श्रीराम शांत बसले होते. पण मन अशांत होते. काय करावे कळत नव्हते. त्रेता युगात आपण होतो तर अराजकता माहीतच नव्हती काय आहे. कली चे प्राबल्य वाढणार होतेच, पण इतके वाढेल असे वाटले नव्हते. याच विचाराने श्रीराम अस्वस्थ झाले होते. तेवढ्यात सीतामाई आल्या आणि श्रीरामांना अस्वस्थ पाहून त्यांना काळजी वाटायला लागली. सीता त्यांच्या बाजूला बसली तरी रामाचे लक्ष नव्हते.
"नाथ, कसला विचार करता आहात आपण?"
वैदेहीच्या आवाजाने राम भानावर आले. उगाचच इकडे तिकडे पाहिल्या सारखे करून म्हणाले,
"जानकी केव्हा आलीस तू इथे? माझे लक्ष नव्हते बरे."
"तेच म्हणते आहे मी, कशाचा विचार सुरू आहे तुमचा?
पुन्हा पृथ्वी वर जाण्याचा विचार तर करत नाही न तुम्ही!"
"नाही. सीते, ती वेळ अजून आली नाही. पण खूपच त्रास होतो आहे ग, पृथ्वीवर सगळीकडे कलीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतोच आहे. लोकांची ईश्वर निष्ठा कमी होत चालली आहे."
"पण आपण काय करू शकणार यामध्ये. प्रत्येकाला त्याचे प्रारब्ध नुसार जगावेच लागेल नाथ!"
"जानकी, तू म्हणते ते खोटे आहे असे मला म्हणायचे नाही,पण आपल्यालाच काहीतरी करावे लागेल असे दिसते आहे."
"आपण केले न कृष्णावतारात. त्यासाठी तो अवतार होता. दुष्टांचे निर्दालन आणि सज्जनांचे रक्षण."
"वैदेही ते द्वापार युग होते. आता कलियुग आहे."
"ते ही खरेच आहे म्हणा. नाथ, एक सांगू का? तुम्हाला राग येणार नसेल तर?"
"कल्याणी, काय हा प्रश्न तुझा. मी कधी रागावलो का तुझ्यावर!"
"तसं नव्हे आर्य, पण तुमच्या भक्तांना काही बोललेले तुम्हाला चालत नाही म्हणून विचारले. आजची जी ही पिढी आहे न देवा, ती फार आळशी आहे. सगळं त्यांना तयार म्हणजे इन्स्टंट हवं असतं. थोडा त्रास झाला की लगेच त्यांचा अहंकार दुखावतो."
"तसे नाही शुभानने, कृष्णावतरात गीता सांगताना सांगितलेले अर्धवट आचरणात आणतात. आता बघ न
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् । साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥
यामध्ये त्याचा असा समज आहे की कसेही वागलो तरी आपल्या उद्धार होईलच. पण सगळे फक्त अपि चेत्सुदुराचारो आणि पुढचे साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः एवढेच घेतात. मधले भजते मामनन्यभाक् हे विसरतात. मला जो अनन्य भावाने शरण येईल तोच माझा भक्त हे विसरून जातात आहे."
"पण स्वामी यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल.
श्रीराम काहीच बोलत नाही. पुन्हा आपल्याच विचारात हरवून जातात.
"वैदेही, लक्ष्मणाने आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर तू आलीस म्हणून तुझे हरण झाले,अन्यथा झालेच नसते. पण इथे किती रेषा आखणार अन् कसे वाचविणार माता भगिनींना? प्रत्येक पावलावर इथे दशानन उभा आहे. श्रध्दाच जिथे निर्भया होते तिथे यापरिस वेगळे काय घडणार ग."
"रघुकुल भूषण राघव आज चिंताक्रांत पाहून मलाही भीती वाटली क्षणभर. नाथ, अजिबात घाबरु नका. आज पृथ्वी वर तुमच्या जन्मभूमी वर तुमचे मंदिर उभे राहते आहे. कशाच्या बळावर देवा. ही माणसं तुमच्या भक्तीच्या बळावरच हे मंदिर उभे करतात आहे न. सगळे विरोध बाजूला सारून ही संघटीत शक्ती बघा राघवा, म्हणजे कळेल तुम्हाला
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥
यावरच ही शक्ती उभी आहे. आता सगळे विचार सोडून यांच्या पाठीशी तुम्हाला उभे राहायचे आहे."
"सीते अगदी बरोबर आहे, यांना भासवायचे आहे की मंदिर त्यांनीच उभे केले."
"राघवा, नेहमी तुम्हीच बोलता तेच मी आज तुम्हाला सांगते, प्रत्येकाचं प्राक्तन जसे असेल तसे भोग भोगावे लागतील हे खरे असले तरी अनन्य भावाने तुम्हाला जो शरण येईल त्याचे प्राक्तन तुम्ही बदलवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग आहे हा त्याचे चाक तुम्ही फिरवता आहात, ते गोलच फिरते आणि पुन्हा पहिल्या बिंदू जवळ येतं. खरय ना हे."
"अगदी खरय कल्याणी हे, काही झाले तरी माझ्या भक्तांना त्रास झालेला मला चालणार नाही. त्यांच्या सेवेला मी स्वतः हजर असेन."
"आत्ता वाटतात रघुकुल भूषण राजा राम."
श्रीराम आपल्या नेहमीच्या मोहक हास्यात सामावून गेले अन् सीतेला म्हणाले,
"चल जानकी, पृथ्वी वरचा माझा जन्म सोहळा पाहू या आणि सगळ्यांना पुन्हा सांगू या,
पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ll "
रसिका राजीव हिंगे
.jpeg)
No comments:
Post a Comment