Saturday, 8 June 2024

अपेक्षा का करावी?


 


अपेक्षा का करावी?

#rasraj#अपेक्षा#संचित#प्रारब्ध#कर्म#

     


     भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेली अशी ही आपली कुटुंब संस्था आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असायचे. साठ लोकांचे असलेले कुटुंब मी स्वतः पाहिले आहे. आजचा एक मिनी इव्हेंट होईल इतके सगळे एका छताखाली गुण्यागोविंदाने राहत असत. पुढे काळ बदलला, काळाची गरज म्हणून विभक्त कुटुंब अस्तित्वात आली. पर्याय नाही म्हणून दूर राहूनही नात्यांमध्ये जवळीक होती. हळूहळू व्याप वाढत गेले, दूर राहिल्याने आपसूकच संवाद कमी होऊ लागले. आज इतका अतिरेक झाला आहे की नात्यांमधला संवाद हरवत चाललाय. मी आणि माझं असे करता करता आपलं याला जागाच राहिली नाही. जो तो फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतो आहे असे चित्र समोर दिसते आहे. पालकांच्या आणि मुलांच्या संवादात दरी निर्माण झाली आहे. आईवडिलांचे फक्त शारीरिक आरोग्य जपणे म्हणजे त्यांची काळजी घेणे असा सर्वसाधारण समज म्हणा किंवा अलिखित नियम झालेला आहे. पण त्यांच्या मनाच्या आरोग्याचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत राहतोच. जसे प्रत्येक नियमाला अपवाद आहेत तसे याला पण अपवाद आहेतच. मी माझ्या मुलाला मोठे करताना किती कष्ट घेतले, म्हणजे अगदी हाडाचे काडं केलीत, रक्ताचे पाणी केले, रात्रीचा दिवस केला असा भावनिक पातळीवर आईवडील विचार करतात. मी केलं म्हणजे त्याने किंवा तिने आमचं करायलाच पाहिजे, निदान दोन शब्द प्रेमाने बोललेच पाहिजे असा अट्टाहास असतो. अपेक्षा असते. व्यावहारिक पातळीवर हे ठीक आहे. पण आईवडील आणि मुलांच्या नात्यामध्ये असा विचार का येतो? इथे भावना महत्वाच्या आहेत असे नाही तरीही हे साटेलोटे आहेच. कशासाठी? हा तर व्यवहार झाला. वास्तविक पाहता जिथे व्यवहार येतो तिथे प्रेम संपतं. आणि जिथे अपेक्षा आहे तिथे अपेक्षाभंग आहेच. 

     आपल्या मुलांनी उत्तुंग भरारी घ्यावी, विदेशात शिक्षण आणि नोकरी करावी हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते, नव्हे असा आग्रहच असतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण तो आकाशाला गवसणी घालत असेल तर त्याच्याकडून पुन्हा स्वतः बद्दलच्या अपेक्षा ठेवू नये.  जेव्हा मला गरज असेल तेव्हा त्याने यावे. नाही आला तर त्याला काही प्रेमच राहिले नाही, आईवडिलांची काळजी नाही, साधा फोन सुद्धा करत नाही या गोष्टींना काही अर्थ उरत नाही. मी त्याचा बोट धरून त्याला चालायला शिकवले म्हणजे त्याने माझी म्हातारपणाची काठी व्हावी हे गृहीत धरल्यामुळे अपेक्षाभंग होतो. 

     आईवडील आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार करतात. घरातले वातावरण, रूढी, परंपरा अनुभवत, अजमावत मुले मोठी होत जातात. काही प्रमाणात का होईना सुसंस्कृत मुले घडविण्याचे दायित्व पालक पार पाडत असतातच. तरीही माझा मुलगा आमच्याकडे लक्ष देत नाही याला जबाबदार कोण? प्रत्येक प्राणीमात्र जन्माला येतांना त्याचे कर्म आणि संचितानुसार आपले प्रारब्ध घेऊन येतो. जसे प्रारब्ध असेल तसे भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही हे अगदी सामान्य माणूस सुद्धा जाणून आहे. मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचे काही कर्तव्य असतात. मुलांना मोठे करून या जगात जगण्याचा मार्ग दाखविण्याचे कर्तव्य प्रत्येक आईबापाला करावे लागते म्हणण्यापेक्षा प्रारब्धाने ही जबाबदारी टाकली आहे. जन्मजन्मांतरीचे आपले जसे कर्म असेल तसेच सुख आणि दुःख आपल्या वाट्याला येतात. यात बदल होत नाही. ते स्वीकारावेच लागतात. असे असेल तर विदेशात गेलेला मुलगा आला नाही, तो आला असता तर त्याची आई गेली नसती, तिने देह ठेवला नसता याला काहीच अर्थ नाही. कारण जे निर्माण झाले आहे त्याचा नाश अटळ आहे. तिचा जीव मुलांमध्ये अडकला होता. त्यांची भेट झाली असती तर कदाचित ती गेली नसती. हे सगळे पाण्यावरचे बुडबुडे आहेत. केव्हा यायचे आणि जायचे हे ठरलेले आहे. सांगून सवरून येणे जाणे नाही. तरीही मुलांना दोषी ठरवून आईबाप मोकळे होतात. असे अजिबात नाही की मुले सर्वस्वी बरोबर आहेत. आईबापाचे जसे कर्तव्य आहे तसेच मुलांचे पण आहे. प्रत्येक जण आपापल्या कर्माचे फळ भोगत असतोच, त्याशिवाय सुटका नाही. कोणीही यातून पळवाट काढू शकत नाही अन् अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाही. 

     कर्म, संचित, प्रारब्ध याचा विचार नाही केला तरी एक जबाबदार माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला, समाजभान ठेवले तरीही जीवनात अपेक्षित यश मिळेलच आणि आनंदही. कोणाकडून कशाचीच अपेक्षा न ठेवता  प्रारब्धानुसार आपले कर्तव्य पार पाडले तर संवादाची ही जी दरी  निर्माण झाली आहे ती कमी होईल. आरोप प्रत्यारोप केल्यामुळे संचित कमी होणार नाही तर मनुष्य जन्माला आला आहेस न मग तुला क्रियामाण कर्म करण्याचा अधिकार आहे. सत्कर्म आणि सदाचार करत रहा आणि आनंदरूप होऊन जगण्याचा प्रयत्न करावा. यापरीस दुसरे सुख ते कोणते!...


रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment