Sunday, 29 May 2022

पर्व

 




    प्रत्येक मानव जन्माला येतांना त्याचे संचित, प्रारब्ध सोबत घेऊनच येतो, त्याला त्याच्या कर्मानुसार जगावेच लागते, तिथे पर्याय नाही हे पुन्हा प्रकर्षाने जाणवले जेव्हा डॉ. एस.एल. भैरप्पा यांची सौ. उमा कुलकर्णी यांनी भावानुवाद केलेली पर्व ही  कादंबरी वाचली  तेव्हा. 

    व्यास म्हणजेच कृष्णद्वैपायन यांनी लिहिलेल्या  महाभारता सारख्या महाकाव्यावर ही कादंबरी आहे. सतत बारा ते चौदा वर्षे या  विषयाचा अभ्यास केल्यानंतर भैरप्पा यांनी ही कादंबरी लिहिली. 

    महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही गुंतागुंतीची आहे. भैरप्पा यांनी त्या त्या व्यक्तिरेखा साकारताना त्यांच्या मनात जाऊन साकारल्या आहेत. कादंबरी ही पूर्णतः युध्दाभोवती फिरते आणि त्या त्या अनुषंगाने आलेले पात्र किंवा कथा मनाचा ठाव घेत पुढे सरकत जातात.

    युद्धासाठी भीम त्याचा मुलगा घटोत्कच याला आणण्यासाठी हिडिंब वनात निघाला असतांना द्रौपदी च्या मनाची अस्वस्थता, घालमेल म्हणजे भीम आता तिकडे गेल्यावर सालकटंकटी ला भेटेल, खूप दिवसांनंतर तो तिच्याकडे निघाला आहे परत येईल का, या आणि अशा प्रकारच्या स्त्रीसुलभ भावना तिच्या मनात येतात त्यामुळे तिची जी अस्वस्थता आहे ती भीमाने स्वतः समजून घ्यावी अशी तिची इच्छा असते. 

    कुंतीचे पाच ही पुत्र कसे झाले त्याची सर्वसामान्य  जनमानसात जशी धारणा असते किंवा समज आहे  म्हणजे मानवी भावभावनांशी समरस होईल असे मांडले आहे. कंसाच्या जन्मकथा सांगून आर्य, अनार्य, यांच्यातील वर्णसंकर कसा झाला किंवा कंस असा का राक्षसी वृत्तीचा होता याचे भावविश्लेषण पटत जातं आणि असेच असेल का असा विचार करायला मन प्रवृत्त होतं. धृतराष्ट्र आणि त्याच्या दासी, त्यांचे पुत्र. गांधारीने फक्त चौदा पुत्र आणि एक कन्या यांनाच जन्म आहे, बाकी सगळे धृतराष्ट्राचे दासी पुत्र असे कौरव शंभर झाले. 

    शल्य राजाची मुलगी हिरण्यवती वयात आलेली आहे, दारावर आलेल्या नाग लोकांतील एका बासरी वादकासोबत ती निघून जाते, द्रौपदी स्वयंवर, अर्जुनाने जिंकून आणलेली द्रौपदी पाच जणांमध्ये वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे  पाचही पुत्रांना एकत्र बांधून ठेवता येईल. यासाठी कुंतीने केलेली पांचालीची मनधरणी,  पांडवांचा वनवास, इंद्रप्रस्थाची स्थापना, द्रौपदीची भर सभेत झालेली विटंबना, धृतराष्ट्र चे कपटी राजकारण, द्रौपदी ला धृतराष्ट्राने दिलेले वर , अर्जुनाचा सुभद्रेसोबत झालेला  विवाह याचे  बारकाईने आणि सूक्ष्म वर्णन भैरप्पांनी केले आहे.  व्यक्तिरेखा साकारताना त्या त्या ठिकाणची भौगोलिक स्थिती, वातावरण, याचेही तपशीलवार वर्णन भैरप्पांनी केले आहे.

    युद्धाचे वर्णन म्हणजे फक्त पराक्रम, जय पराजय असे नाही. अठरा अक्षोहिणी सैन्य असलेले हे युद्ध होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या सैन्याला अन्नाची रसद पुरविणे, पाणीपूरवठा , त्याच्या मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था, हत्ती,घोडे यांची मलमूत्रामुळे युद्धभूमीवर पसरलेली दुर्गंधी, मोडलेले रथ, बाणांचे तुकडे,  मेलेल्या सैन्याच्या रक्तमासांचा खच, त्यामुळे तेथे जमलेल्या रान गिधाडांचा होणारा त्रास हे सगळं वाचतांना रणभूमी अक्षरशः डोळ्यासमोर उभी राहते. काय दैन्यावस्था झाली असेल त्यावेळी सामान्य सैनिकांची. सर्वनाश करणारे महाभयंकर असे हे युद्ध याचे व्यावहारिक दृष्टिकोणातूनही भैरप्पांनी मुद्देसूद वर्णन केले आहे की जे वाचतांना वास्तवाची जाणीव व्हावी.

    कृष्ण द्वैपायन यांच्या आश्रमात धर्म आणि अधर्म काय, नियोगाने जन्मलेली संतती राज्य करण्यास अधिकारी नाहीत का, याचे उत्तर शोधण्यास युद्धाच्या दोन दिवस आधी गेलेले भीष्म, तिथे  मृत्यू बद्दलचे विचार, जगणं,जन्म या गोष्टीचे कुठे आणि कसे महत्त्व आहे याबद्दल भैरप्पांनी मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार मांडले आहेत. द्रोणाचार्य यांचेही मनात असेच विचार येतात. वास्तविक पाहता खुद्द धृतराष्ट्र आणि पांडू हे नियोगानेच झालेले वारसदार होत. तरीही दुर्योधन पांडवांना अनौरस ठरवून राज्याचा अधिकार नाकारतो. द्रोणांना सतत असे वाटत राहतं आपण कोणाचे बाजूने लढतो आहे, धर्म की अधर्म. यावरचे उलटसुलट विचारच त्यांना युध्दास प्रवृत्त कसे करतात कर्णाचे जन्मरहस्य ऐन युद्धाच्या आधी सांगून त्याला पांडवांचे बाजूने लढायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणारा कृष्ण, कुंती.एकलव्याची गुरुनिष्ठा, अर्जुनावरचा आकस, अशा सगळ्याच घटना भैरप्पांनी  मानवी जीवनात जशा असतील किंवा असू शकतात याचा विचार करतच प्रत्येक पात्रांचे मनात शिरून त्यांना बोलते केले आहे. चमत्कार, मंत्रतंत्र, शाप, यांच्या पल्याड जाऊन मानवी जीवनास अनुसरून पर्व लिहिले आहे. काही गोष्टी अशा आहेत की आपल्या मनाला पटत नाही म्हणण्यापेक्षा आपलं मन मान्य करत नाही. कृष्णाने सांगितलेली गीता, विश्वरूप दर्शन वगैरे काहीच आपणास इथे दिसत नाहीत. शरपंजरी उत्तरायणाची वाट पाहणारे भीष्म वाचायची, ऐकायची सवय असलेल्या मनाला भीष्मांनी शेवटी अन्न त्याग करून मृत्यूकडे केलेली वाटचाल या सगळ्या अनाकलनीय गोष्टी वाटतात. 

    भैरप्पांनी एक तत्वचिंतक या दृष्टिकोनातून लिहिलेली पर्व म्हणूनच मनाला भावते. एकदा वाचून समाधान होत नाही. सातशे पृष्ठाची ही कादंबरी सुरवातीपासून मनाचा ठाव घेत पुढे सरकत जाते. मध्ये मध्ये "म्हणे म्हणे" नकोसे होते.

    एकदा वाचून समाधान होतच नाही म्हणण्यापेक्षा पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येकवेळी नक्कीच काहीतरी नवीन गवसेल अशी ही पर्व.


रसिका राजीव हिंगे

    

    

    

    

    

    

    

    

    

3 comments:

  1. छान. वाचणं, लिहिणं आणि प्रसार हे तीनही प्रांत या लेखामार्फत सर झाले. तुम्ही भैरप्पांचं अन्य साहित्य वाचलं आहे का? - पुरुदत्त रत्नाकर

    ReplyDelete
    Replies
    1. नाही
      ही पहिलीच कादंबरी वाचली
      मला फारच आवडले हे पुस्तक

      Delete
  2. Views are presented with good narration and without being biased which is very difficult....👌💯😁

    ReplyDelete