Saturday, 11 June 2022

बेधुंदपणाची एक लहर




जगणे बेधुंद


बघ धुंदल्या क्षणांना

मंतरल्या वाटेवरी

चांद आला उतरून

सागराच्या या किनारी


     आकाशात पौर्णिमेचा चंद्र उगवला अन साऱ्या चराचरात एक बेधुंद पणाची लहर उठली जणू. समिंदराच्या लाटा बेभान होऊन उंच उंच उसळत होत्या, चंद्रास जणू कवेत घ्यायला निघाल्या की काय असे वाटावे. किती हा बेधुंदपणा!

     आपणही जगावं असंच कधीतरी बेधुंद होऊन. उठू द्यावी एक लहर, तरंग बेधुंद पणाचा तनामनावर.  सुसाट धावावे वाऱ्यासारखे वाट फुटेल तिकडे, करूच नये विचार त्यामुळे काय नुकसान होईल,  उनाड वारा करतो का विचार!अगदी तसंच. मेघांच्या गडगडासारखे ओरडावे कधीतरी,  नाहीतरी मेघ गरजले तर कुठे पाऊस येतो. नुसतेच गडगडाट करतात. गर्जेल तो पडेल काय?जलधारांसम नृत्य करावे, काळ्या सावळ्या मेघांच्या मागे धावत लपतछपत पाठशिवणीचा खेळ खेळावा, काळोखल्या रजनी सारखी नयनी काजळ रेखा रेखावी, भूमातेच्या अंकावर मनसोक्त लोळावे, जसे पशुपक्षी लोळतात. तीच तर खरी माय आहे न. घ्यावा मोठेपणी तिच्या कुशीत शिरून प्रेमाचा ओलावा जो सुखावेल.  या पंचभूतांसारखेच आहे आपले जगणे.

     बेधुंद होणे म्हणजे काही वाईट नसावे. सृष्टीची म्हणजे प्रकृति, माया याची निर्मिती केली परमात्म्याने ती बेधुंदपणे, तिच्यावर आसक्त होण्यासाठीच. संपूर्ण चराचरात धुंदी आहे. वसंतातला बेधुंद निसर्ग जगायला शिकवतो, नव्याचे स्वागत करायला लावतो. मोगऱ्याचा दरवळ, चाफ्याचा सुगंध, निशिगंधाचा परिमळ, गंधाळलेली रातराणी प्रीत मंदिरी बेधुंद करतातच ना. त्यांच्यामुळेच प्रीत ही बेधुंदपणे वागत जाते. प्राजक्ताचे गंधित समर्पण श्रीहरीच्या चरणी विसावते म्हणजे काय भामेचे आणि रुक्मिणीचेही बेधुंद प्रीतीचे प्रतीकच म्हणावे लागेल. शिशिरातील पानगळीच्या पैंजणांचा नादही धुंद करतो. हेमंतातला गारवा मदहोश करणारा नि ग्रीष्मातील उष्णता रंगगंधाने मोहित करणारी, ऋतुचक्र धुंद होऊन फिरते आहे म्हणून जगरहाटी सुरू आहे.

     निसर्ग आणि मानव एकाच नाण्याच्या दोन बाजू. म्हणून जसा निसर्ग बेधुंद होतो तसाच मानवही. हो पण एक मानवाने लक्षात घ्यावे नेहमीच निसर्ग हा परमात्मा आहे. तो बेधुंद झाला तरी सावरतो आणि आवरतो ही तोच. आधारही तोच. 

     आजची तरुणाई नको त्या व्यसनाच्या मागे धावत बेधुंदपणे जगते आहे. याचे परिणाम पुढील पिढीवर नकळतपणे होत आहे. जगण्यात धुंद असावीच त्याशिवाय जगण्याला काही अर्थ असेल का? पण शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादेचे कुंपण घालणे अत्यावश्यक आहे.  शेवटी काय तर भान ठेवून आयुष्य आखा आणि बेधुंद, बेभान होऊन जगा, मग कळेल आयुष्य किती सुंदर आहे....


©®रसिका राजीव हिंगे

     

     #rasraj#बेधुंद#क्षण#जगणे#

     


No comments:

Post a Comment