Wednesday, 8 June 2022

प्रवाहाच्या विरुद्ध मी....

 




     "जनरीतीला धरून चालावे बघ नेहमी, उगाच सारखं सारखं वेगळं करायच्या नादात स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील" असे नेहमीच सगळे म्हणतात. पण जनरीत म्हणजे काय? याला प्रमाण काय? सगळे एकाच दिशेने निघाले तर आपणही त्याच्या पाठी जावे का? पुढचा ठेचकाळत चालला तरी आपण शहाणे व्हायचे नाही का?  पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे जर असेल तर मग का पुढच्याचा पाठलाग करायचा! 

     जरा वेगळी वाट चालून पहावी म्हणण्यापेक्षा विरुद्ध दिशेने चालून पहावं. स्वतः अनुभवाच्या मुशीतून तावून सुलाखून निघून यावं. म्हणजे कळतं आयुष्य म्हणजे प्रवाहाच्या दिशेने पोहणे नसून विरुद्ध दिशेने पोहणे आहे. कल्पनेच्या पंखावर आरूढ होऊन स्वप्नांच्या जगात भराऱ्या घेणे म्हणजे आयुष्य नाही. वास्तवाची जोड देऊन येईल त्या वाटेवर चालणे म्हणजे आयुष्य, जीवन.

     या मार्गावर  मखमली पायघड्या अंथरलेल्या नसतील पण काट्याकुट्यातून मार्ग कसा चालावा याचे प्रशिक्षण नक्की मिळेल. सुखाचे इमले बांधण्याचे स्वप्न पाहणारे विरुद्ध दिशेने चालू शकणार नाहीत कदाचित. कारण अडथळ्यांची शर्यत आहे इथे. वाऱ्याच्या दिशेने उडणारा पालापाचोळा, धूर, धूलिकण, हे वजनाने हलके आहे त्यामुळे  जसा वारा धावेल तसा वाहतात. पण दगड हा अभेद्य, कणखर, आणि जड आहे. जे असे पत्थर दिल असतात, मनाने कणखर असतात पण हृदय अतिशय कोमल असतं तेच प्रवाहाच्या विरुद्ध, जनरीत मोडून जे योग्य आहे तसेच करण्याचा प्रयत्न करतात. 

     यासाठी बरेचदा वाईटपणा घ्यावा लागतो, नको ते ऐकून घ्यावे लागते. ज्ञानेश्वर महाराजांशी लोक कितीही वाईट वागले तरी ते चांगलेच वागत होते, जर का तेपण इतरेजनांसारखेच वागले असते तर ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण झालाच नसता, जो यावश्चंद्र दिवाकर सगळ्याना मार्गदर्शक आहे.  सावरकर, नेताजी आणि त्यांच्या सारखेच क्रांतिवीर जर जे चाललं आहे ते चालू द्या असे म्हणत स्वतःचे हित साधत जगले असते तर आजही आपण पारतंत्र्यात खितपत पडलो असतो. 

     या भ्रष्ट दुनियेत दुसऱ्याच्या समोरचे ताट ओढून घेणारे आहेत. माझ्या स्वतःच्या आयुष्यात मला बरेचदा या गोष्टींचा खूप त्रास झाला, होतो आहे. पण माझ्या आईने दिलेले संस्कार असे आहेत की आधी तुझं भलं हो त्यापाठी माझं.  त्यामुळे तो तसा वागतो म्हणून मीपण का चांगलं वागायचे, नेहमीच माझ्याच तत्वांना का मुरड घालायची या आणि अशा विचारांना माझ्या मनात थाराच नाही. तुला जसे करायचे तसे कर, मी तसेच करणार नाही किंवा वागणार नाही या माझ्या भूमिकेमुळे मला नेहमीच मानसिक ताण सहन करावा लागतो. आज इतक्या दिवसानंतर आयुष्याच्या मध्यावर मला कळतं आहे की विरुद्ध दिशेने पोहण्यात,चालण्यात जो आनंद आहे, जे आव्हान आहे ते खूपच शक्तीदायक आहे, आत्मबळ वाढविणारे आहे. 

     असे असले तरी प्रवाहाच्या विरुद्ध जगत असतांना समाजभान ठेवणे गरजेचे आहे. आपण समाजात राहतो तर त्याचे पण देणे लागतो हा विचार करत चालत गेलो तर कळतं आयुष्य खूप सुंदर आहे...


रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment