Monday, 7 February 2022

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं....

 


स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं....

     "अरे चला उठा, काय झोपलेत सगळे? भाग्य दाराशी येतं तेव्हा असे झोपू नये."
     संध्याकाळी साडे पाच वाजता ऑफिस मधून घरी आलेल्या जानकीचा उर आनंदाने भरला होता.  चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसंडून वहात होता. जणू साता जन्माची पुण्याई आज फळाला आली होती.
     हो. तिच्या मुलीचे मधुश्री चे लग्न ठरत होते. दुपारीच तिला ऑफिस मध्ये श्री. कुलकर्णी यांचा फोन आला होता. 
     " हॅलो, नमस्कार मी कुलकर्णी बोलतोय,  मधुश्री रोहितला पसंत आहे. तुमची  हरकत नसेल तर आपण या रविवारी भेटू आणि पुढचे काय ते सगळं ठरवू, चालेल का आपणास?"
     "ठीक आहे, मधुश्रीशी बोलून तुम्हाला कळवते."  अति आनंदाने तिचे पापणकाठ ओलावले. आधीच मधुश्रीशी बोलणे झाले होते. "त्यांच्याकडून जर होकार आला तर आपण पुढे जायचे. उगाच नकारघंटा वाजवू नकोस आता.
     जानकी राघवची वाट पहात बसली. केव्हा एकदा राघवला ही आनंदाची बातमी सांगते असे झाले होते तिला. सोफ्यावर पेपर चाळतांना विचारांच्या आवर्तनात केव्हा ती 26 वर्षे मागे गेली तिला कळलेच नाही.
     जानकी आणि राघव उच्च मध्यमवर्गीय जीवन जगणारे. राघव  आय.टी. कंपनी मध्ये नोकरी करीत होता तर जानकी बँकेत नोकरी करीत होती. दोघेही फावल्या वेळात जमेल तसे समाज कार्य करत होती. अनाथ आश्रमात जाऊन तिथल्या मुलांना खेळविणे,  खाऊ घेऊन जाणे किंवा वृद्धाश्रमात कोणाला औषधे देणे, त्यांच्याशी गप्पा करणे हे दोघांच्याही आवडीचे काम होते. समाजकार्य करतांनाच त्या दोघांची ओळख झाली होती. जानकी आणि राघवने  प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर  जसे जमेल तसे दोघेही त्यांचे कार्य करतच होते. हळूहळू त्यांच्या संसाराच्या गाडीने वेग घेतला.  एक गोंडस फुल मधुश्रीच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात आले.
     मधुश्री चे बालपण, शैक्षणिक प्रगती, मित्र मैत्रिणी, तिचा तिच्या आईबाबांप्रमाणेच समाजातील वावर,घरातील आजी आजोबाचे संस्कार, सहवास, याच्या बळावर ती सुसंस्कृत आणि सुशिक्षित होत होती.
     सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करणाऱ्या जानकीला तिने डॉक्टर इंजिनियर होऊ नये असे वाटत होत. मधुश्रीला स्थापत्यशास्त्रज्ञ (architecture) व्हायचे होते. त्यासाठी तिने नाटा (National Aptitude Test for Architecture) ची प्रवेश परीक्षा दिली होती. तसेच JEE चा पेपर 2 पण दिला होता. प्रवेश परीक्षेचा निकाल आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत मधुश्रीला मनाजोगते महाविद्यालय मिळाले तिचा प्रवेश निश्चित झाला.
     पुण्यातच  प्रवेश झाल्यामुळे मधुश्रीला बाहेर शिकायला पाठवावे लागले नाही. त्यामुळे जानकीच्या जीवात जीव आला. बाहेर शिकायला पाठवणे म्हणजे तिच्याकडे लक्ष देणे शक्य होणार नाही असे तिला सारखे वाटायचे. पण इतर भागातल्या मुली एकट्याच येतात पुण्यात शिकायला याचे तिला कौतुक ही वाटायचे. अशा संभ्रमावस्थेत होती जानकी. तशी जानकी अनाथ आश्रमात असलेल्या मुलांना जाणत होती,अनुभवत होती, तरीही तिचं मन हळवं होत होतंच. अन राघव! त्याला आपल्या मुलीची बुद्धिमत्ता कोणत्या प्रकारची आहे  कळत नव्हते. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ हावर्ड गार्डनरच्या बहुबुद्धि   सिद्धांता नुसार हिची अवकाशीय म्हणजे स्थानिक(spital) बुद्धिमत्ता असावी का? कारण जे आपल्यासमोर नाही ते मांडणारे, त्याचे चित्र समोर उभे करणारे असतात स्थापत्यशास्त्रज्ञ.  मुळात कलेची आणि नाविन्याची आवड असलेल्या मधुश्री जवळ सौंदर्यदृष्टी होती. पाच वर्षाचे पदवीपर्यतचे शिक्षण 65 टक्के मार्क्स मिळवून पूर्ण झाल्यावर तिने  गृहविभाग हा विषय घेऊन पदव्युत्तर साठी प्रवेश घेतला. मनासारखे विषय असल्यामुळे भराभर यशाची शिखरे पादाक्रांत करत होती. पाहता पाहता तिचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले.
     आता पुढे नोकरी करायची होती. पण जानकीला वाटत होते की नोकरी तर करायचीच पण एकीकडे लग्नाचे पण पहायला हवे. पण यावर मधुश्री मूग गिळून चुप बसायची प्रत्येक वेळी.
     एक दिवस रात्रीचे जेवणं वगैरे झाल्यावर सगळेच गप्पा करत बसले असतांना जानकीने मधुश्रीला विचारले.
   " मधु आता तुझ्यासाठी स्थळ पहायला हवेत बाळा, आपण एखाद्या विवाह संस्थेत नाव नोंदवायचे का? तुझं कुठे काही बाहेर जुळलं असेल तर तसे सांग. पण काहीतरी निर्णय घ्यायला हवा आहे आता."
   तरीही मधु काहीच बोलली नाही उठून चालली गेली झोपायला. राघव जानकीला काही कळेना काय करावे.   दिवसेंदिवस मधुश्रीचे जास्त वेळ बाहेर रहाणे, उशिरा घरी येणे जानकीला खटकत होते. याविषयी राघव पण चिंतीत होता.
     तिची चाललेली घालमेल सासूबाईंच्या लक्षात येत होती. त्यांचेही मनात चलबिचल सुरू होतीच. कधी त्या जानकीला समजवायच्या, "पोरीची जात आहे थोडं तिच्या कलाने घेऊन पाहू. तरुण मुलीला अगदी तळहातावरच्या फोडासारखे जपावे लागते. तिच्या मनाविरुद्ध झाले तर काही करता काही होऊन बसेल."
     रात्रीचे साडे अकरा वाजून गेले तरी मधुश्री घरी परतली नव्हती. तिचा फोन पण बंद  होता. जानकीला काळीजी वाटायला लागली. कुठे असेल, कुठे अडकली तर नसेल ना, तिच्यावर काही संकट तर ओढवले नसेल ना, मन चिंती ते वैरी न चिंती असे तिला सारखे वाटत होते. राघव निघणार तेवढ्यात  मधुश्री घरात आली. तिला पाहून दोघांच्याही जीवात जीव आला.
     "कुठे होतीस मधु? किती वाजले. फोन तर करायचा उशीर होतो आहे म्हणून!" जानकीने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
     "आई मी काय आता लहान आहे का, प्रत्येकवेळी माझे अपडेट्स तुम्हाला देत राहू? सिनेमाला गेले होते मी." झाले ठिणगी पडली. राघव चिडला होता तिच्या ह्या उत्तराने.
     "कोण होतं मधु तुझ्याबरोबर?
     "स्वराज, माझा मित्र होता."
     आता तिला विचारण्यात काही अर्थ नाही असे वाटून दोघेही गप्प बसले. सकाळी बघू. रात्रभर झोप नाही. जानकीच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नव्हते. कुठे चुकली मी संस्कार करायला, मी आई म्हणून योग्य नाही का? सकाळी मधुशी बोलायचेच, जे  असेल ते होऊ दे आज, एक घाव दोन तुकडे. मधु उठल्याबरोबर राघव शांत पणे तिच्याजवळ बसला.
      "मधु तू मला सगळं सांगतेस, पण इतकी मोठी गोष्ट  माझ्यापासून का लपविलीस?. तुला मित्र असण्यावर माझा आक्षेप नाही. तू तुझ्या मित्रमैत्रिणी च्या ग्रुप बरोबर सिनेमाला गेली असतीस तर मला काही वाटले नसते पण फक्त तू आणि स्वराज दोघेच गेले, ते पण रात्रीच्या वेळी हे आक्षेपार्ह आहे बाळा. काय करतो हा स्वराज?"
     " चार वर्षे झाले बाबा तो माझा मित्र आहे, माझ्याच कॉलेजमध्ये होता. आम्ही दोघांनी लग्न करायचे ठरवले आहे."
     इथपर्यंत मजल गेली तरी तुला घरी सांगावेसे का वाटले नाही मधु?  तुझ्यावर आणि माझ्या संस्कारावर माझा पूर्ण विश्वास होता." जानकीला दुःख आवरत नव्हते.
     "मी स्वराजला सांगितले आहे, माझे बाबा जोपर्यंत हो म्हणत नाहीत आपल्या लग्नाला, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. बाबा तुम्ही प्लीज हो म्हणा"
     स्वराज  एका साध्या कंपनी मध्ये काम करत होता. शिक्षण जेमतेम बी.कॉम. पर्यंतच. Architechtur ला प्रवेश घेतला होता पण दोन वर्षातच सोडून दिले होते. घरी  आई वडील भाऊ आणि बहीण. अशा एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी पेलेलं का हा प्रश्न जानकीला नव्हताच, तर दोन वेळेचं जेवण तरी हा मुलगा आपल्या मुलीला सुखाने खाऊ देईल की नाही याची शाश्वती नव्हती तिला. त्याच्या बद्दल पूर्ण माहिती राघवने काढली तेव्हा खूपच विचित्र चित्र डोळ्यासमोर आले. मधूच्या काळजीने घरदार अगदी उदासले होते. 
     आजीच्या लक्षात येत होतं, काहीतरी मधूच्या मनात खळबळ चालली आहे. अनेक पावसाळे झेललेले, अनुभवाचे गाठोडे होते तिच्याजवळ.  मधु जवळ आजी जाऊन बसली, तिच्या डोक्यावरून,पाठीवरून हात फिरवला. तशी मधु आजीच्या कुशीत  रडायला लागली. तिला रडू दिले आजीने. थोडी शांत झाल्यावर आजीने तिला समजावले.
     " मधु, लग्न म्हणजे खेळ नसतो, ते असतं दोन घराण्याचं नातं, आपल्या सुरक्षेच्या कक्षा रुंदावल्या जातात लग्नामुळे हे तुला माहीत आहे का? प्रेम केव्हा? जेव्हा सहवास  असेल तेव्हांच. एकमेकांना समजून सहवासोत्तर जे प्रेम असतं नं ते खरे प्रेम. जगण्यासाठी व्यवहार हवा. आणि कालांतराने ह्या व्यवहाराचेच रूपांतर प्रेमात होतं बरं. म्हणून तुला सांगते जे पाऊल उचलशील ते योग्य विचार करून उचल." मधु काही बोलू शकली नाही. पण तिला जे समजायचे ते समजले होते.जेव्हा कळून वळत नसतं तेव्हा आजीसारखं कोणीतरी हवं असतं वळवणारं.
     राघव आणि जानकी अगदी मेटाकुटीला आले होते मधुश्री साठी स्थळ पाहतांना. शेवटी राघवने विचारले, "मधु काय ठरविले बाळा? "राघवने विचारताच मधु अगदी लहान होती त्यावेळी  तशीच आईच्या गळ्यात हात घालून म्हणाली बाबा तुम्ही म्हणाल तसंच. माझं मला कळलं आहे काय करायचे ते."
     मधूचे  शब्द ऐकले अन सगळं घर आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलायला लागले. घराचा कोपरा न कोपरा उत्साहाने भरून गेला.
     "जानकी कसला विचार करते आहे? कुठे हरविलीस?" राघवच्या आवाजाने जानकी भानावर आली.  राघवला पाहताच तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. सगळे आनंदाचे क्षण राघवच्या ओंजळीत देऊन जानकी पुढच्या तयारीला लागली. सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली लग्नाची तयारी करत म्हणता म्हणता लग्नाचा दिवस उजाडला.
     स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं.... मंगलाष्टकांचा गुरुजींचा स्वर कानावर आला अन जानकीच्या डोळ्यात आसवं गोळा झालीत...आनंदाचे, मुलीच्या विरहाचे, कृतार्थतेचे की परिपूर्णतेचे.......

रसिका राजीव हिंगे
अकोला
संपर्क - 8600047066
    
    
    

2 comments: