षण हे ऐरणी वर हवे म्हणजे प्राधान्याने करायला हवे. तरच मानव टिकू शकेल.       

औद्योगिक क्रांती करण्याच्या नादात मोठमोठ्या कारखान्यांची निर्मिती झाली. त्यातून निर्माण होणाऱ्या घातक वायू आणि कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण वाढले की हरित गृह परिणाम होतो. हरित वायू परिणामा मुळे तापमानात वाढ झाली. अनेक शास्त्रज्ञांनी हरित वायूंचे परिणाम तापमान वाढते आहे असे सांगितले आहे. मानव निर्मित कार्बन डायऑक्साइड चे प्रक्रियेमुळे पृथ्वी तापते आहे. कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण नियंत्रित केले नाही तर फार मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 

     या विघातक वायूमुळे पृथ्वीच्या ओझोन वायूच्या थराला धक्का बसतो आहे. ओझोन वायूचा थर सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून रक्षण करतो. हा थरच जर कमी झाला किंवा त्याला भगदाड पडले तर हे सूर्याचे किरण पृथ्वीला किती तापवतील विचार करा. हे तापमान सहन न झाल्यामुळे कितीतरी प्रजाती नष्ट होतील. त्यामुळे रोगराई पसरेल, आताच आपण कोरोना सारख्या राक्षसासी झुंजलो आहे. तापमान वाढले तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे, खाऱ्या पाण्याच्या प्रवाहात शेती करणे कठीण होईल. विचार करू या, कारण विचारांनीच ज्ञान मिळतं. 

     निसर्गाचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य समजून त्याची निगा राखली तर तो ही त्याच्या स्वभावा नुसार भरभरून देणार आहे हे लक्षात ठेवावे. आपली वनराई, पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, थोडक्यात आपल्या निसर्ग संपत्तीचे रक्षण करणे हेच सत्य आहे त्रिवार सत्य आहे. तरच आणि तरच आपला तरणोपाय आहे......


©️®️रसिका राजीव हिंगे 

      


     

No comments:

Post a Comment